गुणपत्रिकांसाठी विद्यार्थी आक्रमक
By Admin | Updated: September 1, 2015 00:23 IST2015-09-01T00:23:19+5:302015-09-01T00:23:19+5:30
परीक्षा भवनच्या फलकाची मोडतोड; विद्यापीठात कोल्हापूर, सांगली, सातारच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा

गुणपत्रिकांसाठी विद्यार्थी आक्रमक
कोल्हापूर : गुणपत्रिकेसाठी प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आक्रमक होत शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा भवनवर सोमवारी मोर्चा काढला. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील संबंधित संतप्त विद्यार्थ्यांनी परीक्षा भवनच्या फलकाची मोडतोड केली. यावेळी आंदोलनकर्ते व सुरक्षा रक्षक यांच्यात धक्काबुक्की झाली.विद्यापीठाच्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखेसह अन्य अभ्यासक्रमांच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील अनेक विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल लागून देखील अद्याप गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. त्यामुळे त्यांचे पुढील वर्गातील प्रवेश रखडले आहेत. याबाबत चंदगडमधील चाळीसहून विद्यार्थी अॅड. संतोष मळवीकर यांच्या नेतृत्वाखालील सोमवारी सकाळी साडेदहा वाजता परीक्षा भवनवर मोर्चा काढण्यासाठी विद्यापीठात दाखल झाले. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर त्यांनी परीक्षा विभाग, विद्यापीठ प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. त्यात विद्यापीठात परीक्षाविषयक कामकाजासाठी आलेले कोल्हापूर, सांगली, सातारा, फलटणमधील शंभराहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. तेथून अकरा वाजण्याच्या सुमारास मोर्चाने ते परीक्षा भवन येथे पोहोचले. याठिकाणी ‘विद्यापीठाचा धिक्कार असो’, ‘भोंगळ कारभार करणाऱ्या परीक्षा विभागाचा धिक्कार’, ‘गुणपत्रिका लवकर मिळाल्याच पाहिजेत’, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. आंदोलनकर्ते घोषणाबाजीनंतर भवनच्या परिसरात घुसले. शिवाय त्यांनी भवनच्या व्हरांड्यात असलेल्या फलकाची मोडतोड केली. यावेळी आंदोलनकर्ते व त्यांना रोखणाऱ्या सुरक्षा रक्षकांत धक्काबुक्की झाली. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले. यााठिकाणी उपस्थित असलेले माजी बीसीयुडी संचालक डॉ. बी. एल. पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना शांत केले. आंदोलनाची माहिती मिळताच प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे हे परीक्षा भवनमध्ये दाखल झाले. त्यांनी आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी परीक्षा नियंत्रकांच्या कक्षात बोलाविले.
यावेळी अॅड. संतोष मळवीकर, प्रा. एन. एस. पाटील आणि डॉ. बी. एल. पाटील यांनी विद्यार्थ्यांना येत असलेल्या अडचणींबाबत डॉ. शिंदे, उपकुलसचिव जी. आर. पळसे यांच्याशी चर्चा केली. दीड तासांहून अधिक वेळ चाललेल्या चर्चेत डॉ. शिंदे यांनी शनिवारपर्यंत गुणपत्रिका दिल्या जातील, अशी ग्वाही दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन थांबविले.
आंदोलनात कृष्णा रेगडे, भारत गावडे, जयवंत पेडणेकर, अनिल तळगुळकर, संदेश अवडण, शरद पाटील, तानाजी गावडे, नीलेश रेडेकर आदींसह दीडशेहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
...अन्यथा सोमवारी ‘टाळे ठोक’ आंदोलन
गुणपत्रिका मिळत नसल्याची तक्रार घेऊन विद्यार्थी माझ्याकडे आले. त्यानंतर आम्ही २९ आॅगस्टपर्यंत गुणपत्रिका मिळाव्यात अन्यथा परीक्षा भवनवर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देणारे निवेदन चंदगडच्या तहसीलदारांना दिले होते.
या मुदतीपर्यंत गुणपत्रिका मिळाल्या नसल्याने आज आंदोलन केल्याचे अॅड. संतोष मळवीकर म्हणाले.
ते म्हणाले, प्रभारी कुलसचिव डॉ. शिंदे यांनी येत्या शनिवारपर्यंत सर्व गुणपत्रिका दिल्या जातील, अशी ग्वाही दिली आहे.
या मुदतीत गुणपत्रिका न मिळाल्यास विद्यापीठात सोमवारी (दि. ७) ‘टाळे ठोक’ आंदोलन केले जाईल.