व्यापार आजपासून सुरू, पण वेळ मर्यादेची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:22 IST2021-05-24T04:22:04+5:302021-05-24T04:22:04+5:30

कोल्हापूर : कडक लॉकडाऊन शिथिल झाल्याने आज, सोमवारपासून व्यापार पूर्ववत होणार आहे; पण सकाळी ७ ते ११ या वेळेतच ...

Trade starts today, but fear of time limit | व्यापार आजपासून सुरू, पण वेळ मर्यादेची धास्ती

व्यापार आजपासून सुरू, पण वेळ मर्यादेची धास्ती

कोल्हापूर : कडक लॉकडाऊन शिथिल झाल्याने आज, सोमवारपासून व्यापार पूर्ववत होणार आहे; पण सकाळी ७ ते ११ या वेळेतच दुकाने सुरू ठेवण्याचे बंधन कायम राहणार असल्याने व्यापाऱ्यांमध्ये धास्ती कायम आहे. केवळ चार तासांतच व्यापार करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यामुळे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाने १६ मेपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन लागू केले. आज, सोमवारपासून त्यामध्ये शिथिलता आणली आहे. मात्र, राज्य सरकारचा लॉकडाऊन १ जूनपर्यंत कायम राहणार आहे. या कालावधीत फक्त सकाळी ७ ते ११ या वेळेतच दुकाने सुरू करण्याची परवानगी आहे. व्यापार करण्यासाठी सकाळी ७ ही वेळे गैरसोयीची आहे. चार तासच दिल्याने सकाळी १० ते ११ या वेळेतच ग्राहकांची गर्दी होते. परिणामी गर्दीवर नियंत्रण ठेवणे संबंधित दुकानदाराला शक्य होत नाही.

कमी वेळेमुळे ग्राहकांनाही दुकानदार देईल तशी वस्तू घेऊन जावे लागते. ग्राहक आणि व्यापाऱ्यांच्या दृष्टीनेही सकाळच्या टप्प्यातील वेळ गैरसोयीची आहे. वेळ वाढवून मिळण्यासाठी चेंबर कॉमर्सतर्फे प्रयत्न करीत आहे; पण जिल्हा प्रशासन सरकारकडे बोट दाखवत चेंबरच्या मागणी बेदखल करीत आहे. यामुळे चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रमुख पदाधिकारी आमदार चंद्रकांत जाधव यांची भेट घेणार आहेत.

चौकट

सराफ व्यावसायिकांत चिंता

सराफ दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी नसल्याने त्यांच्यातही नाराजी निर्माण झाली आहे. ऐन लग्नाच्या हंगामातच लॉकडाऊन झाल्याने सराफ व्यावसायिकांत चिंतेचे वातावरण आहे. सलून, स्पा, ब्यूटी पार्लर १ जूनपर्यंत बंद राहणार असल्याने त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

चौकट

रोज ६० कोटींपर्यंत नुकसान

लग्न सराई, विविध कार्यक्रमांच्या हंगामातच कडक लॉकडाऊन लागू केल्याने शहर आणि जिल्ह्यात रोज ६० कोटींचा फटका बसला आहे. विविध प्रकारच्या दुकानांत काम करणाऱ्या कामगारांवरही बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. म्हणूनच कोरोना प्रतिबंधासाठी सर्व प्रकारची काळजी, आरोग्य प्रशासनाचे नियम पाळतो, पण दुकाने पूर्ण वेळ सुरू करण्याची मुभा मिळावी, अशी मागणी सर्वच व्यापाऱ्यांची आहे.

कोट

कडक लॉकडाऊन उठला तरी वेळेचे बंधन कायम असणार आहे. सकाळी ७ ते ११ या वेळेतच व्यापार करताना अडचणी येतात. वेळ संपण्याच्या शेवटच्या टप्प्यात गर्दी होण्याचा धोका असतो. म्हणून सकाळी ९ ते ५ यावेळेत सर्वच दुकाने सुरू करण्याची परवानगी मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा सुरू आहे.

संजय शेटे, अध्यक्ष, चेंबर ऑफ कॉमर्स

कोट

सकाळच्या टप्प्यात चार तासच दुकाने सुरू ठेवण्याचे बंधन जाचक आहे. ही अट शिथिल झाली पाहिजे. अन्यथा व्यापारी, दुकानदारासमोरील अडचणी पुन्हा वाढणार आहेत. दिवसभर दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी मिळणे आवश्यक आहे.

केतन तौटे, खाद्यतेल दुकानदार

--------

Web Title: Trade starts today, but fear of time limit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.