राज्याला ६ महिने पुरेल इतकी साखर कोल्हापुरात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:22 AM2021-08-01T04:22:06+5:302021-08-01T04:22:06+5:30

राजाराम लोंढे लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्याला ६ महिने पुरेल इतकी साखर एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गोडावूनमध्ये ...

There is enough sugar in Kolhapur for the state for 6 months | राज्याला ६ महिने पुरेल इतकी साखर कोल्हापुरात पडून

राज्याला ६ महिने पुरेल इतकी साखर कोल्हापुरात पडून

Next

राजाराम लोंढे

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : राज्याला ६ महिने पुरेल इतकी साखर एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गोडावूनमध्ये पडून आहे. मागील हंगामात उत्पादीत झालेल्या साखरेपैकी ६५ टक्के म्हणजेच ११ लाख ४१ हजार टन साखर शिल्लक असल्याने कारखान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. सर्वाधिक साखर १ लाख ५८ हजार टन ‘जवाहर’ कारखान्याकडे असून, ‘कुंभी’कडे ९१ हजार टन साखर पडून असून, हंगाम तोंडावर आल्याने या साखरेचे करायचे काय? असा प्रश्न कारखान्यांसमोर आहे.

गेले तीन-चार हंगाम साखर कारखानदारी दुष्टचक्रातून जात आहे. साखरेचा दर प्रतिक्विंटल ३,१०० आणि ऊसाला प्रतिटन ३ हजार रुपये दर असल्याने गणित बिघडल्याने कारखानदारांची दमछाक होत आहे. मागील २०२०-२१ हा हंगाम सुरु करण्यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील २१ कारखान्यांकडे ६ लाख ७७ हजार ५५६ टन साखर शिल्लक होती. त्यामध्ये १७ लाख ५५ हजार ७७० टन साखरेचे उत्पादन झाले. त्यातून १ ऑक्टोबर २०२० ते ३० जून २०२१पर्यंत १२ लाख ९२ हजार २३८ टन साखरेची विक्री झाली. त्यामुळे आता तब्बल ११ लाख ४१ हजार ८७ टन साखर कारखान्यांच्या गोडावूनमध्ये पडून आहे. राज्याला ३० ते ३५ लाख टन साखर वर्षाला लागते. त्यामुळे राज्याला किमान सहा महिने पुरेल इतकी साखर सध्या कोल्हापुरात पडून आहे.

प्रत्येक कारखान्याला अडीच कोटी व्याजाचा भुर्दंड

साखर गोडावूनमध्ये पडून असली तरी त्यावर व्याज सुरु आहे. पोत्याला (१०० किलो) दिवसाला १ रुपया व्याजापोटी द्यावा लागतो. त्यामुळे केवळ व्याजावर प्रत्येक कारखान्याला किमान दोन ते अडीच कोटींचा भुर्दंड पडतो. बँकांकडे शिल्लक असलेली १० टक्के उचल ही व्याजपोटीच जाते.

दीड लाख टन साखर उघड्यावर

दोन वर्षांच्या साखरेने गोडावून फुल्ल झाल्याने मागील हंगामात कारखान्यांनी उघड्यावर साखर ठेवली होती. अनेक कारखान्यांची या पावसातही साखर तशीच आहे. साधारणत: दीड लाख टन साखर उघड्यावर असून, पावसामुळे तिचे खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे.

निर्यात कोटा २५ लाख टन वाढविणे गरजेचे

केंद्राने राज्यासाठी साखरेचा ६० लाख टन निर्यात कोटा दिला होता. तो संपला असून, साखरेची गोडावून मोकळी करण्यासाठी किमान २५ लाख टन निर्यात कोटा देण्याची मागणी कारखान्यांकडून होत आहे.

कोट-

साखरेची समस्या पाहता, १५० रूपये वाहतूक अनुदानाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे दिला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या साखर २,७५० रुपये क्विंटल आहे. केंद्राने साडेतीनशे रुपये अनुदान दिले तर बऱ्यापैकी मार्ग निघू शकतो.

- पी. जी. मेढे (साखर उद्योगातील तज्ञ)

कारखानानिहाय शिल्लक साखर टनात -

कारखाना साखर

वारणा ६५,१४०

भोगावती ५५,७२२

राजाराम ४०,६४७

शाहू ७२,६९६

दत्त, शिरोळ ८३,२८२

बिद्री ७४,७८०

नलवडे, गडहिंग्लज ३४,६९७

जवाहर १,५८,५८२

मंडलिक, हमीदवाडा ३७,७७३

कुंभी ९१,७९२

पंचगंगा ५९,०५७

शरद ४४,१७९

गायकवाड, सोनवडे ७,१३६

डी. वाय. पाटील ३०,१५३

गुरुदत्त ४८,८४०

इको केन १८,०२५

हेमरस ४०,६३४

रिलायबल २०,२७५

घोरपडे ४७,५३१

डालमिया ७४,५३७

इंदिरा २९,७४१

एकूण ११,४१,०८७

Web Title: There is enough sugar in Kolhapur for the state for 6 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.