व्यापाऱ्यांचे सांगलीत बेमुदत उपोषण सुरू

By Admin | Updated: December 16, 2014 00:12 IST2014-12-15T22:57:46+5:302014-12-16T00:12:59+5:30

एलबीटीला विरोध : ‘बंद’ला महापालिका क्षेत्रात संमिश्र प्रतिसाद

Traders started the hunger strike in Sangli | व्यापाऱ्यांचे सांगलीत बेमुदत उपोषण सुरू

व्यापाऱ्यांचे सांगलीत बेमुदत उपोषण सुरू

सांगली : स्थानिक संस्था कर (एलबीटी)च्या विरोधात सांगलीतील कृती समितीने आजपासून महापालिकेसमोर बेमुदत उपोषणाला सुरूवात केली. एलबीटी हटाव व फौजदारी कारवाया मागे घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांचे लेखी आदेश येईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धारही व्यापाऱ्यांनी केला. या आंदोलनाला पाठिंब्यासाठी पुकारलेल्या सांगली बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
एलबीटी हटावसाठी गेल्या दीड वर्षापासून सांगलीत कृती समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. गेल्या महिन्याभरात महापालिकेनेही एलबीटी वसुलीसाठी कडक पावले उचलत ३० हून अधिक व्यापाऱ्यांवर न्यायालयात फौजदारी दाखल केली आहे. तसेच व्यापाऱ्यांचे दफ्तर तपासणीच्या हालचाली सुरू आहेत. यापूर्वी कृती समिती व ‘फॅम’ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एलबीटी हटविण्याची मागणी केली होती. पण मुख्यमंत्र्यांनी पर्याय मिळेपर्यंत कर भरण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना केले आहे. या पार्श्वभूमीवर आजपासून सांगलीत व्यापाऱ्यांनी एलबीटी हटावसाठी एल्गार पुकारला आहे.
सकाळी गणपती मंदिरासमोर व्यापाऱ्यांच्यावतीने आरती करण्यात आली. त्यानंतर सर्व व्यापारी सराफकट्टा, कापड पेठमार्गे महापालिकेच्या शाळा क्रमांक एकनजीक जमा झाले. तिथे त्यांनी बेमुदत उपोषणाला सुरूवात केली. कृती समितीचे समीर शहा, विराज कोकणे, अनंत चिमड, सुरेश पटेल या चार व्यापाऱ्यांनी उपोषण सुरू केले. यावेळी बोलताना शहा व कोकणे म्हणाले की, एलबीटी हटविण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस सकारात्मक आहेत. त्यांचा एलबीटी व जकात हटावला पाठिंबा आहे. पण राज्यातील २६ महापालिकांतील अधिकारी मात्र व्यापाऱ्यांवर फौजदारी, तसेच बँक खाती सील करण्याची कारवाई करीत आहेत. कोल्हापुरात तीन हजार, परभणीत १२००, तर सोलापुरात साडेतीनशे व्यापाऱ्यांवर फौजदारी केली आहे. एलबीटी हटणार असेल, तर कारवाई कशासाठी सुरू आहे? कारवाई मागे घ्यावी, यासाठी आमचे आंदोलन आहे. एलबीटी हटाव व फौजदारी कारवाई थांबविण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी द्यावेत, हे आदेश निघेपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या आंदोलनात परभणी व्यापारी संघटनेचे आनंद भाकळे, अतुल शेळके, विक्रम रामसिघानी यांनीही सहभाग घेतला. शिवसेनेचे नगरसेवक गौतम पवार, तसेच सांगलीतील वैद्यकीय संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी मुकेश चावला, सुदर्शन माने, गौरव शेडजी, धीरेन शहा, आप्पा कोरे, प्रसाद कागवाडे, सोनेश बाफना आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)


दहा कोटींची उलाढाल ठप्प
बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. सांगलीतील कापडपेठ व सराफकट्टा या दोन बाजारपेठांना आज साप्ताहिक सुट्टीच होती. तसेच गणपतीपेठ, हरभट रोड, मारुती रोड, स्टेशन चौक परिसरातील व्यापाऱ्यांनी बंदमध्ये भाग घेतला. मार्केट यार्डातील व्यवहार मात्र सुरळीतपणे सुरू होते. कुपवाड व मिरजेतही ‘बंद’ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. या आंदोलनामुळे सुमारे दहा कोटींची उलाढाल ठप्प झाल्याचा दावा संघटनेने केला.


आंदोलन राज्यव्यापी, तर सांगलीत का? : आयुक्त
व्यापाऱ्यांच्या आंदोलनाबाबत पालिकेला कोणताही आक्षेप नाही. एलबीटीबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार महापालिकेला नाही. पालिका कायद्यानुसार वसुलीची कारवाई करीत आहे. त्यांचे आंदोलन राज्यव्यापी आहे, तर मग ते सांगली महापालिकेसमोरच कशासाठी? असा सवाल आयुक्त अजिज कारचे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेवेळी उपस्थित केला.


मंडपावरून वादावादी
व्यापाऱ्यांच्या उपोषण आंदोलनाला महापालिकेने परवानगी नाकारली आहे, तर वाहतूक पोलीस व शहर पोलिसांनी आंदोलनाला परवानगी दिली होती. व्यापाऱ्यांनी पालिकेसमोरील शाळा क्रमांक एकच्या चौकात आंदोलनासाठी मंडप, स्टेज उभारले होते. पण सकाळी पालिकेच्या अतिक्रमण पथकाने हा मंडप व स्टेज काढून टाकले. ही कारवाई सुरू असतानाच सर्व व्यापारी आंदोलनस्थळी आले. यावेळी पालिकेचे अधिकारी व व्यापाऱ्यांत जोरदार वादावादी झाली. एकमेकांना अर्वाच्च भाषेत दूषणेही देण्यात आली. पालिकेचे पथक माघारी फिरल्यावर व्यापाऱ्यांनी पुन्हा स्टेज व मंडप उभारून उपोषणाला सुरूवात केली.


मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू : संजय पाटील
सांगलीचे खासदार संजय पाटील यांनी सकाळी आंदोलनस्थळी भेट देऊन व्यापाऱ्यांशी चर्चा केली. पाटील म्हणाले की, राज्यातील भाजपचे सरकार एलबीटी हटविण्यासाठी कटिबद्ध आहे. पण त्याचवेळी महापालिकाही चालली पाहिजे. व्यापाऱ्यांनी घाई करू नये. दोन दिवसांत मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करू, असे आश्वासन त्यांनी दिले. पण त्यांची शिष्टाई यशस्वी झाली नाही. काल (रविवारी) रात्री ‘फॅम’चे मोहन गुरनानी यांनीही सांगलीत येऊन व्यापाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यांचीही मध्यस्थी असफल ठरली.

Web Title: Traders started the hunger strike in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.