टोल हद्दपारसाठी आज महामोर्चा

By Admin | Updated: June 9, 2014 01:13 IST2014-06-09T01:03:03+5:302014-06-09T01:13:05+5:30

लाटणे घेऊन मोर्चाला या; महापौरांचे आवाहन

Today's mayhem for toll expulsion | टोल हद्दपारसाठी आज महामोर्चा

टोल हद्दपारसाठी आज महामोर्चा

कोल्हापूर : सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीतर्फे उद्या, सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चात महिलांनी हातात लाटणे घेऊन सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर सुनीता राऊत यांनी आज, रविवारी पत्रकार परिषदेद्वारे केले. यावेळी उपमहापौर मोहन गोंजारे यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वपक्षीय मोर्चात नगरसेवक सहभागी होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात झालेल्या बैठकीत महापौर राऊत म्हणाल्या, टोल आंदोलनाचा उद्याचा शेवटचा दिवस ठरो. उद्याच्या महामोर्चात शहरवासीयांनी इतक्या प्रचंड संख्येने उतरावे की, ज्यामुळे शासनाला टोल रद्द करणे भाग पडेल. जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद ठेवावीत. सर्व विद्यार्थ्यांनी मोर्चात सहभागी व्हावे. विशेषत: महिलांनी हातात लाटणे घेऊन मोठ्या संख्येने मोर्चात उतरून टोल लढाईत मला साथ द्यावी.
उपमहापौर मोहन गोंजारे यांनी, संपूर्ण शहरात यापूर्वीच जनजागरण मेळाव्याद्वारे टोलविरोधी मोर्चासाठी जागृती केली आहे. शासनाला जाग आणण्यासाठी विक्रमी संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. माजी स्थायी समिती सभापती राजू लाटकर म्हणाले, गेली तीन वर्षे कोल्हापूरकर टोलविरोधी लढा देत आहेत. ‘आयआरबी’ची मग्रुरी उतरण्यासाठी व टोलचे भूत गाढण्यासाठी नागरिकांनी मोर्चात सहभागी व्हावे. मोर्चाच्या माध्यमातून कोल्हापूरकरांनी आपली ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे.
स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण यांनी, उद्याचा महामोर्चा हा अंतिम व निर्णायक लढा आहे. यश दृष्टिक्षेपात आहे. कोल्हापुरातील टोल आंदोलनामुळेच राज्य शासनाने ३३ टोलनाके बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. महामोर्चा यशस्वी करून शासनास कोल्हापूरचा टोल रद्द करण्यास भाग पाडण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊया, असे सांगितले.
टोल यापूर्वीच पंचगंगेत बुडविला आहे. आता पुन्हा हातपाय मारण्याचा प्रयत्न ‘आयआरबी’ करीत आहे. आता पुन्हा एकदा पावसाळ्यात संपूर्ण बुडवून कोल्हापुरी हिसका दाखविल्याशिवाय येथील जनता स्वस्थ बसणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते मुरलीधर जाधव यांनी दिला. कोल्हापूरकरांनी यापूर्वीच टोल विरोधातील रोष व्यक्त केल्याने शासनस्तरावर टोल रद्द करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
त्यामुळे टोल रद्दचा निर्णय होण्याची शक्यता आहे. उद्याच्या मोर्चात वाहनधारकांनी वाहने बंद ठेवून सहभागी व्हावे, असे आवाहन कॉँग्रेसचे गटनेते चंद्रकांत घाटगे यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Today's mayhem for toll expulsion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.