तीन हजार लाभार्थ्यांची पेन्शन पूर्ववत

By Admin | Updated: August 3, 2015 00:08 IST2015-08-02T23:21:10+5:302015-08-03T00:08:50+5:30

कागल तालुका : संजय गांधी निराधार योजनेच्या श्रेयवादासाठी मुश्रीफ-संजय घाटगे गटांकडून पत्रकबाजी

Three thousand beneficiaries pension reverted | तीन हजार लाभार्थ्यांची पेन्शन पूर्ववत

तीन हजार लाभार्थ्यांची पेन्शन पूर्ववत

कागल : कागल तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेतील जवळपास तीन हजार लाभार्थ्यांची बंद झालेली पेन्शन पूर्ववत सुरू करण्याबद्दल प्रशासकीय पातळीवर मंजुरी मिळाली असून, आॅगस्ट २०१५ मध्ये तीन महिन्यांच्या थकीत पेन्शनसह ही रक्कम लाभार्थ्यांना मिळणार आहे. मुश्रीफ गट आणि संजय घाटगे गटांकडून आता ही बंद पेन्शन आमच्यामुळेच कशी सुरू झाली, याबद्दल या लाभार्थ्यांना लेखी निवेदनाद्वारे सांगितले जात आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झाले. कागल तालुक्यातील पेन्शनधारक लाभार्थ्यांबद्दल राजकीय आरोप-प्रत्यारोप या निवडणुकीत झाले होते. सत्तांतरानंतर तालुक्यातील लाभार्थ्यांचा नव्याने सर्व्हे झाला. जेव्हा सर्व्हे झाला, तेव्हा नवीन समिती अस्तित्वात नव्हती. या चौकशी सर्व्हेमध्ये २९६७ लाभार्थी प्रथमदर्शनी अपात्र ठरविण्यात येऊन तहसीलदारांनी सुनावणी घेऊ न यावर निर्णय घ्यावा, असे आदेश झाले. तोपर्यंत त्यांची पेन्शनही बंद करण्यात आली.
यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली. ज्यांना पेन्शन मिळाली नाही ते हवालदिल झाले, तर इतर लाभार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. यामुळे आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली महिला आणि लाभार्थ्यांचा विराट मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला. जुलै २०१५ अखेर ही बंद पेन्शन पूर्ववत सुरू करून रक्कम वर्ग करण्याचे लेखी आश्वासन मोर्चावेळी तहसीलदार शांताराम सांगडे यांच्याकडून घेण्यात आले होते. त्यामुळे मुश्रीफ गटाचे प्रमुख नेते आणि या समितीचे माजी अध्यक्ष भैया माने यांनी एक पत्रे तयार करून प्रत्येक लाभार्थ्याला पाठविले आहे. आम्ही काढलेल्या मोर्चामध्ये ही बंद पेन्शन सुरू झाल्याचे या पत्रात सांगितले आहे.
विद्यमान अध्यक्ष आणि संजय घाटगे गटाचे प्रमुख कार्यकर्ते धनराज घाटगे यांनीही समितीच्यावतीने एक पत्र तयार करून या लाभार्थ्यांना पाठविले आहे. त्यामध्ये पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना आमचे नेते संजयबाबा घाटगे, प्रा. संजय मंडलिक समितीच्या सदस्यांसह भेटले आणि ही बाब लक्षात आणून दिली, म्हणून ही पेन्शन पूर्ववत सुरू झाली आहे, असे या पत्रात म्हटले आहे.


शासकीय धोरणानुसार ही पेन्शन पूर्ववत सुरू झाली आहे. थकीत पेन्शन देऊन नंतर त्यांची सुनावणी घेऊन पात्र-अपात्र लाभार्थी निश्चित करणार.
- शांताराम सांगडे,
तहसीलदार

Web Title: Three thousand beneficiaries pension reverted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.