रंगभूमी म्हणजे समाजमन मांडण्याचे सशक्त माध्यम--ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर वर्तक
By Admin | Updated: August 26, 2015 23:22 IST2015-08-26T23:22:15+5:302015-08-26T23:22:15+5:30
पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेला शनिवारी प्रारंभ होत आहे. यानिमित्त ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर वर्तक यांच्याशी साधलेला थेट संवाद...

रंगभूमी म्हणजे समाजमन मांडण्याचे सशक्त माध्यम--ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर वर्तक
समाजात घडणाऱ्या चांगल्या-वाईट घटनांचे प्रतिबिंब मांडण्याचे सशक्त माध्यम म्हणजे रंगभूमी. तरुणाईच्या सळसळत्या चैतन्याला वैचारिक बैठक देत त्यांच्यातील कला-गुणांना आणि पर्यायाने कोल्हापुरातील नाट्यचळवळीला अधिक कृतीशील बनवणाऱ्या पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेला शनिवारी प्रारंभ होत आहे. यानिमित्त ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर वर्तक यांच्याशी साधलेला थेट संवाद...
प्रश्न : पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची पार्श्वभूमी काय ?
उत्तर : ज्येष्ठ रंगकर्मी पुरुषोत्तम वझे यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रीय कलोपासक पुणे यांनी या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेला प्रारंभ केला. प्रख्यात रंगकर्मी राजाभाऊ नातू, मधू म्हेतर यांनी ही स्पर्धा रूजवण्यासाठी फार परिश्रम घेतले. महाविद्यालयीन तरुणाईतील अभिनय कौशल्य, लेखन, सादरीकरणाचे तंत्र, दिग्दर्शन अशा विविध अंगांनी कला-गुणांचा विकास करणाऱ्या या स्पर्धेत जुन्या, जाणत्या प्रथितयश लेखकांसोबतच नवोदित लेखकांच्याही दर्जेदार एकांकिका सादर होऊ लागल्याने आपसूकच पुरुषोत्तम करंडकला एक मानाचे स्थान मिळाले. गेली ५० वर्षे या स्पर्धेने हा मान टिकवून ठेवल्याने ‘पुरुषोत्तम’मध्ये सहभागी होणे हे विद्यार्थ्याचे स्वप्न असते. याच स्पर्धेने डॉ. जब्बार पटेल, सतीश आळेकर, मोहन गोखले, अतुल पेठे, रवींद्र मंकणी, माधुरी पुरंदरे, सोनाली कुलकर्णी असे कितीतरी गुणवंत कलाकार रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्राला दिले म्हणजे ‘पुरुषोत्तम’चे स्वरुप केवळ स्पर्धात्मक नाही तर त्यातून तरुणाईचे करिअरही घडविते.
प्रश्न : कोल्हापुरात पुरुषोत्तम करंडक सुरू करण्यामागे उद्देश काय होता?
उत्तर : महाराष्ट्राला फार मोठी नाट्यपरंपरा आहे. त्याचे संचित नव्या पिढीशी जोडणारी ही स्पर्धा पुण्यात चांगल्या पद्धतीने रूजली पण ही नाट्य चळवळ महाराष्ट्रभर चालवली जावी, असे राजाभाऊ नातूंचे स्वप्न होते. कोल्हापूरच्या मातीलाही या कलावंतांचा सुगंध आहे, गायन समाज देवल क्लबचेही सांस्कृतिक क्षेत्रातील काम त्यांना माहीत होते. म्हणून राजाभाऊ हयात होते तेव्हा पूर्वी एकदा ही स्पर्धा येथे झाली होती पण ती पुढे जाऊ शकली नाही, पण देवल क्लबच्या नाट्यशाखेची नाटके पुण्यात ‘पुरुषोत्तम’ गाजवत होती. तोच धागा पकडून पाच वर्षांपूर्वी कोल्हापुरातच गायन समाज देवल क्लब आणि महाराष्ट्रीय कलोपासकच्या विद्यमाने या ‘पुरुषोत्तम करंडक’च्या प्राथमिक फेरीला प्रारंभ झाला. स्पर्धेचे यंदाचे सहावे वर्ष आहे. त्यात देवल क्लबच्या उमा नामजोशी, सुबोध गद्रे, श्रीकांत डिग्रजकर, अरुण डोंगरे, डॉ. आशुतोष देशपांडे, रोहित पाटील, केदार कुलकर्णी ही मंडळी झोकून देऊन काम करतात. यंदा शिवाजी विद्यापीठानेही मोलाचे सहकार्य केले.
प्रश्न : गेल्या पाच वर्षांत स्पर्धेचे फलित काय आहे?
उत्तर : देवल क्लबतर्फे एकांकिका वाचन स्पर्धा गेल्या २२ वर्षांपासून घेतली जाते. पण कोल्हापुरात महाविद्यालयीन पातळीवर गॅदरिंग किंवा युवा महोत्सवसारखे कार्यक्रम होत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्यातील अभिनयासह लेखन, दिग्दर्शन, प्रकाश, नेपथ्य, संगीत विविध कलांचे सादरीकरण करण्यासाठी व्यासपीठ नाही. ‘पुरुषोत्तम’च्या निमित्ताने हे पहिल्यांदाच घडले आणि महाविद्यालयांमध्ये वातावरण तयार झाले. ‘माईलस्टोन’ एकांकिकांपासून ते नवे प्रश्न मांडणाऱ्या नव्या संहितेपर्यंतच्या माध्यमातून समाजमन विद्यार्थी मांडतात. यातूनच गेल्या पाच वर्षांत कोल्हापुरात नवनवीन कलावंत घडत आहेत. राज्य नाट्यसारख्या विविध स्पर्धांमध्ये त्यांचा सहभाग वाढतो आहे.
प्रश्न : कोल्हापूरच्या रंगभूमी चळवळीमध्ये पुरुषोत्तम करंडकने काय योगदान दिले, असे आपल्याला वाटते?
उत्तर : कोल्हापूरला फार मोठी नाट्यपरंपरा असली तरी मध्यंतरीचा काळ खडतर होता. या स्पर्धेमुळे तरुणाई नाट्यक्षेत्रात येऊ लागलीच पण गेल्या काही वर्षांत मोजक्या दोन-तीन संस्थांभोवती फिरत असलेली प्रायोगिक रंगभूमी चळवळ विस्तारली गेली आहे. नवनवीन संस्था, कलावंत उदयाला येत आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत जवळपास पाचशे ते सहाशे विद्यार्थी सहभागी होतात. स्वातंत्र्य-स्वैराचार, नव्या पिढीचे प्रश्न, जातीयवाद, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार, राजकारण असे अनेक सामाजिक प्रश्न हाताळतात आणि त्याची उत्तरेही शोधतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये असलेली वैचारिक बैठक अधिक पक्की होते म्हणूनच येथील थंड पडलेली रंगभूमी चळवळ पुन्हा घडण्यात पुरुषोत्तमचेही योगदान मानायला हवे.
प्रश्न : स्पर्धेच्या निमित्ताने काय आवाहन कराल?
उत्तर : रंगभूमीची चळवळ पुढे चालवायची असेल तर महाविद्यालयांनीही त्यात पुढाकार घ्यायला हवा. त्याला प्राचार्य आणि सांस्कृतिक विभागातील प्राध्यापकांनी चालना द्यायला हवी. पुरुषोत्तम करंडक ही स्पर्धा असली तरी ती निकोप व्हायला हवी. स्पर्धा हे फक्त निमित्त असते, विद्यार्थ्यांनी त्याकडे व्यासपीठ म्हणून पाहायला हवे.
- इंदुमती गणेश