एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानीची आजपासून मिस कॉल मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:28 IST2021-09-12T04:28:34+5:302021-09-12T04:28:34+5:30
कोल्हापूर : निती आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारकडून एफआरपी तीन तुकड्यांत देण्याच्या घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात आज, रविवारपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ...

एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानीची आजपासून मिस कॉल मोहीम
कोल्हापूर : निती आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारकडून एफआरपी तीन तुकड्यांत देण्याच्या घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात आज, रविवारपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्यभर मिसकॉल मोहीम सुरू होत आहे. स्वत: शेट्टी यांच्या नावाने घेतलेल्या फोन क्रमांकावरच या महिनाअखेरपर्यंत हे कॉल देऊन न्यायालयात खेचण्यासाठी माहितीचे संकलन सुरू होत आहे. ८४४८१८३७५१ या मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्यायचा आहे.
पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू असतानाच निती आयोग व कृषी मूल्य आयोगाने एफआरपी ६०:२०:२० अशा तीन टप्प्यांत देण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली. राज्य सरकारनेही टास्क फोर्सकडे यासाठी अनुकूलता दर्शवली आहे. शेतकऱ्यांचे नुकसान करणारी ही शिफारस असल्याने शेट्टी यांनी यावर एकाच वेळी रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाईची घोषणा केली आहे. थकीत एफआरपीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात यापूर्वीच याचिका दाखल केलेली आहे. तेथेच संसदेची मान्यता नसतानाही एफआरपीची मोडतोड केल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली जाणार आहे. त्यासाठी पुरावा म्हणून एफआरपी मोडतोडीला विरोध असणाऱ्या शेतकऱ्यांची नावे असणे आवश्यक आहे. म्हणून संघटनेने १२ ते ३० सप्टेंबर अशी २० दिवसांची मिसकॉल मोहीम हाती घेतली आहे. त्याची सुरुवात आज होत आहे.
मिस कॉल देणे म्हणजे एकरकमी एफआरपी मान्य असलेले, तर तीन टप्प्यांत एफआरपी नाकारणारे शेतकरी ठरणार आहेत. यातून तयार होणारी माहिती पुरावा म्हणून सर्वोच्च न्यायालयात सादर केली जाणार असल्याने शेतकऱ्यांनी मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन शेट्टी यांनी केले आहे.