शिक्षक बँकेचे ‘रण’ तापल
By Admin | Updated: November 13, 2014 00:00 IST2014-11-12T23:50:59+5:302014-11-13T00:00:42+5:30
रणधुमाळी जानेवारीनंतर : आरोप-प्रत्योरापाच्या फैरी सुरूे

शिक्षक बँकेचे ‘रण’ तापल
प्रविण देसाई - कोल्हापूर --कोट्यवधींची उलाढाल असलेल्या प्राथमिक शिक्षक सहकारी बॅँकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जानेवारीनंतर ही निवडणूक होण्याची शक्यता असल्याने इच्छुकांनी आतापासून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सध्या जे
आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत, ते म्हणजे निवडणुकीचीच रंगीत तालीम आहे. शिक्षक संघटनांतील वर्चस्वाची लढाई ही बँकेच्या निवडणुकीतही येते. त्यामुळेच जे राजकारण संघटनांमध्ये होते तेच बँकेच्या निवडणुकीतही होणार असल्याने त्याची धरपकड आतापासूनच सुरू झाली आहे. बँकेत सत्ता असली की, संघटनेच्या राजकारणावरही पकड ठेवता येते म्हणूनच या निवडणुकीत जोरदार चुरस पाहावयास मिळते.
या बँकेची राजकीय लढाई ही शिक्षक संघ की शिक्षक समिती अशी होत राहिली; परंतु बॅँकेच्या २००९ च्या निवडणुकीत शिक्षक संघ, शिक्षक समिती व पुरोगामी शिक्षक समिती, अशी तीन पॅनेल रिंगणात होती. संघ एकसंध राहिला व समितीत फूट पडल्याचा फायदा संघाच्या पॅनेलला झाला; पण आता होऊ घातलेल्या निवडणुकीत उलटे चित्र दिसत आहे. शिक्षक समितीतील राजेंद्र पाटील, कृष्णात कारंडे आणि पुरोगामीचे प्रसाद पाटील, भिवाजी काटकर हे एकत्र येण्याच्या तयारीत आहे, तर संघातील राजाराम वरुटे, नामदेव रेपे यांच्या विरोधात संभाजीराव थोरात यांना मानणारा विलास पाटील, एस. व्ही. पाटील यांचा गट मैदानात उतरण्याची चिन्हे आहेत. एकेकाळी राजकारणग्रस्त झालेली ही बँक राजाराम वरुटे अध्यक्ष झाल्यावर काही प्रमाणात सुरळीत आली. त्यांच्या सर्वसमावेशक कारभारामुळे सलग अध्यक्षपदाची संधी मिळाली. फेब्रुवारी महिन्यात विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपली; परंतु नवीन सहकार प्राधिकरणामुळे सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुकांना मुदतवाढ मिळाली. त्यामुळे या संचालक मंडळाला जादा कालावधी मिळाला. जानेवारी २०१५ नंतर निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. सद्य:स्थितीला कोण रिंगणात उतरणार, किती पॅनेल तयार होणार, हे स्पष्ट झालेले नाही.