नामदेव ढसाळांचे लेखन माणूसकेंद्री : चव्हाण

By Admin | Updated: January 13, 2015 00:18 IST2015-01-12T22:53:29+5:302015-01-13T00:18:59+5:30

दर्पण सांस्कृतिक मंच : ढसाळ व्यक्ती, चळवळ, साहित्यावर चर्चासत्र

The story of Namdeo Dhasal is centrally centered: Chavan | नामदेव ढसाळांचे लेखन माणूसकेंद्री : चव्हाण

नामदेव ढसाळांचे लेखन माणूसकेंद्री : चव्हाण

कणकवली : साहित्यिक तळातल्या वर्गाचे सखोल लेखन करतो तेव्हा तो व्यक्तीकडून समिष्टीकडेच जात असतो. नामदेव ढसाळ यांनी आपल्या सर्व प्रकारच्या लेखनातून एकूण समाजाचाच विचार केला. त्यामुळेच ढसाळांनी जात-धर्माच्या पलिकडे माणूसकेंद्री लेखन केले, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत आणि विख्यात लेखक प्रा. डॉ. रामनाथ चव्हाण यांनी केले.
दर्पण सांस्कृतिक मंच आणि प्रबुद्ध ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने येथे आयोजित नामदेव ढसाळ व्यक्ती, चळवळ आणि साहित्य या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. डॉ. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या चर्चासत्रात ज्येष्ठ कवी, समीक्षक प्रा. डॉ. महेंद्र भोवरे, चित्रपट लेखक कादंबरीकार प्रा. डॉ. अनिल सपकाळ, समीक्षक प्रा. डॉ. संजय मून, कवी प्रा. डॉ. उत्तम अभोरे आदी सहभागी झाले होते. उद्घाटनसत्राला कवी अजय कांडर, कवी उत्तम पवार यांच्यासह दर्पणचे अध्यक्ष राजेश कदम, सचिव सुनिल तांबे, महेंद्र कदम, प्रकाश कदम, सिद्धार्थ तांबे उपस्थित होते.
ते म्हणाले, नामदेव ढसाळ हे कवी, कादंबरीकार, राजकीय नेते अशा विविधांगी रुपाने ते महाराष्ट्राला ओळखीचे असले तरी त्यांची खरी ओळखही कवी म्हणूनच आहे. ढसाळांना कवितेपासून विलग करता येणार नाही. पण त्यांनी एकूणच कार्यकर्ता, लेखक आणि अभ्यासक म्हणून केलेले काम महाराष्ट्राच्या पुरोगामीचा चेहरा पुढे घेऊन जाणारेच आहे. नामदेव ढसाळ यांनी अशी कविता लिहिली की, त्यांची मराठी कवी अशी ओळख निर्माण झाली नव्हती तर भारतीय पातळीवरचा एक अशी त्यांची ओळख झाली होती. हा त्यांचाच फक्त सन्मान नव्हता, तर तो मराठी कवितेचाही सन्मान होता. ढसाळांचे लेखन पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देणार आहे.
‘ढसाळ व्यक्ती आणि कविता’ या विषयावर बोलताना प्रा. भोवरे म्हणाले की, ढसाळ यांचा खरा चेहरा म्हणजे कविताच. ‘मी सत्याच्या कानाशी लाथ मारणारा’ या त्यांच्या ओळी त्यांच्या जगण्याला तंतोतंत जुळतात. वेगळ्या सौंदर्यशास्त्राची निर्मिती करणारी त्यांची कविता आहे. त्यांनी सामान्य माणसाचे बोट धरून चालणारी कविता लिहिली. ढसाळांच्या कवितेने माणसाच्या सामर्थ्यांचा विचार मांडला. वर्ण, शोषक व्यवस्थेच्या विरोधात स्फोटक कविता लिहिली. फुलांच्या सुगंधापेक्षा चांगला असतो माणसाच्या चारित्र्याचा वाद’ हा मौलिक विचार त्यांच्या कवितेने दिला. ढसाळांची कविता राजकीय भूमिका घेत भांडवलदारांच्या विरोधात आवाज उठविते.
‘ढसाळ यांची कादंबरी’ या विषयावर प्रा. डॉ. सपकाळ म्हणाले, ढसाळ यांचे कादंबरी लेखन विकसित होत जाणारे आहे. ते कादंबरीतून कथक शैलीतून व्यक्त होतात. त्यातून ते बांधिलकी मानणारा कार्यकर्ता म्हणून शोधता येते. सर्वसामान्य माणसाचा शोध घेणारा लेखक म्हणूनही ढसाळ कादंबरीतून दिसतात. संबंधांचे राजकारणही त्यात दिसते. ढसाळांच्या कादंबरीतून स्त्रियांचं राजकारण, दु:ख अतिशय तीव्रपणे मांडण्यात आले आहे. (प्रतिनिधी)


उत्तम पवार म्हणाले, जुन्या पिढीचा वारसा नव्या पिढीने सांभाळायला हवा. त्यातूनच नामदेव ढसाळांच्या साहित्यावर चर्चासत्र आयोजित करून त्यांना त्यांचे स्मरण होत राहिले पाहिजे. म्हणूनच महाराष्ट्रातल्या मान्यवर साहित्याच्या सहभागातून ढसाळ व्यक्ती, चळवळ आणि साहित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, असे जबाबदारीचे भान जपत दर्पणने २५ वर्षात वैचारिक उपक्रमांनी परिवर्तन चळवळीला दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे.

Web Title: The story of Namdeo Dhasal is centrally centered: Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.