रुग्णांची फसवणूक करणाऱ्या दवाखान्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:33 IST2021-06-16T04:33:22+5:302021-06-16T04:33:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये जिल्ह्यातील काही दवाखाने रुग्णांची फसवणूक करत असल्याचे निदर्शनास आले असून, ...

रुग्णांची फसवणूक करणाऱ्या दवाखान्यांवर कारवाई करा
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये जिल्ह्यातील काही दवाखाने रुग्णांची फसवणूक करत असल्याचे निदर्शनास आले असून, त्यांच्यावर थेट कारवाई करा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना कोरोना आढावा बैठकीत दिले. पहिल्या लाटेत कोल्हापुरात चांगले काम झाले; मात्र दुसऱ्या लाटेत यंत्रणा काहीसी ढिली पडल्याबद्दल नाराजी व्यक्त करत पूर्ण क्षमतेने कोरोनाशी मुकाबला करण्याची सूचनाही त्यांनी केली.
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये शहरातील व जिल्ह्यातील काही दवाखाने रुग्णांची आणि सरकारचीही फसवणूक करीत असल्याचे निदर्शनात आणून दिले. फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत, अशा दवाखान्यांवर त्यांनी तातडीने कारवाई करावी, असे आदेश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.
या वेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, खासदार संजय मंडलिक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, आमदार पी. एन. पाटील, प्रकाश आवाडे, प्रकाश आबिटकर, ऋतुराज पाटील, चंद्रकांत जाधव, राजेश पाटील, अरुण लाड, जयंत आसगावकर, राजू आवळे, पुणे विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अनिल रामोड, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, डॉ. एस. एस. मोरे, डॉ. अनिल माळी, डॉ. उषादेवी कुंभार, डॉ. हर्षला वेदक, डॉ. फारुक देसाई उपस्थित होते.
कारखान्यांच्या अलगीकरणाचे काय झाले?
काेरोनाबाधित रुग्ण घरीच रहात असल्याने संसर्ग वाढत असल्याचे निदर्शनास आले असून विविध संस्था, साखर कारखाने, दूध संस्थांना संस्थात्मक अलगीकरण केंद्र सुरू करण्यास सांगितले होते. कोल्हापुरातील साखर कारखान्यांच्या अलगीकरण केंद्राचे काय झाले? अशी विचारणा अजित पवार यांनी केली.
चंदगडसाठी ‘माय लॅब’ देणार
चंदगड तालुक्यातील वाड्यावस्त्यांवर रुग्णवाहिका पोहचत नसल्याने कोरोना चाचण्यांसह इतर सुविधा देण्यासाठी अडचणी येत असल्याचे आमदार राजेश पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. यावर चंदगडसाठी ‘माय लॅब’ देणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांची ‘धाकधूक’ आणि दादांची ‘तराटणी’
कोल्हापुरातील वाढती रुग्णसंख्या पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार आढावा बैठकीत आरोग्य यंत्रणेची झाडाझडती घेणार असेच बैठकीच्या स्थळी वातावरण होते. त्यामुळे अनेक अधिकारी चांगलेच वचकून होते, मात्र पवार यांनी अतिशय शांतपणे, जिथे कान उपटायचे तिथे उपटून परिस्थिती सुधारली नाहीतर दोषींना सोडणार नाही, अशी तराटणी दिली.