राजकीय बेरजेसाठी ‘मनशे’ एकत्र
By Admin | Updated: October 5, 2014 23:35 IST2014-10-05T00:40:20+5:302014-10-05T23:35:35+5:30
महाडिक-नरके-शेट्टींच्यात गुफ्तगू : ‘दक्षिण’च्या बदल्यात शिरोळसह चंदगडमध्ये संघटनेला मदतीची अपेक्षा

राजकीय बेरजेसाठी ‘मनशे’ एकत्र
राजाराम लोंढे ल्ल कोल्हापूर
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, कॉँग्रेसचे आमदार महादेवराव महाडिक व ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण नरके
यांच्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळी राजाराम साखर कारखान्यावर गुफ्तगू झाले. राधानगरी, चंदगड व शिरोळ मतदारसंघांत महाडिक गटाने ‘स्वाभिमानी’ला पाठबळ द्यायचे, त्याबदल्यात ‘स्वाभिमानी शेतकरी संघटना ‘दक्षिण’मध्ये ताकदीने अमल महाडिक यांच्या पाठीशी राहील, असे ठरल्याचे विश्वसनीय सूत्राकडून समजते. ‘करवीर’मध्ये स्वाभिमानीने चंद्रदीप नरके यांना सहकार्य करण्याची विनंती अरुण नरके यांनी शेट्टी यांना केली.
कॉँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप हे प्रमुख पक्ष स्वबळावर लढत असल्याने सर्वच मतदारसंघांत चुरशीच्या लढती आहेत. मतदान दहा दिवसांवर आले तरी अजूनही मतदारांचा अंदाज लागत नसल्याने उमेदवार गोंधळात आहेत. आपल्या मतांच्या पॉकेटशिवाय विरोधकांच्या मतांवर डल्ला मारल्याशिवाय विजय सोपा नसल्याची जाणीव झाल्याने पडद्याआड बेरजेची गणिते मांडली जात आहेत. ही बैठक म्हणजे अशा गणितांची जोडणी होती. ‘दक्षिण’मध्ये सतेज पाटील व अमल महाडिक यांच्यात चुरशीची लढत होत आहे. या मतदारसंघात पूर्वेकडील काही गावांत शेट्टी यांना मानणारा मतदार आहे. राज्यात शेट्टी हे भाजपसोबतच आहेत; परंतु संघटना या मतदारसंघात अजून प्रचारात कुठेच उतरलेली नाही. त्याचेही कारण आहे. लोकसभेला शेतकरी संघटनेच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या विनय कोरे यांना महाडिक भेटले होते. तसेच माजी आमदार सत्यजित पाटील यांना काँग्रेसकडे जोडून देण्यातही महाडिक यांनीच पुढाकार घेतल्याचा राग संघटनेला आहे. त्यामुळे युती असली तरी शेट्टी ‘दक्षिण’मध्ये ‘वचपा’ काढणार, हे उघड गुपित होते. ते लक्षात आल्यामुळेच महाडिक यांनी शेट्टी यांची मनधरणी सुरू केली आहे. त्या अनुषंगाने राजाराम कारखान्यावर महाडिक व शेट्टी यांच्यात सुमारे दीड तास चर्चा झाली. यामध्ये महाडिक यांनी ‘दक्षिण’मध्ये अमल यांच्या मागे ताकदीने उभे राहण्याची विनंती केली.
शेट्टी यांनी मदत करण्याची तयारी दर्शवली, पण त्याबदल्यात शिरोळ, राधानगरी व चंदगड मतदारसंघात महाडिक यांनी ‘स्वाभिमानी’च्या उमेदवारांना मदत करावी, अशी अट घातली. दोन्ही नेत्यांनी मदतीची ग्वाही दिल्याचे समजते. ‘करवीर’मध्ये चंद्रदीप नरके यांना मदत करण्याची विनंती अरुण नरके यांनी शेट्टी यांना केली. या मतदारसंघात भाजप-‘स्वाभिमानी’ युतीचा उमेदवार रिंगणात असल्याने तसे करता येणार नसल्याचे शेट्टी यांनी सांगितल्याचे समजते.