दत्तात्रय पाटीलम्हाकवे : वाढत्या शहरीकरणामुळे शहरात मजल्यावर मजले असणाऱ्या टोलेजंग इमारती पाहायला मिळतात. आता ग्रामीण भागातही मजल्यावर मजले होत आहेत. ‘जसा वेश तसा देश’ अशी म्हण ग्रामीण भागात प्रचलित आहे. त्याप्रमाणे आजूबाजूच्या राहणीमानाचा परिणाम पशुपक्ष्यांवर होत असल्याचे त्यांच्या कृतीतून जाणवू लागले आहे. याची प्रचिती म्हाकवे (ता. कागल) येथील एका विहिरीवरील झाडाला सुगरणीने तब्बल तीन मजली घरटे बांधून दिली आहे.गावच्या पश्चिमेला गावानजीकच एकनाथ शंकर माळी यांच्या विहिरीवर असणाऱ्या चिक्कूच्या झाडाला सुगरणींकडून घरटी बांधण्याचे काम सुरू आहे. एक महिन्यापासून सुरू असणाऱ्या घरट्यांकडे माळी कुटुंबियांनी फारसे औत्सुक्याने पाहिलेले नव्हते. मात्र, एका घरट्यालाच दुसरे आणि काही दिवसांनंतर तिसरे घरटे लोंबकळताना दिसल्याने ते अवाक् झाले.
वृक्ष संवर्धनाचे संकेत तर नाहीत ना?झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे रहिवासासाठी जागेची टंचाई भासत आहे. त्यामुळे इमारत बांधकामात अपार्टमेंटचा पर्याय पुढे आला. त्याप्रमाणे सध्या झाडांची संख्या कमी होत चालली आहे. त्यामुळेच आम्हीही अपार्टमेंटचा पर्याय शोधला असल्याचे पक्षी आपल्या कृतीतून सांगत तर नसतील ना? अशा प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
..म्हणून काही घरटी अर्धवटघरट्याच्या बांधकामाची सुरुवात ही नर पक्षी करतो. निम्मे घरटे बांधून झाले की, सुगरण येऊन पाहणी करते. आपल्यासह मुलांना योग्य असेल तरच ते घरटे दोघे मिळून पूर्ण करतात. अन्यथा ते अर्धवट सोडून नर पक्ष्याला दुसरे घरटे बांधावे लागत असल्याचेही पक्षी अभ्यासक सांगतात.
महिन्यापूर्वी झाडावर नियमितपणे पक्षी घरटी बांधण्याच्या कामात व्यस्त होते. त्यामुळे आम्ही याकडे फारसे लक्ष दिले नाही. मात्र, गेल्या आठवड्यात अत्यंत कलाकुसरीने सजवलेली एकाच घरट्याला जोडून तीन घरटी दिसल्याने पक्ष्यांचे कौतुक वाटले. - एकनाथ माळी, शेतकरी, म्हाकवे
जगभरात सुगरण पक्ष्यांच्या हजारो जाती आहेत. यामध्ये आपल्या भागात आढळणारी सुगरण ही घरटे बांधण्यातील तरबेज मानली जाते. कोणत्याही शाळेशिवाय निसर्गाकडून त्यांना मिळालेले हे वरदानच म्हणावे लागेल. - प्रणव देसाई ,पक्षी अभ्यासक, कोल्हापूर