सामाजिक न्याय देणारा शाश्वत विकास महत्त्वाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:19 IST2021-06-01T04:19:14+5:302021-06-01T04:19:14+5:30
गडहिंग्लज : औद्योगिकरणामुळे विकासाच्या प्रक्रियेला गती मिळाली. परंतु, हा विकास सर्वसामान्यांना उपयुक्त न ठरता भांडवली व्यवस्थेला पूरक बनला आहे. ...

सामाजिक न्याय देणारा शाश्वत विकास महत्त्वाचा
गडहिंग्लज : औद्योगिकरणामुळे विकासाच्या प्रक्रियेला गती मिळाली. परंतु, हा विकास सर्वसामान्यांना उपयुक्त न ठरता भांडवली व्यवस्थेला पूरक बनला आहे. त्यामुळे सामाजिक न्याय प्रस्थापित करणाऱ्या शाश्वत विकासाची गरज आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत डॉ. प्रवीण सप्तर्षी (अमेरिका) यांनी केले.
गडहिंग्लज येथील डॉ. घाळी महाविद्यालयातर्फे आयोजित ऑनलाईन आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात ते बोलत होते.
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी चर्चासत्राचे उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी होते. अध्यक्षस्थानी विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी होते. प्र. कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिर्के म्हणाले की, मानवी विकासासाठी सर्व शाखांमधून होणारे संशोधन महत्त्वाचे असते. त्यासाठी नव्या शैक्षणिक धोरणातून मूलभूत संशोधनाला महत्त्व देण्यात आले आहे. संशोधन सर्वसमावेशक आणि समाजोपयोगी असले पाहिजे.
पाटील म्हणाले की, शाश्वत विकासासाठी पाण्याचे व्यवस्थापन गरजेचे असून, पाण्याशिवाय विकासाची व्याख्या पूर्ण होऊ शकत नाही. पाण्याच्या व्यवस्थापनासाठी औष्णिक आणि सौरऊर्जेसाठी अधिक संशोधन करायला हवे.
पहिल्या सत्रात डॉ. गजानन घोडके (द. कोरिया) यांनी ग्रीन केमिस्ट्रीमधील १२ तत्त्वांचा वापर करून शाश्वत विकास साध्य करण्याबाबत विवेचन केले. घातक रसायनांचा वापर टाळून सुरक्षित रसायनांचा वापर आणि वस्तूंचा पुनर्वापर करण्याची मानसिकता रुजवायला हवी.
दुसऱ्या सत्रात डॉ. दत्तात्रय ढवळे (कतार) यांनी नॅनो मटेरिअल्सचा वापर करून औषधे व रसायनांची निर्मिती याविषयी मार्गदर्शन केले.
तिसऱ्या सत्रात निशी लॉक्सिमॉन (मॉरिसिस) यांनी मराठी भाषेचा विकास आणि परदेशातील तिचे उपयोजन याची मांडणी केली.
परिषदेस भारतातून विविध राज्यांसह परदेशातील अमेरिका, आफ्रिका, उझबेकिस्तान, ट्युनिशिया, अझरबैझान, मॉरिसिस येथील १८१ हून अधिक शोधनिबंध प्राप्त झाले. ३२७ लोकांनी नोंदणी करून परिषदेस उपस्थिती दर्शविली.
प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील यांनी प्रास्ताविक केले. परिषदेचे मुख्य समन्वयक अनिल गोडघाटे, सहसमन्वयक डॉ. दत्तात्रय वाघमारे, डॉ. नीलेश शेळके यांनी नियोजन केले.