अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावरच परीक्षा घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:10 IST2021-02-20T05:10:28+5:302021-02-20T05:10:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : आमचे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन अडीच महिने झाले आहेत. त्यामुळे आमचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतरच ...

अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावरच परीक्षा घ्या
लोकमत न्यूज नेटवर्क,
कोल्हापूर : आमचे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन अडीच महिने झाले आहेत. त्यामुळे आमचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतरच परीक्षा घ्यावी, अशी मागणी पॉलिटेक्निक (तंत्रनिकेतन) मधील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांतून होत आहे. फार्मसीच्या (औषधनिर्माण शास्त्र) दि्वतीय (सेमिस्टर थर्ड), तृतीय (सेमिस्टर फाईव्ह), अंतिम वर्षाच्या (सेमिस्टर सेव्हन) विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्याची तयारी केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पॉलिटेक्निकमधील प्रथम वर्षाचे वर्ग जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ऑनलाईन सुरू झाले. त्यांचे ऑफलाईन वर्ग गेल्या आठवड्यापासून भरविण्यात येत आहेत. प्रथम वर्षाचा आतापर्यंत ३० टक्के अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. फार्मसीच्या प्रथम वर्षाची प्रवेश परीक्षा दि. ६ फेब्रुवारी रोजी पूर्ण झाली असून वर्गही सध्या भरत आहेत. त्यांचे पहिले सत्र लवकर आटोपून परीक्षा घेण्याचे नियोजन महाविद्यालयांनी केले आहे. बी. फार्मसी अभ्यासक्रम हा चार वर्षांचा आहे. त्यात एका वर्षामध्ये दोन सत्र (सेमिस्टर) होतात. दि्वतीय , तृतीय आणि अंतिम वर्षाचे वर्ग जूनपासून ऑनलाईन पध्दतीने सुरू आहेत. या वर्षांचा सरासरी ८० टक्के अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. त्या वर्षांतील ऑड सेमिस्टरमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा दि. १५ मार्चपासून होणार आहेत. त्यामुळे परीक्षा देण्याची तयारी फार्मसीच्या विद्यार्थ्यांकडून सुरू आहे, तर अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर आमची परीक्षा घ्या, अशी मागणी पॉलिटेक्निकचे विद्यार्थी करत आहेत.
प्राचार्य काय म्हणतात...
मार्चमध्ये ऑड सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहेत. या विद्यार्थ्यांचा ८० टक्के अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र पूर्ण झाल्यानंतर परीक्षा घेण्याचे नियोजन आहे.
- डॉ. एच. एन. मोरे,
प्राचार्य, भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी.
ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीने प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यात येत आहे. आतापर्यंत ३० टक्के अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. या विद्यार्थ्यांचे पहिले सत्र दि. ६ मार्चला संपणार आहे. त्यामुळे अजून वेळ असून अभ्यासक्रम पूर्ण केला जाईल.
- प्रशांत पट्टलवार, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन.
काय म्हणतात विद्यार्थी...
भविष्याचा विचार करता, आमचा अभ्यासक्रम कमी करू नये. त्याऐवजी अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षा घ्यावी. याबाबत पॉलिटेक्निकने विचार करून लवकर निर्णय घ्यावा.
- विनायक कुंभार, पॉलिटेक्निक विद्यार्थी, तिरपण (ता. पन्हाळा)
आतापर्यंत आमचा ३० टक्के अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. दि. ६ मार्चला आमचे पहिले सत्र पूर्ण होणार आहे. तोपर्यंत उर्वरित अभ्यासक्रम पूर्ण होईल असे वाटते. प्रात्यक्षिके ही ऑफलाईन पध्दतीने घेण्यात यावीत.
- अपूर्वा बुरूड, पॉलिटेक्निक विद्यार्थिनी, नानीबाई चिखली (ता. कागल)
ऑनलाईन पध्दतीने आमचा अंतिम वर्षाचा बहुतांश अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. सध्या प्रॅक्टिकलही सुरू झाली आहेत. अन्य विद्यापीठांच्या तुलनेत आमच्या परीक्षांना विलंब झाला आहे. परीक्षा देण्याची आमची तयारी आहे.
- ओंकार पाटील, बी. फार्मसी. विद्यार्थी, कंदलगाव (ता. करवीर)
आमचा अंतिम वर्षाचा अभ्यासक्रम कव्हर झाला आहे. ऑनलाईन शिक्षण घेताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. काही मुद्दे पुन्हा समजावून घेतले. सेल्फ स्टडीवर भर दिला.
- किमया जोशी, बी. फार्मसी विद्यार्थिनी, कळंबा (ता. करवीर)
चौकट
...अन्यथा कौशल्यावर परिणाम
फार्मसी आणि पॉलिटेक्निक अभ्यासक्रम हे व्यावसायिक स्वरूपाचे आहेत. त्यांचा अभ्यासक्रम शंभर टक्के पूर्ण होणे आवश्यक आहे. अभ्यासक्रम कमी केल्यास त्याचा त्यांच्या कौशल्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील आकडेवारी दृष्टिक्षेपात...
पॉलिटेक्निक कॉलेज : २२
प्रवेश क्षमता : ६५००
प्रवेशित विद्यार्थी : ४०००
फार्मसी कॉलेज : १५
प्रवेश क्षमता : १३००
प्रवेशित विद्यार्थी : १२८०