कोल्हापूर : करवीर, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यांत अनेक वर्षे ठिय्या मारलेल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या उर्वरित नऊ तालुक्यांत मंगळवारी बदल्या करण्यात आल्या. तब्बल सहा तास चाललेल्या या प्रक्रियेत ११३ बदल्या करण्यात आल्या. अनेकांची या तालुक्यातून उचलबांगडी केल्याने काहीशी नाराजी व्यक्त करण्यात येत होती.मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव आणि सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये समुपदेशनाच्या माध्यमातून या बदल्या करण्यात आल्या. २३ मे २०२५च्या शासन निर्णयानुसार या बदल्या करण्यात आल्या. प्रशासकीय आणि विनंती व आपसी बदली करताना समानीकरणाचे तत्त्व पाळले गेल्यामुळे अनेकांना बदल्यांवेळी मोठी उत्सुकता होती. ज्येष्ठता यादीनुसार समुपदेशनावेळी रिक्त जागांची निवड करता येत असल्याने कनिष्ठांना मिळेल त्यातील गाव निवडावे लागत होते.
ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या ८२ प्रशासकीय, विनंती ११, आपसी २०, अशा एकूण ११३ बदल्या करण्यात आल्या. तर पंचायत विभागाच्या विस्तार अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय एक आणि विनंती दोन, अशा तीन बदल्या करण्यात आल्या. सर्व बदली पात्र ग्रामपंचायत अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी संघटना पदाधिकाऱ्यांच्या समोर पडद्यावर संगणक प्रणालीद्वारे रिक्त जागा दाखवून पारदर्शीपणे या बदल्या करण्यात आल्या असल्याचे जिल्हा परिषदेच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
शाळेसारखा गोंधळविद्यार्थी जसा दंगा आणि गोंधळ घालतात तसे वातावरण बदलीच्या ठिकाणी दिसून येत होते. जिल्हा परिषदेच्या चौथ्या मजल्यावरील नवीन सभागृहात ही प्रक्रिया झाल्याने या मजल्यावर मोठी गर्दी झाली होती. सभागृहातही एखाद्याचा गाव निवडताना गोंधळ झाला की बाकीचे त्यांना सूचना करत होते. त्यामुळे सातत्याने सर्वांना बोलू नका, शांत राहा अशा सूचना द्याव्या लागत होत्या.