‘तौउते’मुळे जिल्ह्यातील २४.४२ हेक्टरला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:21 IST2021-05-24T04:21:48+5:302021-05-24T04:21:48+5:30

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘तौउते’ चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका कोकणाला बसला असला तरी त्याची झळ कोल्हापूर जिल्ह्यालाही ...

'Tauute' hit 24.42 hectares in the district | ‘तौउते’मुळे जिल्ह्यातील २४.४२ हेक्टरला फटका

‘तौउते’मुळे जिल्ह्यातील २४.४२ हेक्टरला फटका

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘तौउते’ चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका कोकणाला बसला असला तरी त्याची झळ कोल्हापूर जिल्ह्यालाही बसली आहे. या वादळी पावसाने जिल्ह्यातील २४.४२ हेक्टरवरील केळी, आंबा, पपई पिकांना मोठा फटका बसला. पाच तालुक्यांतील १८ गावांतील ४५ शेतकऱ्यांचे ३३ टक्यांपेक्षा अधिक असे, ४ लाखांचे नुकसान झाले आहे. नजर अंदाजानुसार नुकसान शासनाला कळवले असून मदतीकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन ‘तौउते’ चक्रीवादळ तयार झाले. या वादळाने कोकण किनारपट्टीवर अक्षरश: धुमाकूळ घातला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत आंब्याच्या बागा उद्ध्वस्त झाल्याच, त्याशिवाय घरांचेही मोठे नुकसान झाले. कोल्हापुरातही १६ व १७ मे रोजी सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की ऊस, मका या पिकांसह फळबागांना मोठा फटका बसला. आडसाल ऊस व मका आडवे झाले आहेत. भाजीपाल्याचेही नुकसान झाले त्याचबरोबर अनेक ठिकाणी आंब्याची झाडे उखडून पडली.

राज्य शासनाने नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना महसूल यंत्रणेला दिल्या होत्या. त्यानुसार कृषी विभागाने पंचनाम्याचे काम पूर्ण केले आहे. यामध्ये शासनाकडून ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाच मदत मिळते. त्यानुसार या वादळाने २४.४२ हेक्टरवरील पिके व फळबागांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. शाहूवाडी तालुक्याला वादळाचा मोठा फटका बसला. या तालुक्यातील ३.५० हेक्टरवरील केळी, ०.६५ हेक्टरवरील पपई व १३.५० हेक्टरवरील आंबा असे १४.१५ हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले आहे. शिरोळ तालुक्यातील पपई बागांनाही फटका बसला आहे. नुकसानीची माहिती कृषी विभागाने राज्य शासनाकडे कळवली आहे, आता मदतीकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

गारपिटीनंतर दुसरा दणका

‘तौउते’ चक्रीवादळापूर्वी आठ-दहा दिवस कोल्हापूर जिल्ह्यात गारपीट झाली होती. यामध्ये भाजीपाल्याला फटका बसला होता. त्यानंतर ‘तौउते’च्या रूपाने दुसरे संकट आल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

तालुकानिहाय असे झाले नुकसान हेक्टरमध्ये -

तालुका गावांची संख्या कारले केळी पपई आंबा एकूण क्षेत्र नुकसान रुपयात

करवीर ५ ० १.५० ० ० १.५० २०,२५०

राधानगरी ५ ० ०.४४ ० ० ०.४४ ५,९४०

पन्हाळा १ ०.८३ ० ० ० ०.८३ ११,२०६

शाहूवाडी ६ ० ३.५० ०.६५ १३.५० १७.६५ ३,०१,९५०

शिरोळ १ ० ० ० ४.०० ४.०० ७२,०००

एकूण १८ ०.८३ ५.४४ ०.६५ १७.५० २४.४२ ४,११,३४६

Web Title: 'Tauute' hit 24.42 hectares in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.