तहसीलदार, अव्वल कारकूनच जबाबदार

By Admin | Updated: October 18, 2015 01:22 IST2015-10-18T00:37:40+5:302015-10-18T01:22:17+5:30

डीडी गहाळ प्रकरण : निलंबित लिपिक सुप्रिया शिंदे यांचे म्हणणे

Tehsildar, the top politicians are responsible | तहसीलदार, अव्वल कारकूनच जबाबदार

तहसीलदार, अव्वल कारकूनच जबाबदार

कोल्हापूर : मस्कत प्रशासनाकडून अपघाती नुकसान भरपाईच्या आलेल्या २३ लाख ३९ हजार २९४ रुपयांच्या ‘डीडी’ गहाळप्रकरणी सर्वसाधारण शाखेच्या तहसीलदार सुनीता नेर्लीकर व अव्वल कारकून विद्या गवारी याच जबाबदार असल्याचे खुलासावजा म्हणणे निलंबित लिपिक सुप्रिया शिंदे यांनी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याकडे सादर केले आहे. बळीचा बकरा बनवून आपल्याला या प्रकरणात गुंतविले जात असल्याने न्याय मिळावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. त्यामुळे लिपिक शिंदे यांच्याबरोबरच अव्वल कारकून व तहसीलदारांवर केव्हा कारवाई होणार? हे पाहावे लागणार आहे.
डीडी गहाळ प्रकरणात लिपिक सुप्रिया शिंदे यांना निलंबनाचे आदेश थेट त्यांच्या घरच्या पत्त्यावर पाठविले. त्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी आपले म्हणणे जिल्हाधिकाऱ्यांना सादर करून आपल्याला या प्रकरणात नाहक गुंतवून बळीचा बकरा केला जात असल्याचे म्हटले आहे. हा ‘डीडी’ १८ फेब्रुवारी २०१५ रोजी प्राप्त झाला होता. त्यावेळी आपल्याला कार्यरत होऊन अवघे चार ते पाच महिने झाले होते. त्यामुळे शासकीय कामाचा कोणताही अनुभव अथवा कार्यालयाची माहिती नव्हती. तसेच कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण व मार्गदर्शनही मिळाले नव्हते. या प्रकरणात कार्यालयीन प्रमुख म्हणून सर्वसाधारण शाखेच्या तहसीलदार सुनीता नेर्लीकर यांना विचारले असता त्यांनी ‘तू नवीन आहेस. त्यामुळे तुला हा विषय समजणार नाही. हा विषय तुझ्या डोक्याबाहेरील आहे,’ असे म्हटले होते. ‘तू टपालाचे काम बघ,’ असे सांगून त्या दिवशी त्यांनी आपल्याला केबिनबाहेर जायला सांगून हा विषय अव्वल कारकून गवारी यांच्याकडे सोपविला. त्यानंतर हा विषय गवारीच सांभाळत होत्या.
गवारी यांनी तहसीलदार नेर्लीकर यांना ही रक्कम पहिल्यांदा जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याबद्दल दहा ते बारा वेळा विचारणा केली होती; परंतु त्यांनी वारसदारांची माहिती व कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी चंदगड तहसीलदारांकडून अहवाल घेण्याचे सूचित केले होते. त्यानुसार १३ मार्चला अहवाल मागणी करण्यात आली. त्यानुसार चंदगड तहसीलदारांनी ७ एप्रिलला अहवाल पाठविला. तो प्राप्त होताच ‘डीडी’ची मुदत संपणार म्हणून ही रक्कम वारसदारांना देण्याबाबत मान्यता मिळण्यासाठी मिळालेल्या सूचनेनुसार ९ एप्रिलला जिल्हाधिकाऱ्यांकडे टिप्पणी सादर केली होती. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांची सही होऊन ती सर्वसाधारण शाखेकडे ११ मे रोजी प्राप्त झाली होती.
मुदत संपल्याने : गवारी यांनी डीडी नेला
१२ मे रोजी आपण व अव्वल कारकून गवारी हा डीडी भरण्यासाठी स्टेट बॅँक आॅफ इंडिया, कोषागार शाखेत गेलो होतो. त्यावेळी तेथून या ‘डीडी’ची मुदत संपल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तो डीडी गवारी या आपल्या पर्समधून घेऊन गेल्या. तेथून पुढे तो कुठे गेला हे माहीत नाही. याबाबत विचारणा केल्यावर आपल्याला उडवाउडवीची उत्तरे मिळाली.
कै. नितीश यांचे वारसदार आल्यावर त्यांनी लिपिक या नात्याने माझ्याकडे बोट दाखवायला सुरुवात केली व मला यात नाहक गुंतवण्यात आले. तरी जिल्हाधिकाऱ्यांनी मला न्याय द्यावा. (प्रतिनिधी)

Web Title: Tehsildar, the top politicians are responsible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.