‘टोलमुक्त कोल्हापूर’ हीच श्रद्धांजली

By Admin | Updated: February 27, 2015 00:19 IST2015-02-27T00:04:27+5:302015-02-27T00:19:09+5:30

पानसरे शोकसभेत मान्यवरांचे मनोगत : निर्णायक टप्प्यावर असताना आंदोलनातील सेनापती गेला

Told Free Toll Free Kolhapur | ‘टोलमुक्त कोल्हापूर’ हीच श्रद्धांजली

‘टोलमुक्त कोल्हापूर’ हीच श्रद्धांजली

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांनी पक्षीय चौकटीपेक्षा बहुजनांच्या, कष्टकऱ्यांच्या हिताची काळजी केली. गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेले टोलविरोधी आंदोलन निर्णायक टप्प्यावर असताना त्यातील महत्त्वाचा सेनापती आपल्यातून निघून गेला आहे; पण कोल्हापूर टोलमुक्त होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील आणि हीच पानसरेंना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत मान्यवरांनी शोकसभेत व्यक्त केले. कोल्हापुरातील विठ्ठल मंदिरात टोलविरोधी कृती समितीच्यावतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी अ‍ॅड. विवेक घाडगे होते. यावेळी समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे म्हणाले, या आंदोलनाला सुरुवात झाली तेव्हा अण्णांनी आपण दगडावर डोकं आपटतोय, ती तयारी ठेवून लढा आणि ज्याला जसं जमेल तशा पद्धतीने आंदोलन पुढे न्यायचे असा कानमंत्र दिला. त्यानुसार यापुढेही आंदोलन सुरू राहील. अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले, शाहू जन्मस्थळाचा प्रश्न पानसरे अण्णांमुळे मार्गी लागला. राजर्षी शाहू महाराजांचे पुरोगामित्व ते आपल्या भाषणातून मांडत होते. त्यांच्यावरचा हल्ला म्हणजे व्यक्तीवरचा नाही, तर कार्यकर्त्यांवरचा हल्ला आहे.
गणी आजरेकर यांनी ‘पानसरे, हम शरमिंदा है कि तेरे कातील अभी जिंदा है, पानसरे यांनी जातधर्म न पाहता सगळ्यांवर नि:स्सीम प्रेम केले, अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब देवकर यांनी अण्णांचे विचार जोपासणे हीच त्यांना श्रद्धांजली असेल, असे मत व्यक्त केले. पद्माकर कापसे यांनी अण्णांचा स्मृतिग्रंथ काढण्यात यावा, अशी सूचना केली. अध्यक्ष विवेक घाडगे म्हणाले, गोविंद पानसरे यांच्यावर हल्ला झालेला दिवस आणि त्यांच्या निधनानंतरचे दोन दिवस कोणीही ‘बंद’ची हाक न देता कोल्हापूरकरांनी बंद पाळून ‘विचार मारले जात नाहीत’ असे हल्लेखोरांना खणखणीत उत्तर दिले आहे. एवढी मोठी हानी होऊनही दगड उचलला गेला नाही, काडी पेटवली गेली नाही, ही अण्णांच्या विचारांची ताकद आहे. टोलमुक्ती झाल्यानंतर या आंदोलनाचे समर्पण पानसरेंना केले जाईल.यावेळी वैशाली महाडिक, ‘शेकाप’चे भारत पाटील, उदय लाड, अशोक पोवार, ‘मनसे’चे प्रसाद पाटील, ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी, भगवान काटे, प्रसाद जाधव, समीर नदाफ, आर्किटेक्ट राजू सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी किसन कल्याणकर, जयकुमार शिंदे, सुरेंद्र पन्हाळकर, संभाजी जगदाळे, जहिदा मुजावर, सुमन वाडेकर, मीरा मोरे, नीता राऊत शीतल तिवडे, सुनीता राऊत, अनिल सासने यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)



‘यांची’ चौकशी का नाही?
प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई म्हणाले, पानसरेंवरील हल्ल्याला ११ दिवस झाले तरी पोलिसांना त्यांचे मारेकरी शोधण्यात यश आलेले नाही. पुरोगामी नेत्यांची चौकशी करताना पोलिसांनी ‘आयआरबी’च्या मालकाची चौकशी का केली नाही? टोलनाक्यावर बसलेल्या गुंडांची चौकशी का केली नाही? चळवळी करणाऱ्यांचे खून होत राहतील आणि आपण फक्त श्रद्धांजली वाहणार का? असा प्रश्न उपस्थित केला.


सभेतील ठराव
गोविंद पानसरे यांना विचारांना जिवंत ठेवत व्याख्यानांचे आयोजन
स्मृतिग्रंथाचे प्रकाशन
पानसरे यांच्या व्याख्यानांची पुस्तके, सीडींचे प्रकाशन
अण्णांचे निधन झाले तो दिवस ‘शहीद दिन’ म्हणून साजरा करणार.

Web Title: Told Free Toll Free Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.