‘गोकुळ’, ‘केडीसीसी’त तिसऱ्या पर्यायाची चाचपणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:26 IST2021-02-09T04:26:31+5:302021-02-09T04:26:31+5:30
(संपतराव पवार यांचा फोटो वापरावा) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्हा बँक (केडीसीसी) व ‘गोकुळ’च्या निवडणुकीत समविचारी ...

‘गोकुळ’, ‘केडीसीसी’त तिसऱ्या पर्यायाची चाचपणी
(संपतराव पवार यांचा फोटो वापरावा)
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्हा बँक (केडीसीसी) व ‘गोकुळ’च्या निवडणुकीत समविचारी मंडळींना सोबत घेऊन पर्याय देण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती ‘शेकाप’चे ज्येष्ठ नेते, माजी आमदार संपतराव पवार यांनी दिली. जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेत तीन लाखांपर्यंत बिनव्याजी पीक कर्ज देण्याचा निर्णयाचे स्वागत करतो, मात्र त्यापेक्षाही कर्ज मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय घेतला असता तर त्याचा फायदा सामान्य शेतकऱ्यांना झाला असता, असेही त्यांनी सांगितले.
दूध उत्पादक शेतकऱ्यांचे फार चांगले चालले असे नाही, आजही त्यांच्या घामाचे दाम मिळत नाही. यासाठी कोणी बोलण्यास तयार नाही. ‘गोकुळ’च्या लढाईत राजकीय ईर्षा पाहावयास मिळते, समाजकारण कोठे आहे? जिल्हा बँकेने तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय घेतला. त्याचा फायदा मूठभर लोकांना होणार आहे. खऱ्या अर्थाने पीक कर्जाची मर्यादा ४० हजारांहून ५० हजार रुपयांपर्यंत करणे अपेक्षित होते. खावटी कर्ज १३ ते १४ टक्क्यांनी घ्यावे लागते, त्यात सवलत दिली असते तर चांगले झाले असते. या सगळ्यातून सामान्य माणसांची फसवणूक होते याचे भान कोणालाच नसल्याचे संपतराव पवार यांनी सांगितले.
‘गोकुळ’, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमची मर्यादित ताकद असेलही; मात्र सामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नांची लढाई आम्हाला लढावीच लागेल. बाराही तालुक्यात आमची ताकद आहे, करवीर व राधानगरीमध्ये आम्ही आव्हान उभे करू शकतो. आमच्यासोबत समविचारी मंडळी आली तरी सक्षम पर्याय देऊ शकतो. असे संपतराव पवार यांनी सांगितले.
प्रश्नांऐवजी अभिनंदनासाठीच रांग
जिल्हा बँकेच्या सभेत ताळेबंदावर प्रश्न विचारण्याऐवजी संचालक मंडळाच्या अभिनंदनासाठीच रांग लागली होती, अशी टीकाही पवार यांनी केली.