मग पोहायला जायचं कुठं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:23 IST2021-04-04T04:23:17+5:302021-04-04T04:23:17+5:30
कोल्हापूर : कोरोनामुळे हे जलतरण तलाव सर्वसामान्यांसाठी अद्यापही खुली झालेले नाहीत. त्यामुळे मुलांना धोकादायक पोहण्याच्या ठिकाणापासून रोखायचे कसे आणि ...

मग पोहायला जायचं कुठं
कोल्हापूर : कोरोनामुळे हे जलतरण तलाव सर्वसामान्यांसाठी अद्यापही खुली झालेले नाहीत. त्यामुळे मुलांना धोकादायक पोहण्याच्या ठिकाणापासून रोखायचे कसे आणि मुलांनी सुरक्षित पोहायला जायचे कुठे, असा सवाल पालकांच्या मनात उठला आहे.
उन्हाळा सुरू झाल्यानंतर शहरातील मुले जलतरण तलावावर, तर ग्रामीण भागातील मुले नदी, विहिरी, तलावावर पोहण्यास जातात. ही नियमित बाब होऊन बसली आहे. मात्र, कोरोना लॉकडाऊनमुळे शहरातील ८ जलतरण तलाव २५ मार्च २०२० ते ऑक्टोबर २०२० पर्यंत बंद होते. त्यानंतर शासनाने केवळ जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जलतरणपटूंना पोहण्याचा सराव करण्याकरिता परवानगी दिली. त्यामुळे सर्वसामान्य हौशी मुले, मुली पोहण्यापासून अजूनही वंचित राहिली आहेत. पोहण्याची ही हौस भागविण्यासाठी शाळकरी मुले धोका पत्करून विहिरी, नदी, नाले, आदी ठिकाणी जात आहेत. त्याचाच परिणाम म्हणून शुक्रवारी दिवसभरात तीन शाळकरी व एक तरुणाचा बुडून मृत्यू झाला. त्यात कोरोनाचा कहर वाढू लागल्यामुळे शहरातील जलतरण तलावही बंद करण्याचा विचार जिल्हा प्रशासन करीत आहे. सद्य:स्थितीत कोल्हापूर शहरातील आठ पैकी पाच जलतरण तलाव केवळ जलतरणपटूंच्या सरावाकरिता खुले आहेत. अन्य सर्वसामान्य मुलांकरिता ते बंद आहेत, तर तीन तलाव अद्यापही बंद अवस्थेत आहेत.
शहरातील जलतरण तलावांची स्थिती अशी,
शहरात शिवाजी स्टेडियम, पीजीटी जलतरण तलाव, रेसिडेन्सी जलतरण तलाव, राष्ट्रीय जलतरणपटू सागर पाटील जलतरण तलाव, शांतिनिकेतन जलतरण तलाव हे तलाव केवळ जलतरणपटूंच्या तयारीकरिता सुरू आहेत. येथे सर्व प्रकारची एसओपी पाळली जाते, तर महापालिकेचा रमणमळा जलतरण तलाव नूतनीकरणानंतर कोरोनाचा कहर वाढू लागल्यामुळे आठ दिवस बंद करण्यात आला आहे. अंबाई टँक, शाहू जलतरण तलाव बंद आहेत.
ही काळजी घ्या
-पाण्याचा अंदाज, तज्ज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आवश्यक.
-अतिउत्साह, स्पर्धा टाळा
- सुरक्षेची साधने वापरावीत. गाळ असेल तर त्या ठिकाणी पोहण्यास जाऊ नये.
- पालकांनीही मुलांसोबत पोहण्यासाठी जाणे अधिक सुरक्षित
- माहिती नसलेल्या विहिरी, तलाव, नदी, नाले, आदी ठिकाणी पोहण्यास जाऊ नये.
कोट
सद्य:स्थितीत केवळ जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या जलतरणपटूंकरिता मोजकेच तलाव सुरू आहेत. तेथे कोरोनासहित सुरक्षेची सर्व मानके पाळली जातात.
अजय पाठक, जलतरण पंच, सचिव, मॉडर्न पेंट्याथॉलॉन असोसिएशन ऑफ कोल्हापूर