आर.टी.ओ विभागाची मेहरबानी, वडापचालकांची दमदाटी
By Admin | Updated: July 18, 2014 23:25 IST2014-07-18T23:20:21+5:302014-07-18T23:25:12+5:30
मृत्यूचा सापळा : कोल्हापूर-गारगोटी मार्गावर अपघात नित्याचे

आर.टी.ओ विभागाची मेहरबानी, वडापचालकांची दमदाटी
अमर पाटील-कळंबा _
नऊ प्रवासी व ड्रायव्हर हा नियम प्रादेशिक परिवहन विभागाने गारगोटी वडापधारकांना अपवाद ठेवला असावा. कारण काल (गुरुवारी) ड्रायव्हरसह १६ प्रवासी घेवून जाणारी जीप समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोला धडकून एक ठार, १६ प्रवासी जखमी झाले. कळंबा-गारगोटी मार्गावरील हा जिवघेण्या प्रवासाचा थरार नित्याचाच असून चार वर्षांपूर्वी डंपर व वडाप ट्रॅक्स अपघातात दोन मृत्यूमुखी पडले होते त्यापेक्षाही कालचा अपघात भयावह होता.
फोर्ड कॉर्नर, संभाजीनगर व कळंबा येथून गारगोटी प्रवासी मिळविण्यासाठी वडापधारकांत स्पर्धा चालते. पण या मार्गावर तीन शाळा, आय.टी.आय., कळंबा ग्रामपंचायत, तीन मंगल कार्यालये, कळंबा जेल, मंडईमुळे प्रचंड वर्दळ. पण तरीही ‘रोख बाय ठोक’ व्यवहाराने वेगाकडे दुर्लक्ष करीत वडाप जोरात सुरु असते.
दर गुरुवारी आदमापूरला भेट देणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी या मार्गावर असते. त्यामुळे गुरुवार हा वडापवाल्यांचा धंद्याचा दिवस. जनावरे कोंबल्याप्रमाणे माणसे कोंबलेल्या, व कांही जण लोंबकळत जात असणाऱ्या वडाप गाड्यांची स्पर्धा या मार्गावर पाहायला मिळते. धंदा तेजीत चालणाऱ्या या गुरुवारने नेमके अपघातास निमंत्रण दिले. कालबाह्य झालेले ब्रेक, कमी असणाऱ्या गुळगुळीत चाकांच्या वेगमर्यादा नसणाऱ्या या गाड्यांवर वाहतूक नियंत्रक विभागाची नजर नसावी, हे आश्चर्य वाटण्यासारखे आहे.
त्यामुळे भरधाव वेगाचा हा जीवघेणा खेळ थांबणार कधी, वडापधारकांवर कार्यवाही होणार कधी, या प्रश्नाचे उत्तर प्रादेशिक परिवहन विभागच देऊ शकेल.