‘टोलविरोधीं’नी गटारी पाडल्या उघड्या
By Admin | Updated: December 16, 2014 23:33 IST2014-12-16T23:01:09+5:302014-12-16T23:33:02+5:30
बंदिस्त गटारीत घाण : आरोग्य अधिकारी धारेवर; कृती समितीने केली राजारामपुरी परिसरात पाहणी

‘टोलविरोधीं’नी गटारी पाडल्या उघड्या
कोल्हापूर : राजारामपुरी परिसरातील बंदिस्त असलेल्या गटारींची पाहणी करण्यासाठी आज, मंगळवारी गेले असता सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने प्रभारी आरोग्य अधिकारी
डॉ. दिलीप पाटील, प्रभारी मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांना धारेवर धरले. यावेळी कार्यकर्त्यांनी या दोन अधिकाऱ्यांसमोर आयआरबी कंपनीवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली.
शहरात एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पामधून या कंपनीने रस्ते केले. रस्त्याच्या दुतर्फा बंदिस्त गटारी बांधल्या. पण, या गटारीमधील घाण अथवा कचरा काढण्यात आलेला नाही. याप्रश्नी आज राजारामपुरी मारुती मंदिरासमोरील मोठ्या बंदिस्त गटारीचे झाकण कार्यकर्त्यांनी दुपारी आरोग्य अधिकाऱ्यांच्या समोर काढले. यावेळी कचरा व प्लास्टिक साहित्य दिसल्यावर कार्यकर्त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांच्यावर आगपाखड केली.
पेट्रोल पंपाच्या दारातील तसेच दौलतनगरमधील गोखले विद्यालयासमोरील मोठ्या गटारीची अवस्था यापेक्षाही वेगळी होती. ही गटारेच मुजली होती. त्यामुळे सांडपाणी घरात येत असल्याच्या तक्रारीचा पाढा नागरिकांनी आरोग्य अधिकाऱ्यांसमोर मांडून आरोग्य निरीक्षक, मुकादम यांना जाब विचारला. त्यानंतर सर्वजण राजारामपुरी पोलीस ठाण्यात आले. कार्यकर्त्यांनी डॉ. दिलीप पाटील यांच्याकडे आयआरबीवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली.
यामध्ये बाबा इंदूलकर, बाबा पार्टे, अशोक पोवार, महादेव पाटील, दिलीप पवार, प्रसाद पाटील, महेश सासने, वैशाली महाडिक, चारुलता चव्हाण, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, श्रीकांत भोसले, सुरेश जरग आदींचा सहभाग होता.