उद्योगांची धडधड आज थांबणार !
By Admin | Updated: February 27, 2015 00:18 IST2015-02-27T00:02:52+5:302015-02-27T00:18:47+5:30
वीज दरवाढीस विरोध : उद्योजक ‘महावितरण’वर मोर्चा काढणार; बिलांची करणार होळी

उद्योगांची धडधड आज थांबणार !
कोल्हापूर : वीज दरवाढीविरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजकांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. ते संघटितपणे आज, शुक्रवारी उद्योग बंद ठेवणार आहेत. शिवाय ‘महावितरण’ कार्यालयावर मोर्चा काढून याठिकाणी वीज बिलांची होळी करणार आहेत.वीज दरवाढीमुळे उद्योग मेटाकुटीला आले आहेत. वीजदर कमी व्हावेत यासाठी उद्योजकांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार, आमदारांना प्रत्यक्ष भेटून निवेदने दिली, चर्चा केली. त्यावर संबंधितांनी बैठक घेऊन वीजदर कमी करू, अशी आश्वासने दिली. गेल्या दोन महिन्यांपासून बैठकीचे दिलेले आश्वासन शासन पाळेल याची औद्योगिक संघटनांनी प्रतीक्षा केली. मात्र, कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्या पार्श्वभूमीवर ३ फेब्रुवारीला मुंबईत झालेल्या राज्यव्यापी वीजग्राहक व औद्योगिक संघटना राज्यस्तरीय समन्वय समितीने वीज दरवाढीविरोधात आंदोलन पुकारले आहे. त्यात जिल्ह्यातील उद्योजक सहभागी होणार आहेत. कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन, शिरोली मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन, कागल-पंचतारांकित असोसिएशन, आदींच्या नेतृत्वाखाली आज सर्व औद्योगिक वसाहतींतील उद्योग बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच सकाळी साडेनऊ वाजता सासने मैदान येथे एकत्रित येऊन उद्योजक आणि कामगार ताराबाई पार्क येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. त्यानंतर कार्यालयाच्या दारात वीज बिलांची होळी करणार आहेत. (प्रतिनिधी)
वीज दरवाढ कमी करण्याबाबत शासनाकडून निव्वळ आश्वासने देण्यात आली आहेत. उद्योग मेटाकुटीला आले आहेत. त्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यात संघटितपणे आंदोलन पुकारले आहे. आजच्या आंदोलनात जिल्ह्यातील उद्योजक, कामगार सहभागी होतील. राज्याच्या बजेटपूर्वी मुख्यमंत्र्यांनी याबाबत बैठक घ्यावी. शिवाय दरवाढ कमी करण्याबाबत ठोस निर्णय घ्यावा. दरवाढ कमी न झाल्यास एक तर उद्योग बंद करणे अथवा राज्यातून स्थलांतरित करणे, यापैकी एक पर्याय आम्ही निवडणार आहोत. सरकार सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे.
- सुरेंद्र जैन, अध्यक्ष, शिरोली मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन
इरिगेशन फेडरेशनतर्फे वीज बिलांची होळी
वीज दरवाढीविरोधात कोल्हापूर जिल्हा सहकारी पाणीपुरवठा संस्थांचा सहकारी संघातर्फे (इरिगेशन फेडरेशन) आज दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. शिवाय दुपारी एक वाजता ‘महावितरण’च्या कार्यालयासमोर वीज बिलांची होळी केली जाणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील, फेडरेशनचे पदाधिकारी बाबासाहेब पाटील-भुयेकर, वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे, आर. जी. तांबे, आदी करणार आहेत.