अशी ही सत्त्वपरीक्षा - भाग १
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:26 IST2021-09-24T04:26:59+5:302021-09-24T04:26:59+5:30
सावंतांच्या हाकेसरशी भरत मागे फिरला व त्यांच्या घरी दारालगतच्या खुर्चीत टेकला. समोरच सोफ्यावर बसलेले सावंत बोलले. ‘भरत गेल्या शनिवारी ...

अशी ही सत्त्वपरीक्षा - भाग १
सावंतांच्या हाकेसरशी भरत मागे फिरला व त्यांच्या घरी दारालगतच्या खुर्चीत टेकला. समोरच सोफ्यावर बसलेले सावंत बोलले.
‘भरत गेल्या शनिवारी तुम्ही बिल द्यायला आला होता. त्यावेळी लखोट्यामध्ये १० हजार रु. मुलांनी फी भरण्यासाठी घेतले होते; पण तो लखोटा गायब झालाय. तुम्हाला मिळाला असेल, तर परत करा.’
‘साहेब, मी दारालगतच्या खुर्चीत बसलो. बिल देऊन उठून गेलो.’
‘भरत, तुमचं कोणतंही कारण मला ऐकायचं नाहीय.’ सावंतांनी अगदी निक्षून सांगितले. त्यांच्यापुढे काय बोलायचे अन् त्यांनी सहजी लावलेल्या आरोपाच्या जोखडातून मान कशी काढून घ्यायची, अशा भयानक अन् भन्नाट विचाराने भरतचे डोके सुन्न झाले. ‘रविवारी आपण या गोष्टीवर बोलूया’ एवढे बाेलून राहिलेले पेपर वाटून भरत घरी आला. देवपूजा जेवण करून आपल्या ऑफिसकडे चालला.
जयहिंद ग्राहक भांडारमध्ये सचिव म्हणून भरत नोकरीला होता. चार वर्षांत ग्राहक भांडाराचा व्यवहार खुबीने वाढविला. भरतची चिकाटी, प्रामाणिकपणा, सुलभ, सरळ व्यवहार अन् जोडीला करारी अन् खंबीर चेअरमन केशवकाका. जयहिंद भांडार म्हणजे काैतुकाचे अन् विश्वासाचे केंद्र बनले.
आज मात्र, भरतवर सावंतांनी डागलेला आळ म्हणजे आजपावेतो प्रामाणिकपणा अन् काैतुकावर पाणी फिरणार असे वाटू लागले. केशवकाकांनी मुद्दाम विचारले.
‘तुझा चेहरा अगदीच पडलाय? मोठी अडचण आली का?’ भरतला राहवले नाही. घडला प्रकार त्याने भडाभडा बोलून काकांच्या कानावर घातला. चार दिवसांनी भरत सावंतांच्या घरी गेला. भरत म्हणाला, ‘मी आत येऊन दाराजवळ याच खुर्चीत बसलो अन् पेपरचं बिल दिलं अन् उठून गेलो. मग तुमच्या हातातला लखोटा मला सापडणार कसा?’
‘हे बघा भरत, तुमची काहीही सफाई ऐकायची नाहीय. त्या दिवशी आमच्या घरी कोणीही आलेले नाही. म्हणून ते पैसे बिनबोभाट परत करा.’
भरतला बोलायची संधी न देता सावंतांनी खुबीने चोरी अंगाला चिकटवून परतफेडीचा मुद्दा ऐरणीवर घेतला ‘आणि हो भरत लगतच्या पोलीस स्टेशनमध्ये माझे मेव्हणे जमदार आहेत. तक्रार पोलिसांत गेली तर तिथं भूतसुद्धा सटासट बोलतं. गेली चार वर्षं या काॅलनीत पेपर टाकताय. तुमच्या नावाचा पुकारा होण्याआधी विषय संपवा.’
‘साहेब, मी बसल्या जागेवरून उठून गेलो हा मुद्दा तुम्ही लक्षात का नाही घेत?’ भरत विनवणीच्या सुरात बोलला. लगेच वहिनींनी तोंड घातले. त्या म्हणाल्या, ‘अहो भरत, तुम्ही स्वत:च स्वत:ची वकिली करून यातून निसटू शकाल ही अगदी भाबडी कल्पना आहे तुमची.’
भरत बोलला, ‘अहो वहिनी, मी खुर्चीतच बसून असताना साहेबांच्या हातातला लखोटा माझ्या हातात आपोआप कसा पडेल? मी हात जोडून सांगतो, मला तुमचा लखोटा मिळालेला नाही.’
वहिनी ठसक्यात बोलल्या, ‘भरत शब्दांची हेराफेरी ऐकून आम्ही चुपचाप बसू, असं वाटलं का तुम्हाला?’
सावंत म्हणाले, ‘भरत, चर्चेचं गुऱ्हाळ नकोय. फक्त तुम्ही चार दिवसांत पैसे आणून द्या, नाही तर आम्हाला पुढचा मार्ग धरावा लागेल.’
‘तुमच्या चाैकटीच्या आत आलेल्या चुकीमुळं मी सहजगत्या धर्मसंकटात अडकलो.’ भरत अगदी हताश होऊन बोलला.
‘भरत, तुम्ही काहीही ऐकवलं तरी पटणार नाही. एकदा कानफाट्या नाव पडलं, तर भविष्यात तुम्ही खूपच अडचणीत याल व तुम्हाला पश्चात्ताप करावा लागेल. म्हणून सांगतो पैसे परत करा म्हणजे तुम्ही सहीसलामत आम्ही सुखरूप.’
भरत बोलला, ‘मानेवर सुरी ठेवूनच या गुन्ह्यात माझी मान अडकवलीय हे तुमचं अंतर्मनसुद्धा सांगत असेल; पण तुम्हाला माझ्याकडून पैसे घ्यायचेच आहेत हे सिद्ध झालं. पुढच्या रविवारी तुम्हाला पैसे आणून देतो.’
सावंत बोलले, ‘पुन्हा मूळ पदावर आलात ना? अगोदर बोलला असता, तर एवढी मगजमारी करायची गरज नव्हती.’ मिस्कीलपणे हसत; पण मनात खुश होऊन सावंत बोलले.
दिवसेंदिवस भरतचा चेहरा दु:खीकष्टी दिसू लागला. गीताच्या (बहीण) लग्नाची तारीख तोंडावर आलेली. ऑफिसमधून लग्नासाठी १५ हजार रु. कर्ज मंजूर झाले. त्यातच १० हजारांचा अवकाळी खड्डा. अशा विचाराने भरत खचून गेला. घरची परिस्थिती जेमतेमच. तोंडावर पांघरूण घ्यावे तर पाय उघडे अन् पाय झाकावेत तर तोंड उघडे. सहा माणसांचा गाडा खर्चाच्या राड्यातून सरकता सरकत नव्हता. ऐनवेळी लोकांच्या उपयोगी पडल्यामुळे मिळणारी सहानुभूती आजी-वडील यांची देखभाल यात त्याला धन्यता वाटत होती. श्रम आणि प्रामाणिकता हेच त्याचे खरे भांडवल होते. भरतचा मलूल चेहरा बघून आई-वडील विचारायचे; पण हो किंवा नाही एवढ्या आखूड शब्दातंच तो उत्तर द्यायचा.
शनिवारी केशवकाका अन् भरत सावंतांच्या घरी गेले. भरतला बघून सावंतांना आनंद झाला; पण केशवकाकांना बघून ते चरकले.
सावंत म्हणाले, ‘रोहिणी चहा ठेव.’
केशवकाका बोलले, ‘सावंत तुमचे पैसे द्यायला आलोय. चहा प्यायला नाय.’
शब्दाची फेक पडल्यावर सावंत थोडे बावचळले. आपल्या बॅगमधून केशवकाकांनी दहा हजार रुपये काढले. म्हणाले पैसे मोजून घ्या. सावंतांनी नोटा मोजल्या. म्हणाले बरोबर दहा हजार आहेत. केशवकाका म्हणाले पैसे मिळाले. आता आम्ही निघतो.
शनिवारी रात्री सोफाबेडवरील पॅक कव्हर धुण्यासाठी काढले अन् सावंतांना आश्चर्याचा धक्काच बसला. बेडच्या खाचीमध्ये अडकलेला लखोटा उचलला अन् रोहिणीला दाखवून डोक्याला हात लावून ते खाली बसले.
रोहिणी म्हणाली, ‘आता पैसे सापडले म्हणून भरतला सांगणे चुकीचे होईल.’
सावंत म्हणाले, ‘त्याचे पैसे परत केलेच पाहिजेत. त्याला घरी बोलावून त्याची माफी मागून पैसे परत करूया. कारण त्याच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. त्याच्या पोटावर मारून हे पैसे आपल्याला पचणार नाहीत. गरीब आणि प्रामाणिक माणसावर जाणूनबुजून दहा हजारांचा दरोडा घालून उपयोग नाही. माझी मुलं वेडीखुळी निपजतील. शिवाय परमेश्वरसुद्धा माफ करणार नाही.’