व्यापाऱ्यांच्या बंदने दीड कोटींची उलाढाल ठप्प
By Admin | Updated: July 5, 2016 00:03 IST2016-07-04T23:51:03+5:302016-07-05T00:03:51+5:30
नियमनमुक्तीला विरोध : फळांसह कांदा-बटाटा व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; बाजार समितीत शुकशुकाट

व्यापाऱ्यांच्या बंदने दीड कोटींची उलाढाल ठप्प
कोल्हापूर : फळे व भाजीपाला नियमनमुक्ती विरोधात सोमवारी अडते, व्यापाऱ्यांनी एल्गार पुकारल्याने कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील सर्व व्यवहार बंद राहिले. यामध्ये भाजीपाला, फळांसह कांदा-बटाटा व्यापारी सहभागी झाल्याने समितीमधील सुमारे दीड कोटींची उलाढाल ठप्प झाली.
राज्य सरकारने भाजीपाला व फळे नियमनमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. बाजार समित्यांच्या बाहेर शेतकऱ्यांना आपला माल विकता येणार असल्याने याविरोधात व्यापारी व अडते आक्रमक झाले आहेत. माथाडी कामगारांनी सोमवारी ‘काम बंद’ आंदोलन करत आपला संताप व्यक्त केला. व्यापारी व अडते यांनी कामकाज बंद ठेवले तर बाजार समिती संघानेही या संपात उडी घेतल्याने संपूर्ण कामकाज ठप्प झाले. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत दिवसाला साधारणत: दीड कोटींची उलाढाल होते. फळे, भाजीपाला मार्केट सह कांदा-बटाटा व्यापाऱ्यांनीही संपात सहभागी झाल्याने समिती परिसरात शुकशुकाट दिसत होता.
नियमनातून फळे, भाजीपाला वगळण्याचा निर्णय अन्यायी
हमाल पंचायत : उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
कोल्हापूर : हमाल, मापाडी यांचा विचार न करता, शासनाने बाजार समितीमधील नियमनातून फळे व भाजीपाला आदी शेतीमाल वगळला आहे. त्याच्या निषेधार्थ सोमवारी कोल्हापूर जिल्हा हमाल पंचायतने ‘काम बंद’ ठेवून निषेध नोंदविला. निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे यांना याचे निवेदन देण्यात आले.
उपाध्यक्ष आण्णाप्पा रामा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील दीडशेहून अधिक जणांच्या व्यापक शिष्टमंडळाने हे निवेदन सादर केले.
शासनाने हा निर्णय घेताना हमालांना विश्वासात घेतलेले नाही. शेतकरी ते ग्राहकांची भेट घडविण्याचा शासनाचा इरादा दिशाभूल करणारा आहे. त्यात शेतकऱ्यांचा फायदा होणार नाही. बाजार समितीमधील माल न आणता खुल्या बाजारात माल विक्री ही बाब वाटते तितकी सोपी नाही. बाजार समितीचे परवानाधारक हमाल, महिला, कष्टकरी कामगार नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूने विचार आणि कृती करतो. आमच्या भविष्याचा विचार न करता शासनाने अन्यायी धोरण स्वीकारले आहे. हे तत्काळ मागे घ्यावे. शेतीमाल उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव मिळवून देण्याची जबाबदारी ही शेतीमाल बाजार समितीने घेतली पाहिजे. शेतीमालाचा हमीभावाने खाली लिलाव जाणार नाही. याची दक्षता घेऊन प्रसंगी हमी फंडातून शेतकऱ्याला आर्थिक हमी दिली पाहिजे. शेतीमाल बाजार समित्यांमध्ये हमी फंडाची उभारणी व्हायला हवी.
शिष्टमंडळात सरदार रोहिले, कृष्णात चौगले, गणपती पाटील, संभाजी खांडेकर, गोरख लेंडवे, विनोद बोरे, बापू आडूळकर, रूद्राप्पा तेली, शिवपुत्र शिरजगी आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)