आली गणाधिशाची स्वारी...
By Admin | Updated: September 6, 2016 01:16 IST2016-09-06T00:57:24+5:302016-09-06T01:16:12+5:30
गणरायाचे जल्लोषात आगमन : पारंपरिक वाद्यांसह मोरयाचा गजर; घराघरांत धार्मिक वातावरण

आली गणाधिशाची स्वारी...
कोल्हापूर : ढोल-ताशांचा कडकडाट, फटाक्यांची आतषबाजी, दिव्यांचा मंद प्रकाश, धूप, अगरबत्तीच्या सुगंधाची दरवळ, फुलांच्या कमानी, माळा, आसन यांनी सजवलेली आरास, खीर-मोदकांसह पंचपक्वानांचा नैवेद्य आणि ‘गणपती बाप्पा मोरया..., मंगलमूर्ती मोरया...’च्या जयघोषात गणपती बाप्पा सोमवारी घराघरांत विराजमान झाले. पोलिस प्रशासनाने दिलेली ‘नो डॉल्बी’ची हाक गणेश चतुर्थीला तरी गणेश मंडळांनी ऐकत पारंपरिक वाद्यांना प्राधान्य दिले.
गेले महिनाभर लाखो कोल्हापूरकर ज्याच्या आगमनाची जय्यत तयारी करीत होते त्या गणेश चतुर्थीची पहाटच भक्तिमय वातावरणाने झाली. घरादाराची स्वच्छता करून महिलांनी दारात रंगीत रांगोळींचा गालिचा रेखाटला. दुसरीकडे स्वयंपाकघरात खिरीचा घमघमाट सुटला. घराच्या हॉलमध्ये श्री गणेशाची बैठक सजली. लहान मुलांपासून ते आजी-आजोबांपर्यंत कुणाचे हात पडदे लावण्यात गुंतले, तर कोण फुलांची आरास बनवतंय, सुवासिनी महिला पूजेची तयारी करीत होत्या. घरात ही धांदल सुरू असताना दुसरीकडे लहान मुलं, मुलींसह पुरुष मंडळी गणपती बाप्पांना घरी नेण्यासाठी कुंभार गल्लीत पोहोचली. कुंभार बांधवांनी घडविलेली गणेश मुर्ती घेऊन सगळे ‘गणपती बाप्पा मोरया..., मंगलमूर्ती मोरया....’चा गजर करीत घराकडे निघाली.
घरासमोर फटाक्यांची आतषबाजी झाल्यानंतर दहीभाताने बाप्पांची दृष्ट काढण्यात आली. सजविलेल्या आसनावर धार्मिक विधींनी गणेशमूर्तींची व गणोबाची प्रतिष्ठापना करण्यात आली. शेजारी समईचा आणि आरतीचा मंद प्रकाश, समोर पाच फळांची मांडणी झाली. आरती, सुवासिनी धूप अगरबत्तीच्या सुगंधाने घरात मंगलमयी वातावरणाची अनुभूती येत होती. आरतीनंतर खीर-मोदकांसह पक्वानांचा नैवेद्य बाप्पांना दाखविण्यात आला.
कुंभार गल्ली
गणेशमूर्ती घरी नेण्यासाठी नागरिकांनी सकाळपासून कुंभार गल्लीत गर्दी केली होती. परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. नागरिक बैलगाडी, सजवलेली हातगाडी, दुचाकी, चारचाकी अशा वाहनांतून गणेशमूर्ती नेत होते.
कुठे ताशांचा कडकडाट, कुठे सनईचे सूर, कुठे झांजपथकांचा ताल, तर कुठे लेझीमचा डाव अशा विविध प्रकारच्या वाद्यांच्या गजरात भाविक गणपती बाप्पाला आपल्या घरी नेत होते. अलोट गर्दीच्या व्यवस्थापनासाठी व सुरक्षेसाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात असला तरी नागरिक स्वत:हून शिस्तीचे पालन करीत असल्याने कोणताही गडबड, गोंधळ झाला नाही. याशिवाय कुंभारवाड्यात जाणारे रस्ते अडथळे उभारून बंद करण्यात आले होते. फक्त पायी जाणाऱ्या नागरिकांनाच प्रवेश दिला जात होता. दुसरीकडे मंडळांनीही गणेशमूर्ती नेण्यासाठी दुपारनंतर कुंभार गल्लीत गर्दी केली होती. गेल्या महिनाभरापासून पोलिस प्रशासनाने ‘नो डॉल्बी’ची हाक दिली आहे. त्यामुळे गणेश आगमनाच्या दिवशी तरी शाहूपुरी, गंगावेश परिसरात कुठेही डॉल्बी दिसला नाही.
पापाची तिकटी
पापाची तिकटी परिसरात घरगुती गणेशमूर्ती घरी नेण्यासाठी सकाळी सात वाजल्यापासूनच आबालवृद्धांनी गर्दी केली होती. सकाळी दहा ते बारा या काळात गंगावेश, पापाची तिकटी, कुंभार गल्ली, पानलाईन या परिसरात पाय ठेवायलाही जागा नव्हती. विशेष म्हणजे अनेकांना या काळातच गणपती घरी न्यायचे होते. त्यामुळे ढोल-ताशांच्या कडकडाटात अनेकांनी एकत्रितपणे गणपती घरी नेले. पट्टणकोडोली, मिरज, गडहिंग्लज, वडणगे, वडगाव, कागल, सिद्धनेली, आदी परिसरातून ढोलताशा पथके आली होती. त्यामध्ये प्रत्येक पथकात ५ ते ९ जणांना सहभाग होता. त्यात १५०० रुपयांपासून पुढे अशी सुपारीचा दर होता. त्यामध्ये अंतर किती याचा विचार करूनच दर ठरत होता.
बापट कॅम्प
बापट कॅम्प येथे सकाळपासूनच घरगुती गणेशमूर्तीसह मंडळांच्या मोठ्या गणेशमूर्ती नेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. शहर आणि ग्रामीण भागांतील काही सार्वजनिक तरुण मंडळांची रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी गणेशमूर्ती नेण्यासाठी धांदल सुरू होती.
बैलगाडी, उंट, बग्गी आणि रॉयल कार
गणरायाचे खरे वाहन उंदीर; पण ‘भाव तसा देव’ या उक्तीप्रमाणे बाप्पा दुचाकीपासून चारचाकीपर्यंत, बैलगाडीपासून, हातगाडीपर्यंत, रथापासून बग्गीपर्यंत अशा भक्तांच्या वाहनांत विराजमान होऊन जात होते. कुंभारवाड्यात सकाळपासून दारात आलेल्या भक्तांकडे त्यांची मूर्ती सुपूर्द करण्यासाठी कुंभारबांधवांच्या कुटुंबीयांची लगबग सुरू होती. जवळपास असलेले नागरिक पायी चालत गणपती घरी नेतात. याशिवाय केळीची धाटं, आंब्याची पानं, झुरमुळ््यांनी सजवलेली बैलगाडी, उंटाची सवारी, घोड्यांची सजवलेली बग्गी, रथ आणि मेबॅक कारप्रमाणे दिसणारी रॉयल कार अशा वाहनांतून बाप्पांची स्वारी भक्तांच्या घरी निघाली.
पठाण यांची सेवा
गणपती हा केवळ हिंदूधर्मीयांचाच नव्हे, तर अन्य धर्मांतील नागरिकांचेही आराध्य दैवत आहे. अशा सणवारात कोल्हापुरात हिंदू-मुस्लिम ऐक्याची प्रचिती देणारे अनेक अनुभव आहेत. असेच एक रिक्षाचालक अरिफ पठाण हे गेल्या पाच वर्षांपासून भाविकांच्या घरी मोफत गणेशमूर्ती पोहोच करतात. या उपक्रमात सातत्य राखत त्यांनी यंदाही सकाळी ८ वाजल्यापासून गंगावेश परिसरातून गणेशमूर्ती नेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना मोफत घरपोच सेवा दिली. दिवसभरात २० रिक्षांतून २५० अधिक फेऱ्या या रिक्षाचालकांनी केल्या. यामध्ये खुपिरे (ता.करवीर), शिंगणापूर, क्रांतिसिंह नाना पाटील नगर, कणेरकरनगर, पिराचीवाडी, सुभाषनगर, संभाजीनगर, राजारामपुरी, रुर्ईकर कॉलनी, सुर्वेनगर, उचगाव, आर. के. नगर आदी परिसरातील गणेश भक्तांना ही सोय पठाण यांच्या २० चालकांनी मोफत दिली.
‘पीओपी’ची मूर्ती विरघळण्याचा आज प्रयोग
कोल्हापूर : गणपती बाप्पांच्या आगमनाला एकच दिवस झाला असला तरी आज, मंगळवारी दीड दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. प्लास्टर आॅफ पॅरिसची मूर्ती पर्यावरणपूरक द्रावणामध्ये विरघळविण्याचा प्रयोग आज पर्यावरणप्रेमींकडून होणार आहे. प्लास्टर आॅफ पॅरिसची गणेशमूर्ती विरघळत नाही, शिवाय त्यावरील रंगांमुळे जलप्रदूषण होत असल्याने या मूर्ती विसर्जनाचा प्रश्न गेल्या काही वर्षांत पुढे आला आहे. मात्र, त्यावर नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे यांनी संशोधन करून मूर्ती काही तासांतच विरघळविण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे. सेवानिवृत्त शास्त्रज्ञ डॉ. मोहन डोंगरे, बी. बी. पोळ, डॉ. शुभांगी उंबरकर यांनी त्यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत. पर्यावरणपूरक द्रावणामध्ये पीओपीची मूर्ती ठेवणे किंवा हे द्रावण अखंडपणे मूर्तीवर घालणे असे दोन पर्याय आहे. दुसऱ्या पर्यायामुळे मूर्ती २४ ते ४८ तासांत विरघळते, असे दिसून आले आहे. हा प्रयोग पंचगंगा नदीघाट येथे सकाळी साडेदहा वाजता होणार आहे.
असा असेल यंदाचा उत्सव
४सोमवारी, ५ सप्टेंबर : आगमन
४मंगळवार, ६ सप्टेंबर : दीड दिवसांच्या गणेशाचे विसर्जन
४गुरुवारी, ८ सप्टेंबर : गौरी आवाहन
४शुक्रवारी, ९ सप्टेंबर : गौरी पूजन
४शनिवारी, १० सप्टेंबर : घरगुती गौरी-गणेश विसर्जन
४गुरुवारी, १५ सप्टेंबर : सार्वजनिक गणेश विसर्जन-अनंत चर्तुदशी