उर्वरित उसाला पहिली उचल २५०० रुपये साखरेचे दर घसरले : कोल्हापुरातील कारखानदारांचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 23:32 IST2018-01-31T23:26:11+5:302018-01-31T23:32:05+5:30
कोल्हापूर : तीन महिन्यांत साखरेचे दर कोसळल्याने बॅँकांनी मूल्यांकन कमी केले आहे. परिणामी एफआरपी अधिक शंभर रुपये याप्रमाणे उसाची पहिली उचल देण्यास पैसे उपलब्ध होत नसल्याने

उर्वरित उसाला पहिली उचल २५०० रुपये साखरेचे दर घसरले : कोल्हापुरातील कारखानदारांचा निर्णय
कोल्हापूर : तीन महिन्यांत साखरेचे दर कोसळल्याने बॅँकांनी मूल्यांकन कमी केले आहे. परिणामी एफआरपी अधिक शंभर रुपये याप्रमाणे उसाची पहिली उचल देण्यास पैसे उपलब्ध होत नसल्याने कारखान्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. यासाठी उर्वरित उसाला प्रतिटन २५०० रुपये पहिली उचल देण्याचा निर्णय साखर कारखानदारांनी घेतला आहे.
जिल्हा मध्यवर्ती बॅँकेत बुधवारी जिल्ह्यातील साखर कारखानदारांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. यामध्ये २२ सहकारी व खासगी साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींनी एकमताने हा निर्णय घेतला. यंदा हंगाम सुरू होण्यापूर्वी म्हणजेच आॅक्टोबर महिन्यात घाऊक बाजारात साखरेचे दर प्रतिक्विंटल ३६०० रुपये दर होता. त्यानुसारच बॅँकांची उचल गृहित धरून एफआरपी अधिक शंभर रुपये पहिली उचल व त्यानंतर दोन महिन्यांत शंभर रुपये देण्याचा निर्णय झाला; पण त्यानंतर साखरेच्या दरात घसरण सुरू झाली.
तीन महिन्यांत साखरेचे दर ३६०० वरून २८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले. परिणामी, बॅँकांचे मूल्यांकनही आपोआपच कमी झाले.बाजारभावाच्या ८५ टक्के उचल बॅँका देतात. त्यातून कारखान्यांनी घेतलेल्या कर्जाचे हप्ते, व्याज तसेच साखर तयार करण्यासाठी येणारा प्रक्रिया खर्च व ‘एफआरपी’साठी घेतलेले मागील हंगामातील कर्जाचे हप्ते या सगळ्या कपाती वजा जाता ऊसदरासाठी केवळ १७७५ रुपये शिल्लक राहतात. यासह मोलॅसिस, बगॅस, प्रेसमडचे उत्पन्न मिळून २७६४ रुपयांपर्यंत रक्कम राहते. त्यातून सरासरी सहाशे रुपयांप्रमाणे तोडणी व ओढणी खर्च वजा जाता उसासाठी केवळ २१६४ रुपये उपलब्ध होतात. जाहीर दर व उपलब्ध होणारी रक्कम यांमध्ये मोठी तफावत आहे. त्यात बॅँका जादा उचल देण्यास तयार नसल्याने कारखानदार कोंडीत सापडले आहेत.
जाहीर केलेल्या दराप्रमाणे शेतकºयांना कोणत्याही परिस्थितीत पैसे दिले जातील; पण सध्या शेतकºयांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहनही बैठकीत करण्यात आले.बैठकीला संताजी घोरपडे कारखान्याचे संस्थापक आमदार हसन मुश्रीफ, ‘जवाहर’चे अध्यक्ष प्रकाश आवाडे, ‘दत्त’चे अध्यक्ष गणपतराव पाटील, ‘गुरुदत्त’चे अध्यक्ष माधवराव घाटगे, ‘आजरा’चे अध्यक्ष अशोक चराटी, ‘भोगावती’चे अध्यक्ष पी. एन. पाटील, ‘शरद’चे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, ‘राजाराम’चे पी. जी. मेढे, आदी उपस्थित होते.
अशी आहे जिल्ह्यांतील उचल
सोलापूर २१००
पुणे २२००
नागपूर २१००
कोल्हापूर सरासरी २८०० (आतापर्यंत)