आदर्श निवडणुकीसाठी ‘तेरणी पॅटर्न’!
By Admin | Updated: December 19, 2014 00:46 IST2014-12-19T00:37:45+5:302014-12-19T00:46:59+5:30
सहकाराला मार्गदर्शक : बिनपैशाची निवडणूक

आदर्श निवडणुकीसाठी ‘तेरणी पॅटर्न’!
राम मगदूम - गडहिंग्लज --कोणत्याही सहकारी संस्थेची निवडणूक लागली की, संस्थेवर पडणाऱ्या निवडणूक खर्चाचा बोजा, उमेदवारांकडून होणारी पैशांची उधळपट्टी, सत्ता संघर्षातील आरोप-प्रत्यारोप, ईर्षा आणि हेवेदाव्यांमुळे त्या संस्थेतील, किंबहुना गावातील वातावरणच बिघडून जाते. मात्र, गडहिंग्लज तालुक्यातील तेरणीच्या बसवेश्वर सहकारी दूध संस्थेने राबविलेली बिनपैशाची निवडणूक प्रक्रिया सहकारी क्षेत्राला मार्गदर्शक ठरली आहे.
ज्येष्ठ सेंद्रिय शेतीतज्ज्ञ अरुण देसाई यांच्या मार्गदर्शनाखालीच गावात महात्मा बसवेश्वरांच्या नावानेच दूध व पतसंस्था स्थापन झाल्या. स्थापनेपासून या संस्थांच्या सर्वच निवडणुका बिनविरोध झाल्या. मात्र, खुल्या वातावरणात पारदर्शक लोकशाही पद्धतीने संचालक मंडळ निवडण्यासाठी त्यांनी ही नवी संकल्पना तीन वर्षांपूर्वी राबवली. त्याची नियमावलीदेखील वार्षिक सभेत मंजूर करून घेतली.
सर्वसाधारण खुला, महिला, आर्थिक दुर्बल व मागास अशा चार गटांतून संचालक मंडळाची निवड केली जाते. वेगवेगळ्या रंगांच्या कागदावर मतदार यादी व मतपत्रिका तयार केल्या. मतदार याद्या संस्थेच्या सूचना फलकावर प्रसिद्ध केल्या.
मतपत्रिका टाकण्यासाठी चार सीलबंद मतपेट्या कार्यालयात ठेवल्या. प्रत्येक गटातून निवडावयाच्या संचालकांची नावे लिहून मतपेटीत संकलित केली. निरक्षर सभासदांना प्रतिनिधीमार्फत ‘मत’ नोंदविली.
आठवडाभर मतदान घेऊनदेखील मतदान न केलेल्या सभासदांच्या घरोघरी मतपेट्या फिरवून १०० टक्के मतदान नोंदविले. सभासदांनी स्वेच्छेने लेखी नोंदविलेल्या मतपत्रिकांवरून संचालक मंडळाची रचना केली. त्यासाठी प्राधान्यक्रमाचाही वापर केला. राज्य निवडणूक प्राधिकरणाने सहकारी संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात जारी केलेल्या खर्चिक व वादग्रस्त फतव्याच्या पार्श्वभूमीवर अनुकरणीय ‘तेरणी पॅटर्न’ची चर्चा सुरू आहे.
अर्ज, अनामत, प्रचार नाही
उमेदवारी अर्ज नाही, अनामत रक्कम नाही, सूचक-अनुमोदक व प्रचाराचीही गरज नाही, अशा पद्धतीने बिनपैशाची ही निवडणूक झाली. त्यासाठी संस्थेचा व उमेदवारांचाही रुपया खर्च झाला नाही. ४०० सभासद व दररोज १२५० लिटर दूध संकलन असणाऱ्या या संस्थेने आदर्श निवडणूक पद्धतीचा वस्तुपाठच घालून दिला आहे.
‘विश्वास आणि विश्वस्त’
खुल्या वातावरणात मोठ्या विश्वासाने सभासदांनी संचालकांना निवडले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने विश्वस्ताच्या भूमिकेतूनच काम सुरू असून, आपलीच संस्था असल्याची भावना संचालक व सभासदांतही आहे.