टोल गेला, पैशाचे काय ? बँक गॅरंटीची रक्कम मिळणार नसल्याचे स्पष्ट
By Admin | Updated: June 7, 2016 07:39 IST2016-06-07T07:39:23+5:302016-06-07T07:39:38+5:30
महापौरांनी घेतली महापालिकेत बैठक शहर अभियंत्यांनी दिली माहिती

टोल गेला, पैशाचे काय ? बँक गॅरंटीची रक्कम मिळणार नसल्याचे स्पष्ट
कोल्हापूर : ‘आयआरबी’ कंपनीचा टोल शासनाने रद्द केला; पण कंपनीने केलेल्या कामाचे अंतिम मूल्यमापन अद्याप झालेले नाही. अपुऱ्या कामांची यादी महानगरपालिकेने शासनाला दिलेली आहे. टोल गेला असला तरी कोणी, किती पैसे द्यायचे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे ठेवण्यात आलेली बँक गॅरंटीची रक्कम महापालिकेला मिळणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे, अशी माहिती शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सोमवारी सायंकाळी झालेल्या आढावा बैठकीत दिली.
महापालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी महापौर अश्विनी रामाणे यांनी स्थायी समितीच्या छत्रपती ताराराणी सभागृहात महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत म्हणाले, घनकचरा व्यवस्थापनबाबत लाईन बाझार येथील इनर्ट मटेरियल टाकाळा लँडफिल्ड साईट व शुगरमिल परिसरात टाकण्याबाबत परवानगीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यास मान्यता मिळताच झुम येथील कचऱ्याचा प्रश्न निकाली निघणार आहे.
‘आयआरबी’चा टोल शासनाने रद्द केला असला तरी कंपनीने केलेल्या कामांचे अंतिम मूल्यमापन अद्याप झालेले नाही. तसेच तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या ७२ कोटींच्या कामाबाबतचे पालकमंत्र्यांसमोर सादरीकरण केले आहे.
बैठकीमध्ये श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास-तीर्थक्षेत्र आराखडा, नगरोत्थान प्रकल्पांतर्गत रस्त्यांची कामे, पाणीपुरवठा विभाग स्पॉट बिलिंगबाबत, शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन व पाणी गळती, आदी विषयांवर सविस्तर चर्चा केली.
पदाधिकारी, नगरसेवकांनी मांडलेल्या सूचनांची पूर्तता करून ही कामे पूर्ण करण्याच्या सूचना महापौर अश्विनी रामाणे यांनी दिल्या.
यावेळी आयुक्त पी. शिवशंकर, उपमहापौर शमा मुल्ला, स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव, महिला व बालकल्याण सभापती वृषाली कदम, छाया पोवार, शारंगधर देशमुख, सुनील पाटील, उमा बनछोडे, आदी अधिकारी उपस्थित होते.
कळंबा तलावाची पाणी क्षमता वाढणार
जलअभियंता मनीष पवार यांनी, कळंबा तलावातील ६० टक्के गाळ काढल्यामुळे २२५ द.लि. पाण्याची क्षमता वाढणार आहे. रंकाळ्याचा विकास आराखडा तयार केला आहे. काळम्मावाडी ते पुईखडी या ५२.४ कि.मी.पैकी १५ कि.मी. पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे.
शहरामधील १३.५ कि.मी. पैकी १० कि.मी. पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले. तसेच कसबा बावडा येथील सांडपाणी शुद्धिकरण प्रक्रिया केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. विश्व कंपनी काम करत नसल्याने या कंपनीस दर दिवसा दहा हजार रुपये दंड सुरू आहे.