परीक्षेसाठी येत असताना विद्यार्थ्याचे अपहरण
By Admin | Updated: April 12, 2015 00:42 IST2015-04-12T00:42:28+5:302015-04-12T00:42:44+5:30
सातारा बसस्थानकातील घटना : तपासासाठी पोलीस पथक तैनात

परीक्षेसाठी येत असताना विद्यार्थ्याचे अपहरण
सातारा : नववीच्या वार्षिक परीक्षेसाठी घरातून निघालेल्या यश नंदकिशोर साबळे (वय १४, रा. वडूथ, ता. सातारा) या मुलाचे सातारा बसस्थानकातून अपहरण झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून, शहर पोलिसांनी त्याच्या शोधासाठी एक पथक तैनात केले आहे. यशचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञातावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, यश साबळे हा येथील महाराजा सयाजीराव विद्यालयात नववीमध्ये शिकत आहे. मंगळवार, दि. ७ पासून त्याची वार्षिक परीक्षा सुरू आहे.
पेपरला जाण्यापूर्वी तो चाटे क्लासला जात होता. सकाळी साडेसहा ते साडेनऊपर्यंत तो चाटे क्लासमध्ये असायचा. शुक्रवार, दि. १० रोजी पहाटे सहा वाजता तो क्लाससाठी घरातून बाहेर पडला. मात्र, दुपारी दीड वाजता यशच्या वर्गशिक्षकांनी त्याच्या वडिलांना फोन करून यश परीक्षेला गैरहजर असल्याचे सांगितले.
हे ऐकून यशच्या वडिलांना धक्काच बसला. पहाटे घरातून बाहेर गेलेला मुलगा परीक्षेला कसा काय पोहोचला नाही, या विचाराने घरातील सगळेचजण हबकून गेले. त्याच्या वडिलांनी तत्काळ शाळेत धाव घेऊन यशची विचारपूस करून शोध घेतला. मात्र, तो कोठेच सापडला नाही. त्यानंतर ते चाटे क्लासमध्ये गेले. तेथेही तो नव्हता; परंतु चाटे क्लासमधील ‘सीसीटीव्ही’ फुटेज शिक्षकांनी पाहिले असता, यश सात वाजता क्लामध्ये आला होता.
त्यानंतर क्लासमध्ये कोणी नसल्याचे पाहून पाच मिनिटानंतर पुन्हा तो क्लासमधून एकटाच बाहेर पडल्याचे ‘सीसीटीव्ही’ फुटेजमध्ये दिसत आहे. यश अचानक गायब झाल्याने वडूथमध्ये अक्षरश: खळबळ उडाली.
ग्रामस्थांनीही यशचा शोध सुरू केला. शुक्रवारी सकाळी नऊ वाजता यश त्याच्या चुलत बहिणीला सातारा बसस्थानकात दिसला होता. त्यावेळी त्याने ‘पेपरला चाललोय,’ असे तिला सांगितले आणि त्यानंतर तो तेथून निघून गेला.
सातारा बसस्थानकातून तो बसने सयाजीराव विद्यालयात जातो. त्यामुळे बसस्थानकातूनच त्याचे अपहरण झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शुक्रवारी दिवसभर यशचा शोध घेतल्यानंतर रात्री त्याच्या वडिलांनी अज्ञात व्यक्तीने यशचे अपहरण केल्याची फिर्याद नोंदविली. (प्रतिनिधी)
नातेवाईक, मित्रांकडे चौकशी
यशचे अपहरण झाल्याचे समजताच पोलीस निरीक्षक राजीव मुठाणे यांनी तत्काळ त्याचे फोटो व्हॉट्सअॅपवर पाठविले. तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांचे एक पथक तैनात करण्यात आले असून, नातेवाईक तसेच मित्रांकडे पोलीस चौकशी करत आहेत. यशचे अपहरण होऊन चोवीस तासांहून अधिक वेळ झाल्याने पोलीसही चिंताग्रस्त झाले आहेत. त्याच्या कुटुंबियांचा कोणाबरोबर वाद होता का? घरातले कोणी त्याला रागावले का? यादृष्टीनेही पोलीस तपास करत आहेत. मात्र, अद्याप यशसंदर्भात कसलीही माहिती पोलिसांच्या हाती लागली नाही.