निकृष्ट गटारींसाठी ‘आयआरबी’वर गुन्हा दाखल करा
By Admin | Updated: December 17, 2014 23:59 IST2014-12-17T23:36:39+5:302014-12-17T23:59:31+5:30
कृती समितीची मागणी : नागरिकांचे आरोग्य धोक्यात; आरोग्याधिकाऱ्यांनी दिला अहवाल

निकृष्ट गटारींसाठी ‘आयआरबी’वर गुन्हा दाखल करा
कोल्हापूर : रस्ते विकास प्रकल्पांतर्गत केलेल्या ४९ किलोमीटरच्या रस्त्यांतील गटारींचे काम निकृष्ट झाल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्याचा अहवाल महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी दिला आहे. याआधारे ‘आयआरबी’वर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा, अशा मागणीचे निवेदन आज, बुधवारी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांना दिले.
यावेळी, विधितज्ज्ञांकडून आढावा घेऊन कार्यवाही करू, असे आश्वासन देसाई यांनी दिले. कृती समिती सदस्यांनी काल, मंगळवारी राजारामपुरी परिसरातील बंदिस्त असलेल्या गटारींची पाहणी केली. यानंतर डॉ. पाटील यांनी गटारी आरोग्यास धोकादायक असल्याचा अहवाल दिला. त्याआधारे ‘आयआरबी’वर गुन्हा दाखल करण्याची मागणी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी मनपा प्रशासनाकडे केली. यावेळी दिलीप देसाई, बाबा पार्टे, अशोक पोवार, महादेव पाटील, बाबा इंदुलकर, आदी उपस्थित होते.