नगराध्यक्षांवर अविश्वास प्रस्तावाच्या हालचाली सुरू
By Admin | Updated: June 3, 2015 01:02 IST2015-06-03T00:35:46+5:302015-06-03T01:02:24+5:30
इचलकरंजी नगरपालिका : कॉँग्रेस-‘शविआ’च्या खेळीमध्ये बिरंजे यांचा बळी जाण्याची शक्यता

नगराध्यक्षांवर अविश्वास प्रस्तावाच्या हालचाली सुरू
इचलकरंजी : नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांच्या पदास एक वर्ष होण्यास दीड महिना राहिला असताना त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रीय कॉँग्रेस व शहर विकास आघाडी यांच्यातील राजकीय कुरघोड्यांच्या खेळीमध्ये बिरंजे यांचा बळी जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सन २०११ मध्ये झालेल्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ५७ नगरसेवकांच्या इचलकरंजी पालिकेत राष्ट्रीय कॉँग्रेसचे २९ नगरसेवक निवडून आल्याने बहुमत मिळाले. म्हणून कॉँग्रेसने नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदासाठी अनुक्रमे रत्नप्रभा भागवत व बाळासाहेब कलागते यांची निवड केली; पण काठावरील बहुमत असल्याने राष्ट्रवादीलाही सत्तेत घेऊन आघाडी केली. अशा पालिकेत कॉँग्रेसचे २९, राष्ट्रवादीचे ११ व शहर विकास आघाडीचे १७ नगरसेवक असे बलाबल आहे.
पहिल्या अडीच वर्षांनंतर सर्वसाधारण महिला असे नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले. त्यामुळे या अडीच वर्षांत जास्तीत जास्त नगरसेविकांना नगराध्यक्षपदाची संधी देता यावी म्हणून प्रत्येक पाच महिन्यांसाठी नगराध्यक्ष करण्याची घोषणा कॉँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी केली. त्याप्रमाणे शुभांगी बिरंजे या नगराध्यक्षपदी निवडल्या गेल्या. त्यांना देण्यात आलेली पाच महिन्यांची मुदत डिसेंबरमध्ये संपली असताना त्यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आणि बंड केले. नगराध्यक्षा बिरंजे यांच्या बंडास शहर विकास आघाडी व कारंडे गट या दोघांनी पाठिंबा दिला.
नगराध्यक्षपदी असलेल्या व्यक्तीस एक वर्षापर्यंत अविश्वास ठराव आणता येत नाही, अशी कायद्यामध्ये तरतूद असल्याने बिरंजे यांच्यावर अविश्वास आणता येत नव्हता आणि बहुमत असूनही विरोधात बसण्याची नामुष्की टाळायची असेल तर त्यांना सहकार्य करण्याशिवाय अन्य पर्याय नसल्याने अखेर कॉँग्रेसने आणि राष्ट्रवादीतील जांभळे गटाने पाठिंबा दिला. पाठिंबा देताना नगराध्यक्षांना विधायक, जनतेच्या विकासाच्या आणि नागरी सेवा-सुविधांसाठी पाठिंबा देत असल्याचे दोन्ही कॉँग्रेसकडून सांगण्यात आले. आता नगराध्यक्षांच्या बंडाला पाठिंबा देऊन पाच महिने उलटले. या कालावधीत शहर विकास आघाडीला म्हणावी तशी किंमत मिळाली नाही आणि बहुतांशी नगरसेवक-नगरसेविकांची प्रभागातील कामे झाली नाहीत. त्यामुळे ‘शविआ’मध्ये नाराजी पसरली. या संधीचा फायदा घेत ३० मे रोजीच्या सभेत कॉँग्रेस आक्रमक झाली. पाणी टंचाईच्या प्रश्नावर कॉँग्रेसने प्रशासनाचे वाभाडे काढले. यावेळी काही मुद्द्यांवर नगराध्यक्षांनाही लक्ष्य बनविण्यात आले.
पालिकेमध्ये कामे होत नाहीत आणि कॉँग्रेस आक्रमक झाल्याने अस्वस्थ झालेल्या ‘शविआ’ने नगराध्यक्षांना दिलेल्या पाठिंब्यांचा फेरविचार करण्याचे ठरवले. नेमकी हीच वेळ साधून काही प्रमुखांची एक गुप्त बैठक कॉँग्रेसने आज (मंगळवारी) घेतली. बैठकीमध्ये बिरंजे यांच्या नगराध्यक्षपदासाठी एक वर्ष होण्यास अद्याप दीड महिन्यांचा कालावधी असला तरी त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू करण्यास सुरूवात करावी, असे निश्चित करण्यात आले. अशा हालचाली होत असल्याच्या वृत्ताला कॉँग्रेसमधीलच एका उच्चपदस्थाने नाव उघड न करण्याच्या अटीवर दुजोरा दिला. (प्रतिनिधी)
४कारण नगराध्यक्षांवरील अविश्वास प्रस्तावासाठी एक द्वितीयांश नगरसेवकांच्या सह्या लागतील. आणि अविश्वास प्रस्तावाच्या सभेस तीन चतुर्थांश म्हणजे ४४ नगरसेवक-नगरसेविका सभागृहात प्रस्तावाच्या बाजूने हजर ठेवावे लागतील.
तोपर्यंत बिरंजेंचे नगराध्यक्षपद अढळ
नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांना आमदार सुरेश हाळवणकर यांचे अभय आणि ‘शविआ’ व राष्ट्रवादीतील कारंडे गटाचा पाठिंबा आहे. तोपर्यंत बिरंजे यांचे नगराध्यक्षपद अढळ आहे. त्या उर्वरित दीड वर्षाचा कालावधीसुद्धा पूर्ण करतील.
कारण नगराध्यक्षांवरील अविश्वास प्रस्तावासाठी एक द्वितीयांश नगरसेवकांच्या सह्या लागतील. आणि अविश्वास प्रस्तावाच्या सभेस तीन चतुर्थांश म्हणजे ४४ नगरसेवक-नगरसेविका सभागृहात प्रस्तावाच्या बाजूने हजर ठेवावे लागतील.
मात्र, ‘शविआ’ व कारंडे गट यांचे बलाबल २१ असल्याने ५७ नगरसेवकांच्या सभागृहात या दोघांना वगळून ४४ संख्या होतच नाही, अशी ग्वाही ‘शविआ’च्या एका पदाधिकाऱ्याने बोलून दाखवली.