कोरोनाची तिसरी लाट येण्याचीच शक्यता जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:27 IST2021-09-22T04:27:15+5:302021-09-22T04:27:15+5:30

कोल्हापूर : सध्या जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची आणि मृतांची संख्या कमी येत असली तरी तिसरी लाट येणारच नाही, असे गृहीत ...

The third wave of corona is more likely to come | कोरोनाची तिसरी लाट येण्याचीच शक्यता जास्त

कोरोनाची तिसरी लाट येण्याचीच शक्यता जास्त

कोल्हापूर : सध्या जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची आणि मृतांची संख्या कमी येत असली तरी तिसरी लाट येणारच नाही, असे गृहीत धरून व्यवहार करून चालणार नाही, असे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. लसीकरण झाले म्हणजे सर्व काही आलबेल आहे, असे समजून चालणार नाही. लस घेतल्यानंतरच्या नागरिकांच्या आरोग्यावरील परिणामांचा अभ्यास केला जात नाही. त्यामुळे देशभरातील १२ राज्यांमध्ये ज्या पद्धतीने कोरोना रुग्ण पुन्हा वाढत आहेत. त्याचीच पुनरावृत्ती कोल्हापूर जिल्ह्यातही होऊ शकते, असे आरोग्य विभागातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाच्या दोन्ही लाटांनी मोठ्या प्रमाणावर रुग्ण संसर्गित झाले होते. मृतांची संख्याही लक्षणीय आहे. अशा परिस्थितीत गेल्या महिनाभर नवी रुग्णसंख्या आणि मृत्यूसंख्याही घटली आहे. बाहेरील जिल्ह्यातून रुग्ण दाखल होण्याचे आणि मृत्यूचे प्रमाणही लक्षणीयरीत्या घटले आहे. त्यामुळे एक प्रकारची शिथिलता आली आहे. नागरिकांची बेफिकिरीही वाढली आहे. त्यामुळेच ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून किंवा नोव्हेंबरमध्ये पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

राज्य शासनानेही आकडे कमी येत असल्याने जिल्ह्यातील कोविड सेंटर्स बंद केली आहेत. कारण तेथील कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही कमी करण्यात आले आहे; परंतु हेच अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. कारण सातत्याने सर्वेक्षणाच्या माध्यमातून नागरिकांची आरोग्य स्थिती पाहण्याची जी गरज आहे त्याकडेच दुर्लक्ष होत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

चौकट

हे करण्याची गरज

१) ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले आहेत, अशा व्याधिग्रस्त नागरिकांची प्रतिकारशक्ती किती वाढली याचे मोजमाप करण्याची गरज.

२) कोरोनाग्रस्तांना ज्या इंजक्शन्सचा वापर करण्यात आला आहे, त्याचा त्यांच्या आरोग्यावर नेमका काय परिणाम झाला आहे. एकाच प्रकारची इंजेक्शन्स वापरण्यात आल्याचे फायदे-तोटे याचा अभ्यास करण्याची गरज

३) विदेशामध्ये अनेक देशांमध्ये तिसरी लाट सुरू झाली आहे. भारतातील बारा राज्यांमध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर इतर राज्यांतील आकडेवारी आणि पूर्वेतिहास याचा अभ्यास करून निरीक्षण मांडण्याची गरज.

चौकट

आधीचे साहित्य जपण्याची गरज

कोरोनाच्या दोन्ही लाटांचा सामना करताना जिल्ह्यात १०० कोटींहून अधिक किमतीची यंत्रणा आणि वैद्यकीय साहित्याची खरेदी करण्यात आली आहे. धांदलीच्या काळात ज्यांनी इच्छा व्यक्त केली त्यांना सेंटर्स उघडण्यासाठी परवानगी दिली. साहित्यही दिले. मात्र, ते साहित्य आता जागेवर आहे का. त्याची देखभाल कोण करते, हे पाहण्याची गरज आहे; अन्यथा पुन्हा जर संख्या वाढू लागली, तर साहित्य गेले कुठे, अशी विचारणा करण्याची वेळ येणार आहे.

चौकट

कोरोना दोन्ही लाटांमध्ये संसर्ग झालेले : १ लाख ५ हजार ७६१

कोरोनातून बरे झालेले : १ लाख ९९ हजार ३८२

कोरोनामुळे झालेले मृत्यू : ५ हजार ७५७

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण : ६२२

Web Title: The third wave of corona is more likely to come

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.