मंदिराच्या मूळ सौंदर्याला बाधा नको
By Admin | Updated: June 10, 2016 00:51 IST2016-06-10T00:51:50+5:302016-06-10T00:51:50+5:30
भाविकांचा विकास अपेक्षित : परंपरा, व्यवस्था यांचा विचार करून आराखडा हवा...

मंदिराच्या मूळ सौंदर्याला बाधा नको
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराचा विकास आराखडा जनतेसमोर सादर होणार आहे. या प्रकल्पाच्या निमित्ताने मंदिराचाच नव्हे तर कोल्हापूर शहराचा विकास होणार आहे. तो होत असताना भक्त आणि कोल्हापूरचा रहिवासी म्हणून नागरिकांच्या काही अपेक्षा आहेत. त्या पार्श्वभूमीवर मंदिराचा विकास आराखडा कसा असावा, यासंबंधी लोकभावनांची मांडणी आजपासून...!
अन्य देवस्थानांप्रमाणे अंबाबाई मंदिराचा विकास झालाच पाहिजे. हे मंदिर अतिप्राचीन आणि सुरेख बांधणीचे आहे. त्यामध्ये प्रवेश केला की भाविकाला प्रसन्न शांततेची अनुभूती आली पाहिजे. मात्र येथील सौंदर्याला बाधा आणणाऱ्या अनेक गोष्टी परिसरात आहेत.
अनावश्यक बॅरिकेटस, पूल, पाय धुण्याच्या टाक्या, लटकत्या वायरी, देवस्थानच्या केबिन्स, अडगळीच्या वस्तू अशामुळे हे सौंदर्य लुप्त झाले आहे. त्या हटवून मंदिराचे मूळ सौंदर्य प्रकाशात यायला हवे. ओवऱ्यांतील दुकानांचे अन्यत्र पुनर्वसन करून परिसर मोकळा करावा. अन्य मंदिरांचाही विचार व्हावा. मंदिर हा असा केंद्रबिंदू आहे, ज्यावर अनेकांचा चरितार्थ आहे. विकास आराखड्यामुळे त्यांचे आयुष्य बाधित होणार नाही याची काळजी घेतली जावी. आत्ता फोट्रेस कंपनीने प्रत्यक्ष परिसराचा विचार न हा आराखडा बनविला आहे. कंपनीच्या लोकांनी कार्यालयात बसून आराखडे बनवायचे आणि प्रशासकीय यंत्रणेने त्यांना मान्यता द्यायची असे होऊ नये, अन्यथा विरोध नक्की. विरोधामुळे मंदिराचा विकास थांबायला नको. मंदिरातील परंपरा, व्यवस्था आणि भाविकांचा विचार करून त्यांना सामावून घेणारा विकास येथे अपेक्षित आहे. - अजित ठाणेकर
(श्रीपूजक, नगरसेवक)
दर्शनमंडप हवे का ?
विद्यापीठ गेट येथे सात कोटी रु पये खर्चून साडेसातशे भाविक सामावतील असा दर्शन मंडप उभारणार आहेत. मात्र, खरंच याची आवश्यकता आहे का, याचा विचार व्हावा. गाभाऱ्यापर्यंत जाणारी रांग पूर्व दरवाजातून असून ती योग्य आहे. आरसीसी इमारत उभारून सौंदर्य बिघडविण्यापेक्षा पूर्व दरवाजा येथील इमारतींचा वापर दर्शन मंडप म्हणून केला जावा. येथेच प्रसाधनगृह व्हावे.
कपिलतीर्थ मार्केटचा विचार व्हावा
कपिलतीर्थ मार्केट येथे पहिल्या मजल्यावर पार्किंग आणि वरच्या मजल्यावर भाजी विक्रेते किंवा व्यावसायिकांचे पुनर्वसन करता येईल. शिवाय व्हीनस कॉर्नर येथील महापालिकेच्या जागेतही पार्किंगची सोय करून भाविकांना शटल सर्व्हिस देता येईल.