‘ताराराणी’ला सर्वाधिक ३३% जनाधार
By Admin | Updated: November 5, 2015 00:45 IST2015-11-05T00:41:35+5:302015-11-05T00:45:37+5:30
मतदारांनी दाखवला विश्वास : तिन्ही पक्षांची टीका गनिमी काव्याने परतावत मिळविले यश

‘ताराराणी’ला सर्वाधिक ३३% जनाधार
राजाराम लोंढे - कोल्हापूर -महापालिका निवडणुकीत सर्वाधिक जनाधार होण्याचा मान ताराराणी आघाडीला मिळालेला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांचा तिन्ही बाजूने होणारा हल्ला त्याच ताकदीने परतवून लावला. त्यांच्या ३९ उमेदवारांना ३३ टक्के मते मिळाली असून मतदारांनी ‘कोल्हापूरकरांसह महाडिकही शहाणे’ असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात जोरात सुरू आहे.
महापालिका निवडणुकीच्या मैदानात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप-ताराराणी ताकदीने उतरले होते. महापालिका झेंडा फडकावयाचाच या इर्षेने सर्वच पक्षांनी ‘साम, दाम, दंड’ या नीतीचा वापर केला. सर्वच पक्षांनी टीका-टिप्पणी केली पण खऱ्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप-ताराराणी आघाडीत झडल्या. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून आमदार हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. महाडिक कुटुंबीयांच्या राजकारणाचे थेट ऐतिहासिक दसरा चौकातून वाभाडे काढले. ‘एकाच घरात काँग्रेसचा आमदार, मुलगा भाजपचा आमदार आणि पुतण्या राष्ट्रवादीचा खासदार, हे पाहिल्यानंतर ‘कोल्हापूरची जनता मूर्ख की महाडिक शहाणे’ अशी जहाल टीका आमदार मुश्रीफ यांनी करून राजकारणात खळबळ उडवून दिली होती. अखंड प्रचारात मुश्रीफ यांनी महाडिक व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनाच टार्गेट करून आपला आगामी राजकारणातील इरादा स्पष्ट केला होता. केवळ आमदार मुश्रीफ यांनीच टीका केली नाही तर, राष्ट्रवादीच्या राज्य पातळीवरील (माजी उपमुख्यमंत्री अजित पवार सोडून) नेत्यांनी ‘ताराराणी’ आघाडीवर टीकेची झोड उठविली होती.
मतदानाची तारीख जशी जवळ येत होती, तशी आमदार मुश्रीफ यांच्या ‘मूर्ख व शहाणे’ या टीकेची चर्चा जोर धरत होती. या टीकेच्या माध्यमातून महाडिक यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उभा करून त्यांचा जनाधार कमी होईल, या हेतूनेच त्यांच्यावर हल्ला चढविला जात होता. आमदार मुश्रीफ यांच्या व्यक्तिगत टीकेनंतर आमदार महादेवराव महाडिक कुटुंबीयांची प्रतिष्ठा पणाला लागली. आपल्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहते म्हटल्यावर त्यांनी सर्व ताकद पणाला लावून ‘गनिमी काव्याने’ विरोधकांचा हल्ला परतवून लावला.
काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने ‘ताराराणी आघाडीला तिन्ही बाजूने घेरले होते. ‘ताराराणी’ हा हल्ला कसा परतवून लावते, याविषयी उत्सुकता होती; पण आमदार महादेवराव महाडिक यांनी विरोधकांचा हल्ला परतवून लावत आपण राजकारणात कच्चे नाही, हे दाखवून दिले. ‘भाजप-ताराराणी’ला सत्तेपर्यंत पोहोचता आले नसले तरी त्यांनी घेतलेली मते निश्चितच महत्त्वाची आहेत. ताराराणी आघाडीने ३९ ठिकाणी उमेदवार उभे केले होते. त्यांनी १ लाख ५१ हजार ६७६ या झालेल्या मतांपैकी तब्बल ५१ हजार २१९ (३३ टक्के) मतदान घेऊन आपणच सर्वांत पुढे असल्याचे दाखवून दिले. राष्ट्रवादी काँग्रेसने ८० जागांवर उमेदवार उभे केले होते, त्यांनी ३ लाख ७ हजार ३३५ या झालेल्या मतांपैकी ६२ हजार ८३२ मते (२०.३५ टक्के) घेतली. टक्केवारीत राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे. ‘ताराराणी’चा एक उमेदवार वगळता ३८ उमेदवार हे चारशे मतांच्या पुढे आहेत. निवडणुकीतील टीका, त्यानंतर झालेले मतदान व निकाल पाहता ‘कोल्हापूरकरांसह महाडिकच शहाणे’ असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पक्षनिहाय मिळालेली मते अशी
पक्षउमेदवारांची संख्यालढलेल्या जागाचे मतदानमिळालेली मतेटक्केवारी
ताराराणी३९१ लाख ५१ हजार ६७६५१ हजार २१९३३
भाजप४१ (पुरस्कृतसह)१ लाख ४० हजार ४०४५ हजार ४९०३२.४८
काँग्रेस८१३ लाख ११ हजार ९३७७६ हजार ५८४२४.५५
राष्ट्रवादी८०३ लाख ७ हजार ३३५६२ हजार ८३२२०.३५
शिवसेना८१३ लाख ११ हजार ९३७४४ हजार ३५४१४.२१
‘ताराराणी आघाडी कडून निवडणूक लढवलेल्या उमेदवारांपैकी फक्त एका उमेदवाराला ४०० च्या आत मते आहेत. ३८ उमेदवार हे चारशे मतांच्या पुढे आहेत.