सोनवडे-घोटगे घाटाबाबत चर्चा
By Admin | Updated: December 17, 2014 22:54 IST2014-12-17T21:54:10+5:302014-12-17T22:54:43+5:30
वैभव नाईक यांची माहिती : बांधकाम मंत्र्यांनी घेतली बैठक

सोनवडे-घोटगे घाटाबाबत चर्चा
कुडाळ : सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यांना जोडण्यासाठी नवीन कुडाळ तालुक्यातून सोनवडे-घोटगे घाटातून प्रलंबित असलेला रस्ता होण्याबाबत नागपूर येथे झालेल्या बैठकीत सार्वजनिक बांधकाममंत्री व संबंधित विभागाने सकारात्मक चर्चा केल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी प्रसिध्दीपत्रकातून दिली आहे.
कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा व अत्यंत जवळचा आणि सुरक्षित असलेला, मात्र प्रलंबित असलेला कुडाळ-सोनवडे-घोटगे हा घाटरस्ता लवकरात लवकर पूर्ण होण्याकरिता या मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी विशेष प्रयत्न सुरू केले असून यासंदर्भात त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे लक्ष वेधले होते.
या रस्त्यासंदर्भात नागपूर येथे सार्वजनिक बांधकाममंत्री पाटील तसेच संबंधित विभागाचे अधिकारी यांची बैठक पार पडली. या बैठकीला आमदार वैभव नाईक, अप्पर प्रधान वनरक्षक नागपूरचे प्रकाश आविरकर, नागपूर अप्पर प्रधान वनरक्षक अजित उपळे, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम कुडाळ तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूरचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत हा घाटरस्ता झाल्यास या दोन्ही जिल्ह्यातील अंतर कसे कमी होईल, वाहतुकीस कसा कमी धोकादायक होईल, यामुळे जिल्ह्याच्या विकासात कशी भर पडेल यादृष्टीने सकारात्मक चर्चा करण्यात आली. हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण होण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगून येत्या दहा दिवसात यासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन केल्याचेही सांगितल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी पत्रकातून दिली आहे. (प्रतिनिधी)