तर कारखान्याची साखर रोखणार स्वाभिमानी

By Admin | Updated: May 22, 2014 01:09 IST2014-05-22T01:05:42+5:302014-05-22T01:09:35+5:30

शेतकरी संघटनेचा इशारा : पहिली उचल २६५० रुपयेसाठी १० जूनची डेडलाईन

Swabhimani will stop sugar from the factory | तर कारखान्याची साखर रोखणार स्वाभिमानी

तर कारखान्याची साखर रोखणार स्वाभिमानी

 कुरुंदवाड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सन २०१३-१४ सालच्या ऊस गळीत हंगामात आंदोलनावेळी कारखान्यांकडून उसाला पहिली उचल २६५० रुपये दोन टप्प्यांमध्ये देण्याचे ठरवून आंदोलन मागे घेतले होते. कारखान्यांचा गळीत हंगाम संपून महिना होत आला तरी पहिल्या उचलीतील उर्वरित रक्कम कोणत्याही कारखान्याने दिलेली नाही. जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांनी उर्वरित रक्कम १० जूनपर्यंत द्यावी, अन्यथा त्यानंतर खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असून, कारखान्यांच्या गोडावूनमधून साखरेचे एक पोतेही बाहेर पडू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य आण्णासो चौगुले व तालुकाध्यक्ष आदिनाथ हेमगिरे यांनी पत्रकार बैठकीत दिला. ते म्हणाले, शेतकर्‍यांच्या शेतीमालाला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना झाली आहे. लोकसभा निवडणुकीत खा. शेट्टी यांच्या पाठीशी सर्व शेतकर्‍यांनी एकत्रित येऊन शेतकर्‍यांची ताकद दाखविली आहे. मात्र, राजकारण हे फक्त निवडणुकीपुरते असे सांगून ते म्हणाले, यंदा जिल्ह्यातील २० साखर कारखान्यांनी १ कोटी ७६ लाख टन उसाचे गाळप केले आहे. गाळपापूर्वी उसाला १७०० रुपयांपेक्षा जादा दर देता येणार नाही, असे म्हणणार्‍या साखर कारखानदारांनी ‘स्वाभिमानी’च्या दीड महिन्यांच्या आंदोलनानंतर दोन टप्प्यांमध्ये पहिली उचल २६५० देण्याचा निर्णय घेऊन गाळपाला सुरुवात केली. त्यानुसार पहिल्या उचलीतील २२५० रुपये, तर काही साखर कारखान्यांनी कमी-जास्त दर दिला. कारखान्याचा गळीत हंगाम संपून महिना होत आला तरी पहिल्या उचलीतील उर्वरित रक्कम अद्याप कोणत्याही कारखान्याने दिलेली नाही. त्यासाठी कारखाना व्यवस्थापकांना १० जूनची डेडलाईन देण्यात येत असून, आंदोलना दरम्यान ठरल्याप्रमाणे जे साखर कारखाने पहिली उचल देत नाहीत, त्यांच्याविरोधात खा. शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्पा म्हणून साखर कारखान्यांच्या गोडावूनमधून साखरेचे एकही पोते बाहेर सोडणार नाही. आंदोलन तीव्र करण्यासाठी प्रत्येक तालुकानिहाय कार्यकारिणीची बैठक घेण्यात येणार आहे. यावेळी जि. प.चे बांधकाम सभापती सावकर मादनाईक, पै. विठ्ठल मोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष उल्हास पाटील, युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष बंडू पाटील, के. आर. चव्हाण, मिलिंद साखरपे, रामचंद्र फुलारे, मनोहर पुजारी, सागर शंभूशेट्टी, सागर चिप्परगे, आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Swabhimani will stop sugar from the factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.