एफआरपी एवढाही दर नाही
By Admin | Updated: January 11, 2015 00:46 IST2015-01-11T00:44:38+5:302015-01-11T00:46:52+5:30
अजित पवार यांचा शेट्टींना टोला : शेतकरी नेत्यांचे धोरण बोटचेपेपणाचे

एफआरपी एवढाही दर नाही
कोल्हापूर : राज्यातील शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपी एवढा दरही मिळत नसताना राज्य व केंद्र सरकारने हस्तक्षेप करायला पाहिजे होता; परंतू सरकारने काहीच केलेले नाही. आम्ही सत्तेत होतो त्यावेळी आक्रमक असणाऱ्या शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी यावेळी बोटचेपेपणाचे धोरण स्वीकारले आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना केली.
भाजपच्या नेत्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आकर्षक आश्वासने देऊन सत्ता मिळविली आणि आता सत्तेत आल्यावर त्यांनी आश्वासनांना बगल देऊन सर्वसामान्य जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत, असा घणाघातही पवार यांनी भाजपवर केला.
ते म्हणाले की, भाजप नेत्यांनी काळा पैसा भारतात आणतो म्हणून सांगितले, पण तो आणणे काही त्यांना जमले नाही. शेतकरी अवकाळी पावसाने घाईला आला आहे; परंतु त्यांना कसलीही मदत केली नाही. उसाला एफआरपी एवढा दरही मिळत नाही .एलबीटी विनाअट रद्द करतो म्हणून व्यापाऱ्यांना आश्वासन दिले, पण आता केंद्र सरकारचा जीएसटी येऊ दे, मग आम्ही एलबीटी रद्द करतो, असे सांगायला लागले आहेत. सत्तेत आल्यावर एक महिन्यात टोल रद्द करण्याचे आश्वासन दिले; परंतु टोल रद्द करणे सोडाच त्यांच्याच काळात आता नव्याने पालघरला टोलनाके सुरू केले.