जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी रस्सीखेच
By Admin | Updated: January 13, 2015 00:06 IST2015-01-12T23:40:58+5:302015-01-13T00:06:24+5:30
ज्येष्ठ क्रीडा संघटक आमने-सामने : २६ जानेवारीला पुरस्कार प्रदान

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी रस्सीखेच
आदित्यराज घोरपडे -सांगली -जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. जिल्ह्यातील मातब्बर खेळाडू, प्रशिक्षक व क्रीडा संघटक आमने-सामने उभे आहेत़
यंदाच्या वर्षी ‘क्रीडा संघटक’ पुरस्कारासाठी काट्याची टक्कर होणार आहे़ कारण जिल्ह्यातील ज्येष्ठ अनुभवी क्रीडा संघटकांनी पुरस्कारासाठी शड्डू ठोकले आहेत़ यामध्ये इस्लामपूरचे प्रा़ वीरसेन पाटील (कबड्डी), आष्ट्याचे भगवान बोते (हातोडाफेक) व जतचे हाजीसाहेब मुजावर (अॅथलेटिक) यांचा समावेश आहे़ दोन वर्षांपूर्वी प्रा. जहाँगीर तांबोळी (सांगली) व प्रा़ सिद्राम चव्हाण (जत) यांच्यातही या पुरस्कारासाठी मोठी लढत झाली होती. त्यामुळे हा पुरस्कार ईर्ष्येचा, चुरशीचा आणि मानाचाही बनला आहे.
गुणवंत क्रीडा मार्गदर्शक (प्रशिक्षक) पुरस्कारासाठीही तगडा मुकाबला होणार आहे. कुपवाडचे संतोष कर्नाळे (खो-खो) व राजकुमार पवळकर (शूटिंगबॉल) आणि मिरजेच्या पूजा पाटील (हँडबॉल) या पुरस्काराच्या शर्यतीत आहेत. गुणवंत खेळाडू पुरुष गटात एकूण चार प्रस्ताव दाखल झाले आहेत. यामध्ये कवठेपिरानचा राष्ट्रीय विजेता अमोल जाधव (खो-खो), सांगलीचा हुसेन कोरबू (सायकलिंग), आष्ट्याचा कपिल बोते (हातोडाफेक) व पलूसचा रघुनाथ माळी (जलतरण) यांचा समावेश आहे. महिला गटात मिरजेची काजल काळे (जिम्नॅस्टिक), जतची स्वाती व्हनवाडे (क्रॉसकंट्री), सांगलीवाडीची पुष्पांजली चव्हाण (तलवारबाजी) व आष्ट्याची कोमल भोसले (थांगता) या रणरागिनींमध्ये थेट लढत होणार आहे.
बोते पिता-पुत्रांनी पुरस्कारासाठी प्रस्ताव दाखल करण्याची ही पहिलीच वेळ आहे. इस्लामपूरचे वीरसेन पाटील हे पक्के कबड्डीपटू असून, ‘बॅक किक’वर त्यांचे प्रभुत्व आहे. आष्टा नगरीच्या राजकीय पटावर घडलेले भगवान बोते ‘थ्रोर्इंग’मध्ये एक्स्पर्ट आहेत. खेळाडूंमध्ये काजल काळे, हुसेन कोरबू व अमोल जाधवचे पारडे जड वाटत आहे. मिरजेच्या दीपक सावंत यांचा पाठिंबा कोणाला मिळतो यावर मार्गदर्शक पुरस्कारातील दावेदारांचे भवितव्य अवलंबून
आहे. पुरस्कारांच्या या वेगवान घडामोडींमध्ये कोणाच्या गळ्यात पुरस्काराची माळ पडणार हे प्रजासत्ताकदिनीच कळेल.
रक्कम वाढली
२०१२ पर्यंत रोख रक्कम रूपये दोन हजार शंभर, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते़ दरवर्षी एकूण तीन पुरस्कार दिले जायचे़ २०१३ पासून पुरस्काराची रक्कम वाढली असून, ती २१०० ऐवजी दहा हजार झाली आहे़ पुरस्कार तीनऐवजी चार झाले आहेत़ वाढीव पुरस्कार महिला खेळाडू गटासाठी आहे़
जिल्हा क्रीडा पुरस्कार
विविध क्रीडा प्रकारांचा जिल्ह्यात प्रचार-प्रसार होऊन त्यांचा विकास व्हावा, खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळावा, तसेच खेळाडू घडविणाऱ्या प्रशिक्षकांचा उचित सन्मान होऊन त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून
राज्यातील प्रत्येक जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे २००३ पासून प्रतिवर्षी ‘गुणवंत क्रीडा मार्गदर्शक’, ‘उत्कृष्ट खेळाडू’ व ‘गुणवंत क्रीडा संघटक’ या पुरस्कारांचे वितरण केले जाते. प्रत्येक वर्षी २६ जानेवारीला त्या त्या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण केले जाते.