कचरा टाकायला जागा नाही, मग द्या पेटवून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:24 IST2021-03-27T04:24:23+5:302021-03-27T04:24:23+5:30
कदमवाडी : सध्या शहरात कचऱ्याची समस्या गंभीर होत असून, कचरा टाकण्यासाठी जागा नसल्याने पालिकेचे कर्मचारी जागा मिळेल तेथे कचरा ...

कचरा टाकायला जागा नाही, मग द्या पेटवून
कदमवाडी : सध्या शहरात कचऱ्याची समस्या गंभीर होत असून, कचरा टाकण्यासाठी जागा नसल्याने पालिकेचे कर्मचारी जागा मिळेल तेथे कचरा टाकून तो जाळत आहेत. सध्या कोल्हापूर शहरात कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. कचरा टाकण्यासाठी प्रकल्पस्थळावर जागाच नसल्याने कचरा गाडी लाइनमध्ये लावावी लागत आहे. त्यात वेळ खूप जास्त असल्याने पालिकेचे कर्मचारी गोळा केलेला कचरा गाडीतून काढून जागा मिळेल तिथे पेटवून देत आहेत. परिणामी यामुळे प्रदूषण वाढण्याची भीती आहे.
शहरात रोज जमा होणाऱ्या २०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी कोल्हापूर ग्रीन कंपनीला ठेका दिला होता. मात्र, कंपनीने ठरलेल्या नियमानुसार कचरा प्रक्रिया न नेल्याने प्रकल्प स्थळावर कचऱ्याचे ढीग साचून राहिले. कालांतराने कंपनीनेच काम बंद केले. पालिकेने वारंवार सांगूनदेखील कंपनीने काम चालू केले नसल्याने पालिकेने तो प्रकल्प आपल्या ताब्यात घेतला खरा, पण पालिकेसही शक्य तितका कचरा प्रक्रिया करणे शक्य नसल्याचे चित्र आहे. प्रकल्पातील पूर्वीपासून असणारा ढीग व रोज नव्याने येणारा कचरा यामुळे सध्या कचरा टाकायला जागा शिल्लक नाही.
रोज घंटागाडीद्वारे जमा होणारा कचरा प्रकल्पावर टाकला जातो. मात्र, येथे कचरा टाकायला जागा नसल्याने गाड्यांची रांग लागत आहे. त्यामुळेच ज्यावेळेस कचरा गोळा करायचा तो वेळ रांगेत जात असल्याने घंटागाडी प्रत्येक गल्लीत वेळेवर पोहोचत नाही. परिणामी नागरिक कचरा कोंडाळ्यात किंवा जागा मिळेल तिथे टाकतात. साठविलेल्या कचऱ्यामुळे गाडी एक-दोन गल्लीत फुल्ल होते. अशा वेळेस गाडीवरील कर्मचारी गोळा केलेला कचरा गल्लीच्या कोपऱ्यावरच पेटवून देत असल्याचे चित्र आहे, तर काही झाडू कामगारही कोंडाळ्यात टाकलेला कचराही पेटवून देत आहेत.
फोटो : २६ कदमवाडी कचरा
ओळ : प्रभागात गोळा केलेला कचरा प्रकल्प स्थळावर रांगेत वेळ जात असल्याने जागा मिळेल तिथे पेटवून दिला जातो.(छाया-दीपक जाधव)
--------------