टोलची आज धाड

By Admin | Updated: June 12, 2014 01:03 IST2014-06-12T00:56:41+5:302014-06-12T01:03:42+5:30

सर्व नाक्यांवर बंदोबस्त तैनात : कंपनीकडून नाके सज्ज

Toll today | टोलची आज धाड

टोलची आज धाड

कोल्हापूर : टोलनाक्यांची साफसफाई झाली, वसुलीसाठी कर्मचारी सज्ज आहेत, पोलीस बंदोबस्तही तयार आहे, फक्त वसुली सुरू करा, असा आदेश मिळायचा बाकी आहे. त्यामुळे उद्या, गुरुवारी दुपारी तीनपासून टोलवसुली सुरू होण्याची शक्यता आहे. त्यास पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांनीही ‘लोकमत’शी बोलताना दुजोरा दिला. ‘आयआरबी’ कंपनीने आज, बुधवारी दुपारपासूनच टोलवसुली सुरू करण्याचे नियोजन केले होते, परंतु प्रत्यक्षात टोलवसुलीचे धाडस दाखविले नाही.
सर्वोच्च न्यायालयाने ‘आयआरबी’ला टोलवसुलीसाठी पोलीस संरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आज पोलीस प्रशासनाकडून टोलनाक्यांवर पोलीस बंदोबस्त पुरविण्यात आला आहे. स्थानिक पोलीस, तसेच राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या प्रत्येक नाक्यावर तैनात करण्यात आल्या आहेत. शिरोली, शिये, शाहू, सरनोबतवाडी, उचगाव, कळंबा, वाशी नाका, फुलेवाडी, आर. के. नगर या नाक्यांवर काल, मंगळवारपासून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
वीज कनेक्शन, बल्बची सज्जता, जनरेटरची सोय करण्यात आली आहे. ‘आयआरबी’ने काल रात्रीच सर्व कर्मचाऱ्यांना आजपासून टोलनाक्यांवर उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे सकाळी आठ वाजल्यापासून शहरातील सर्वच्या सर्व म्हणजे नऊ नाक्यांवर कर्मचारी हजर झाले. ते वसुलीच्या आदेशाची प्रतीक्षा करीत होते. पहिली शिफ्ट संपून, दुसरी शिफ्ट सुरू झाली, तरी आदेश मिळाले नाहीत. ‘आयआरबी’चे कर्मचारी पोलिसांच्या संपर्कात होते आणि कर्मचारी त्यांच्या वरिष्ठांच्या आदेशाची वाट पाहात होते. मात्र, पोलीस अधीक्षक शर्मा यांनी कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा केल्यानंतर रस्त्यांचे मूल्यांकन करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याने किमान एक महिना ‘आयआरबी’ने वसुली करू नये, अशी सूचना पुढे आली. तसा निरोप ‘आयआरबी’ला देण्यात आला. ‘आयआरबी’च्या येथील अधिकाऱ्यांनी मुंबईतील त्यांच्या अधिकाऱ्यांशी बोलणी केली. तोपर्यंत सायंकाळ झाली होती. शेवटी टोलवसुलीची प्रक्रिया उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली. आता उद्या दुपारपासून टोलवसुलीला सुरुवात होणार असून, पोलीस अधीक्षक शर्मा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
टोलवसुली झाली तर कोल्हापुरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशारा महामोर्चाच्यावतीने जिल्हा प्रशासन व पोलिसांना देण्यात आला आहे. त्यामुळे पोलीसही काहीसे संभ्रमात आहेत. सध्या राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने कोल्हापुरात काही घडले तर त्याचे पडसाद विधिमंडळात उमटायला नकोत, अशी भूमिका पोलीस प्रशासनाची दिसते.
टोल देऊ नका
कोणत्याही वाहनधारकाने टोल देणार नाही, असे सभ्य भाषेत आयआरबीच्या टोलवसुली कर्मचाऱ्यांना सांगावे. टोल देणार नाही असे सांगितल्यानंतरही कर्मचाऱ्यांनी न ऐकल्यास त्यांच्याशी हुज्जत घालू नका. कर्मचाऱ्यांनी अरेरावी केल्यास याचे चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आपोआपच होणार आहे. अशा कर्मचाऱ्यांची तक्रार नाक्यावर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांकडे करा. टोलवसुली सुरू झाल्यास कोणत्याही परिस्थितीत टोल देऊ नका.
- निवास साळोखे (निमंत्रक - टोल विरोधी कृती समिती)
आयआरबीने टोलवसुलीची आगळीक करू नये
कोल्हापूरच्या जनभावनेचा आदर करून शासनाने प्रकल्पाचे मुल्यांकन करण्यासाठी तज्ज्ञ समिती नियुक्त केली आहे. महिन्याभरात तिचा अहवाल येणार आहे. तो आल्यानंतर प्रकल्पाचे पुढे काय करायचे याचा सकारात्मक निर्णय राज्य शासन घेईल. तोपर्यंत कंपनीने कोणत्याही परिस्थितीत टोलवसुली करण्याची आगळीक करू नये
- सतेज पाटील, गृहराज्यमंत्री
फुलेवाडीत बसविल्या के बीन
टोलविरोधी कृती समितीने जेव्हा टोलनाक्यांवर हल्ला चढविला होता, त्यावेळी नाक्यांवरील अनेक केबीन फोडल्या होत्या, तर फुलेवाडी येथील केबीन उखडून फेकून दिल्या होत्या. त्यामुळे बहुतेक सर्व केबीनची दुरुस्ती करण्यात आली आहे. फु लेवाडी येथे रस्त्यावर आज दुपारी केबीन बसविण्यात आली. सर्वच नाक्यांवर छोट्या चाकांवर सरकणारी लोखंडी बॅरिकेटस् ठेवण्यात आली आहेत. जनरेटर सज्ज ठेवण्यात आले आहेत. टोलवसुलीचे काम तीन शिफ्टमध्ये सुरू राहणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Toll today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.