बंदोबस्त मिळाला की टोल कधीही सुरु
By Admin | Updated: June 8, 2014 01:12 IST2014-06-08T01:12:03+5:302014-06-08T01:12:50+5:30
‘आयआरबी’ची तयारी : प्रशासन सहकार्य करत नसल्याची तक्रार

बंदोबस्त मिळाला की टोल कधीही सुरु
कोल्हापूर : कोल्हापूरातील वादग्रस्त रस्ते प्रकल्पातून टोल वसूली करण्यास पोलिस बंदोबस्त मिळाला की कोणत्याही क्षणी टोलवसूली सुरु करण्याची तयारी आयआरबी कंपनीने केली आहे. त्यासाठीची आवश्यक यंत्रणा कंपनीने सज्ज ठेवली आहे. दरम्यान कंपनीने स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन, पोलीस खाते आणि महापालिका प्रशासन योग्य ते सहकार्य करत नसल्याचा कांगावा करीत राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीच्या प्रती कंपनीने जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनाही पाठविल्या आहेत.
टोलविरोधात सोमवारी सर्वपक्षीयांच्यावतीने विराट महामोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे हा मोर्चा निघाल्यावर पोलिसांनी तातडीने बंदोबस्त द्यावा अशी कंपनीची मागणी आहे. त्यामुळे बंदोबस्त मिळाल्यास बहुधा बुधवारपासून (दि.११) टोलवसूली सुरु करण्याची कंपनीची तयारी आहे. त्यासाठी सुरुवातीला कांही दिवस संगणक न बसविता पावत्या फाडल्या जाणार आहेत. नऊपैकी पाच नाक्यांवरील सीसीटीव्ही यंत्रणा सज्ज आहे. कर्मचाऱ्यांना शेजारच्या गावांमध्ये आणून ठेवण्यातआलेआहे.
सर्वोच्च न्यायालयाने कोल्हापूर शहरातील टोलसंदर्भात दाखल झालेल्या याचिकेवरील अंतिम सुनावणी पूर्ण होऊन निकाल लागेपर्यंत आयआरबी कंपनीने अपूर्ण रस्ते तातडीने पूर्ण करावेत, निकृष्ट कामाचा दर्जा सुधारावा, त्याचबरोबर पोलिसांनी टोलवसुलीला पुरेसे पोलीस संरक्षण द्यावे, असा अंतरिम आदेश दिला आहे. त्यानुसार आयआरबी कंपनीने टोलवसुलीकरिता पुन्हा एकदा प्रयत्न सुरू केले आहेत. त्या दृष्टीने टोलनाके सज्ज ठेवले आहेत.तथापि, कोल्हापुरातील सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने टोलविरोधी महामोर्चा आयोजित केला आहे. त्यामुळे शहरातील वातावरण पुन्हा एकदा तणावपूर्ण बनण्याची शक्यता आहे.