किसान संघर्ष समितीच्यावतीने ट्रॅक्टर संचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:14 IST2021-02-05T07:14:38+5:302021-02-05T07:14:38+5:30
कोल्हापूर : दिल्लीतील आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्यावतीने मंगळवारी, प्रजासत्ताक दिनी कोल्हापूर शहरातून ट्रॅक्टर ...

किसान संघर्ष समितीच्यावतीने ट्रॅक्टर संचलन
कोल्हापूर : दिल्लीतील आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्यावतीने मंगळवारी, प्रजासत्ताक दिनी कोल्हापूर शहरातून ट्रॅक्टर संचलन करण्यात आले.
दसरा चौकातून ट्रॅक्टर संचलनास सुरुवात होऊन आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक, आझाद चौक, उमा टॉकीज, फोर्ड कॉर्नर, राजाराम महाराज पुतळा, व्हीनस कॉर्नर, बसंत बहार रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रॅली आली. त्याठिकाणी रॅलीचे सभेत रूपांतर झाले.
समितीचे निमंत्रक नामदेव गावडे म्हणाले, साठ दिवसांपेक्षा अधिक काळ शेतकरी आपल्या न्यायहक्कासाठी दिल्लीच्या थंडीत बसले आहेत. त्यांची दखल घेण्यास केंद्र सरकार तयार नाही. सरकारची ही असंवेदनशीलता लोकशाहीसाठी घातक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा बांध सुटू शकतो हे सरकारने लक्षात घ्यायला हवे आणि तसे झाल्यास त्यास सरकारच जबाबदार राहील.
‘भाकप’चे जिल्हा सचिव सतीशचंद्र कांबळे म्हणाले, आज प्रजासत्ताक दिनी न भूतो न भविष्यती अशी ट्रॅक्टर तिरंगा रॅली काढून आपण अनोखे ध्वजसंचलन केलेले आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात प्रथमच कायदे रद्द करा या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन होत आहे. स्वातंत्र्यापूर्वी काळा रौलेट ॲक्ट रद्द करा यासह सविनय कायदेभंगाच्या चळवळी झालेल्या होत्या. या आंदोलनांमुळेच ब्रिटिशांचे तख्त उखडण्यात आलेले होते. सरकारने या आंदोलनाची दखल न घेतल्यास मोदी सरकारचे तख्तदेखील उखडून पडेल. चंद्रकांत यादव, टी. एस. पाटील, राजू सुर्यवंशी, रवी जाधव, स्नेहल माने यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी दिनकर सूर्यवंशी, बाबुराव कदम, रमेश वडणगेकर, दिलदार मुजावर, प्रशांत अंबी, धीरज काटारे, अनिल चव्हाण, नामदेव पाटील, बाळू पाटील, जयवंत जोगडे, संभाजी जगदाळे आदी उपस्थित होते. किसान सभा जिल्हाध्यक्ष वाय. एन. पाटील यांनी आभार मानले.
फोटो ओळी : किसान संघर्ष समितीच्यावतीने मंगळवारी कोल्हापूर शहरात ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. (फाेटो-२७०१२०२१-कोल-किसान सभा)