तंबाखू करप्रश्नी व्यापाऱ्यांच्या नजरा मुंबईकडे
By Admin | Updated: January 10, 2015 00:25 IST2015-01-09T22:07:59+5:302015-01-10T00:25:58+5:30
साडेबारा टक्क्यांचा प्रश्न प्रलंबितच : अर्थ व नियोजन मंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष

तंबाखू करप्रश्नी व्यापाऱ्यांच्या नजरा मुंबईकडे
संदीप बावचे - जयसिंगपूर -अनुत्पादित तंबाखूवरील साडेबारा टक्केकराचा प्रश्न सोडविण्याबाबत नुकतेच अर्थ व नियोजनमंत्र्यांनी आश्वासन दिल्यामुळे तंबाखू व्यापाऱ्यांच्या नजरा त्यांच्या निर्णयाकडे लागून राहिल्या आहेत. व्हॅटप्रश्नी शासन कशाप्रकारे हा प्रश्न सोडवून व्यापाऱ्यांना दिलासा मिळणार, की तो पुन्हा लांबणीवर पडणार, याचीच उत्सुकता आहे.
तत्कालीन आघाडी शासनाने अर्थसंकल्पात सर्व प्रकारच्या अनुत्पादित तंबाखूवर साडेबारा टक्के मूल्यवर्धित कर प्रस्तावित केला होता. हा कर जयसिंगपूर शहरातील तंबाखू पेठेचे अस्तित्व पुसून टाकणारा ठरला. गेल्या दोन वर्षांपासून अनुत्पादित तंबाखूवरील साडेबारा टक्के कराचा प्रश्न भिजत पडला आहे. अद्याप शासनाने ठोस निर्णय न घेतल्याने शहरातील व्यापारी हा व्यवसाय नजीकच्या कर्नाटक राज्यात स्थलांतरित करण्याच्या पवित्र्यात आहेत.
तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे तंबाखू व्यापाऱ्यांच्या शिष्यमंडळाने अनेकवेळा निवेदने देऊन अनुत्पादित तंबाखूवरील साडेबारा टक्के व्हॅट कमी करावा. व्हॅटमुळे तंबाखू उद्योगावर विपरित परिणाम झाल्याचेही स्पष्ट केले होते.
व्हॅटमुळे तंबाखू उद्योगातील महिला, हमाल, गाडीवान यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याचेही लक्षात आणून दिले होते. मात्र, हा प्रश्न ‘जैसे थे’च राहिला. दरम्यान, २ जानेवारी रोजी अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यापारी शिष्टमंडळाला करप्रश्नी सकारात्मक निर्णय घेऊन दहा दिवसांत प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे.
यामुळे अर्थ व नियोजन मंत्र्यांच्या निर्णयाकडे व्यापाऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
आश्वासनांचाच पूर
अनुउत्पादित तंबाखू कराचा प्रश्न अजूनही ‘जैसे थे’च आहे. यामुळे प्रक्रिया तंबाखू पुरवठा करणाऱ्या जयसिंगपूर पेठेचे अस्तित्व मूल्यवर्धित करामुळे धोक्यात आले आहे. येथील तंबाखू पेठेवर घाला घालणारा हा कर रद्द करून या व्यवसायाला चालना देण्यासाठी व्यापाऱ्यांनी शासनाच्या प्रतिनिधींना अनेकवेळा साकडे घातले. मात्र, आश्वासनापलीकडे काहीच हाती लागलेले नाही.
व्यवसायावर अनेक हात अवलंबून
१९७१ पासून तंबाखू व इतर शेतीमालाच्या व्यवसायासाठी शहरातील व्यापारी पुढे आला. यामुळे तंबाखू पेठेला चांगला राजाश्रय मिळाला. गेल्या नऊ दशकांपासून देशभरातील विक्रेत्यांकडे येथील तंबाखू पाठविला जात आहे. एक हजार माथाडी कामगार, पाच हजार महिला कामगार, शंभर बैलगाडी वाहतूकदार या व्यवसायावर अवलंबून आहेत.