चौपदरीकरणाचे सर्वेक्षण युद्धपातळीवर
By Admin | Updated: October 3, 2015 01:20 IST2015-10-03T01:20:08+5:302015-10-03T01:20:08+5:30
कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग : कोल्हापूर, बांबवडे, मलकापूर, शाहूवाडीतून बायपास

चौपदरीकरणाचे सर्वेक्षण युद्धपातळीवर
भीमगोंडा देसाई / कोल्हापूर
कोल्हापूर-रत्नागिरी रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी चार पथकांतर्फे सर्वेक्षणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर अंतिम आराखडा होईल. त्यानंतर जमीन संपादनानंतर प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार आहे.
चौपदरीकरण करताना कोल्हापूर, बांबवडे, मलकापूर, शाहूवाडीतून बायपास रस्ता होणार आहे. चौपदरीकरणानंतर टोल लागणार की नाही, यासंबंधी अजून स्पष्ट झालेले नाही; पण या कामावर दोन हजार कोटींपेक्षा अधिक निधी खर्च होणार असल्यामुळे टोल लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कोल्हापूर-रत्नागिरी रस्ता १३७ किलोमीटरचा आहे. सध्या या रस्त्यावर प्रचंड वाहतूक वाढली आहे. कोकणात जाणारा हा मुख्य मार्ग असल्यामुळे दिवसेंदिवस वाहतुकीत भरच पडत आहे. सध्याचा रस्ता अरुंद वाटत आहे. अनेक ठिकाणी दोन अवजड वाहने एकमेकांसमोर आल्यानंतर वाहतुकीची कोंडी होते. अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. यामुळे येथील राष्ट्रीय महामार्ग (विभाग क्रमांक सात) या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव भारतीय भूपृष्ठ परिवहन मंत्रालयाकडे पाठविला आहे. त्याला तत्त्वत: मान्यता मिळाली असून, सर्व्हेचे कामही सुरू झाले आहे.
सर्व्हेचा अहवाल आल्यानंतर चौपदरीकरणात जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या संमतीसाठी बैठका होणार आहेत. यास कमीत कमी विरोध होईल, असा रस्त्याचा अंतिम आराखडा तयार करण्यात येणार आहे. रस्त्यावर कोल्हापूर, बांबवडे, मलकापूर, शाहूवाडी ही शहरे आहेत. चौपदरीकरण या शहरांतून झाल्यास मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे बायपास रस्ता करण्याचे नियोजन आहे.
तसेच या मार्गावर १२ किलोमीटर लांबीचा आंबा घाट आहे. या घाटातून सध्या असलेला रस्ता कायम ठेवण्यात येणार असून, नवीन पर्यायी रस्ता तयार करताना तीव्र चढ आणि उतार कमी करण्यासाठी काही ठिकाणी बोगदे तयार केले जातील.
चौपदरीकरणानंतर रस्ता किती रुंद ?
राष्ट्रीय महामार्गाप्रमाणे रस्ता वन-वे होणार आहे. चार मीटर रुंदीचा दुभाजक असेल. दोन्ही बाजूला प्रत्येकी सात मीटर रस्ता रुंद होईल. यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असून, वाहतुकीची कोंडी फुटणार आहे.