संदीप आडनाईककोल्हापूर : पाण्याच्या कडेला बसून खेळण्याची मजा अनेकांनी लुटली असेल, परंतु प्रत्यक्ष पाण्यात बसून खेळण्याची आणि खाण्याची मजा काही वेगळीच आहे. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात सकाळ-संध्याकाळी गारगार पाण्यात गरमागरम लज्जतदार चहा-कॉफी आणि खमंग भजी-मिसळ खाण्याचा आनंद लुटायचा असेल, तर कोल्हापूर जिल्ह्यातील धरणाच्या बॅकवॉटरमध्ये सुरू असलेल्या या विकेंड पर्यटन केंद्राला अवश्य भेट देता येईल. धरण काठावरील पावसाळ्यातील हे पर्यटन सध्या जोरात आहे.राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा आणि करवीर तालुक्यांतील जिथे-जिथे धरण, धबधब्यासारखी पाण्याची ठिकाणे आहेत. तेथील नदीकाठावर छत्र्या उभारून, खुर्च्या-टेबल टाकून कराओकेच्या तालावर गाणी गात गरमागरम चहा-कॉफी, कोल्ड्रिंक, खमंग भजी, वडा किंवा झणझणीत कोल्हापुरी मिसळचा नाश्ता, असे काठावरील पर्यटन जोरात सुरू आहे. यात मग कॅम्प फायर, वॉटर राईडिंग, एकवेळचे जेवण आणि पुन्हा चहा याचा या पर्यटनात समावेश आहे. दर विकेंडच्या शेवटी सकाळी ९ ते सायंकाळी ४ आणि दुपारी ३ रात्री ९ वाजेपर्यंत एक दिवसाच्या पर्यटनाशिवाय फार्म हाउस, तसेच तंबूतील रात्रीच्या मुक्कामाचाही पर्याय उपलब्ध आहे. या पर्यटन केंद्राचा बेळगाव, गोवा, पुणे, मुंबईसह दूरदूरच्या दहा ते १५ हजार पर्यटकांनी यापूर्वी आनंद घेतला आहे. डीपीसारख्या अनेक इन्फ्लुएंसर सोशल मीडियावर या पर्यटन केंद्राबद्दल सांगत आहेत. काही ठिकाणांची इन्स्टाग्रामवर स्वतंत्र पेजेसही आहेत. यात काळम्मावाडी, कोदे, गेळवडे यांसारख्या गावातील तरुणांनी एकत्र येऊन हा नवीन पर्यटन व्यवसाय सुरू केला आहे.
- जिल्ह्यात या पर्यटन केंद्रांना प्रारंभी वन विभाग आणि पाटबंधारे विभागाची परवानगी मिळवण्यात खूप अडचणी आल्या, त्यामुळे ग्रामपंचायतीच्या परवानगीने स्थानिक युवकांनी खासगी जागेत नदीच्या पाण्यात हे बॅक वॉटर टूरिझम सुरू केले आहे. नदीचा काठाबरोबरच थेट पाण्यात ब्रेकफास्ट हे याचे वैशिष्ट्य आहे. इथे लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही पाण्याचा, धबधब्याचा सहकुटुंब मनसोक्त आनंद घेता येतो.