यशासाठी वेळेचे व्यवस्थापन आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:22 IST2021-05-10T04:22:44+5:302021-05-10T04:22:44+5:30
गडहिंग्लज : वेळ ही सर्वांत मौल्यवान गोष्ट आहे. एकदा गेलेली वेळ व संधी पुन्हा परत येत नाही. त्यामुळे जीवनाचे ...

यशासाठी वेळेचे व्यवस्थापन आवश्यक
गडहिंग्लज : वेळ ही सर्वांत मौल्यवान गोष्ट आहे. एकदा गेलेली वेळ व संधी पुन्हा परत येत नाही. त्यामुळे जीवनाचे ध्येय आणि रस्ता निश्चित करा. सकारात्मक विचार व कौशल्य आणि वेळेचे योग्य व्यवस्थापन करा, कोणत्याही क्षेत्रांत नक्कीच यश मिळेल, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक प्रा. डॉ. ए. एम. गुरव यांनी केले.
येथील ज्ञानदीप प्रबोधिनी संचलित झेप अॅकॅडमीतर्फे आयोजित ‘वेळेचे व्यवस्थापन’ या विषयावरील ऑनलाईन कार्यशाळेत ते बोलत होते. संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती.
गुरव म्हणाले, जीवनातील सुख-सोयींमुळे वेळेच महत्त्व दुर्लक्षित झाले आहे. आपण नेहमी पैशाचा हिशेब ठेवतो, वेळेचा हिशेब कधीच ठेवत नाही. परंतु, वेळ ही कायमस्वरूपी गुंतवणूक असून भांडवलाप्रमाणे त्याचा योग्य उपयोग करायला हवा.
प्रत्येक क्षणाची आपण काळजी घेतली तरच प्रत्येक क्षण आपली काळजी घेईल. जीवनातील प्रत्येक टप्प्यावर आपण सिंहावलोकन करायला हवे. दैनंदिन कामातील प्राधान्यक्रम निश्चित करून त्याची पूर्तता वेळेवर करायला हवी. तरच आपला भविष्यकाळ उज्ज्वल आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
संस्थापक चौगुले यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्या मीना रिंगणे यांनी स्वागत केले. सागर माने यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. .
यावेळी कार्याध्यक्ष दत्ता पाटील, प्रा. विजय आरबोळे, कल्पना पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
------------------------
* इंजि. शिवानंद मरगुद्दी हे ऑस्ट्रेलियातून वेबिनारमध्ये सहभागी झाले होत. त्याशिवाय ‘रवळनाथ’ व ‘ज्ञानदीप’ परिवारातील मान्यवरासह झेप अकॅडमीचे ९० प्रशिक्षणार्थी या वेबिनारमध्ये सहभागी झाले होते.
-------------------------
* फोटो ओळी : गडहिंग्लज येथील ऑनलाईन कार्यशाळेत प्रा. डॉ. ए. एम. गुरव यांनी मार्गदर्शन केले.
क्रमांक : ०९०५२०२१-गड-०४