एक वादळ शांत झालं...

By Admin | Updated: October 16, 2015 23:10 IST2015-10-16T23:07:09+5:302015-10-16T23:10:32+5:30

शंभर नंबरी गाडी आणि भेदक नजर

A storm subsided ... | एक वादळ शांत झालं...

एक वादळ शांत झालं...

वर्ष होतं २००९. सांगलीत मदनभाऊ युवा मंचची दहीहंडी होती. तरुण भारत स्टेडियम खचाखच भरलेलं. डॉल्बी दणाणत होता. बरोब्बर रात्री दहाच्या ठोक्याला ‘अरे दिवानो, मुझे पहचानो... कहां से आया, मैं हूं कौन... मैं हूं डॉन... डॉन... डॉन...’ गाणं सुरू झालं आणि मदनभाऊंची स्टेजवर झोकदार एन्ट्री झाली. मग अख्ख्या स्टेडियमभर एकच जल्लोष! मदनभाऊ पाटील या वादळी व्यक्तिमत्त्वाची ‘क्रेझ’च तशी होती. तमाम सांगलीकरांनी ती अनुभवलीय... पण आता ते वादळ शांत झालंय.
कार्यकर्त्यांना तुफानाचं बळ देणारा दिलदार आणि उमद्या मनाचा नेता, अशी मदनभाऊंची खरी ओळख. निष्ठावानांना जपण्याचा वसा त्यांना वसंतदादा आणि विष्णुअण्णांकडून मिळालेला. तो त्यांनी शेवटपर्यंत जपला. अगदी परवा-परवा संतोष पाटीलसारखा सामान्य कार्यकर्ता महापालिकेच्या स्थायी समितीचा अध्यक्ष झाला, तेव्हापर्यंत ते दिसून आलं. महापालिका ताब्यात आल्यानंतर सुरेश पाटील, किशोर जामदार, किशोर शहा, विजय धुळूबुळू ही भाऊंच्या जवळची माणसं महापौर बनणार, हे सगळ्यांना आधीच माहीत होतं... आणि झालंही तसंच. कार्यकर्त्यांना त्यांनी सन्मानानं मानाची पदं दिली. सुभाष खोत, सुभाष यादव अशा मित्रांना राज्य पातळीवरच्या संस्थांवर नेलं.महापालिकेची स्थापना झाल्यानंतर तिथं मधली पाच वर्षं वगळता आतापर्यंत मदनभाऊंनीच ‘राज्य’ केलं. एकेकाळी जिल्हा परिषद, महापालिका, जिल्हा बँक, बाजार समिती, वसंतदादा साखर कारखाना, वसंतदादा बँक ही सत्तेची आणि अर्थकारणाची प्रमुख केंद्रं एकाच वेळी भाऊंच्या हातात होती. निम्मा जिल्हा त्यांचा शब्द प्रमाण मानत होता. त्यावेळी जतच्या सुरेश शिंदेंपासून सोनीच्या दिनकर पाटलांपर्यंत, कसबे डिग्रजच्या सिकंदर जमादारांपासून गुंडेवाडीच्या महावीर कागवाडेंपर्यंत कार्यकर्त्यांची फौजच्या फौज दिमतीला होती.
भाऊंचा स्वभाव तसा मितभाषी. पण डोक्यावर बर्फ ठेवून अतिशय शांतपणानं चाली रचायच्या, पुढच्याला खेळवायचं, शेवटच्या टप्प्यात आक्रमक होत हल्ला चढवायचा आणि राजकारणाचा पट जिंकायचा, ही त्यांची खासियत. ‘फिरवाफिरवी’ हा राजकारणातला परवलीचा शब्द जणू त्यांच्यामुळंच जिल्ह्याला कळाला.
नगराध्यक्ष झाल्यापासून त्यांच्याभोवती कार्यकर्त्यांचं मोहोळ जमू लागलं. विशेषत: तरुण कार्यकर्त्यांत त्यांची प्रचंड क्रेझ. सगळे चढउतार मदनभाऊंनी पाहिले. २००८ मध्ये दादा घराण्याला तब्बल २७ वर्षांनी लाल दिव्याची गाडी त्यांच्या रूपानंच मिळाली. तेव्हाचा कार्यकर्त्यांचा जोशही त्यांनी पाहिला आणि साथ सोडून गेलेल्यांनी दिलेले दु:खाचे कढही त्यांनी पचवले. एकेक सत्ताकेंद्र हातातून जातानाचे पराभव उमद्या मनानं मान्य केले. काही निर्णय चुकल्यानं वाट्याला आलेले भोगही दिलखुलासपणे भोगले! मात्र त्यांच्याकडं खुनशीपणा बिलकूल नव्हता, त्यामुळंच सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते त्यांचे मित्र होते. दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील, आ. विलासराव जगताप, पृथ्वीराज देशमुख ही त्यातलीच उदाहरणं.
विधानसभेतले सलग दोन पराभव मात्र भाऊंच्या जिव्हारी लागले होते. त्यातला एक पराभव मिरजेच्या दंगलीमुळं पदरात पडलेला, तर दुसरा भाजपच्या लाटेमुळं स्वीकारावा लागलेला. या दरम्यान महापालिकाही हातातून गेलेली. भाऊ पुन्हा उठणार नाहीत, असं म्हणणाऱ्यांची तोंडं त्यांनी महापालिका जिंकून बंद केली. या काळात ते सार्वजनिक कार्यक्रमात कमी दिसत, पण कार्यकर्त्यांवर त्यांचं गारूड कायम होतं. ते असतील तेव्हा विष्णुअण्णा भवन, विजय बंगला गजबजलेला असायचा. नर्मविनोदी शैलीतल्या त्यांच्या कोट्या खळखळून हसवायच्या... आता ते सारं संपलंय. जिल्हाभर घोंगावणारं वादळ शांत झालंय. त्यांचं नेतृत्व मानणाऱ्या ‘आम आदमी का सिपाही’ संघटनेनं शहरभर आदरांजलीचे फलक उभे केलेत. त्यावरचं वाक्य मनात रूंजी घालतंय... ‘आज आम्ही पोरके झालो!’

शंभर नंबरी गाडी आणि भेदक नजर
मदनभाऊंना गाड्यांची मोठी आवड. ‘१००’ नंबर जणू त्यांच्यासाठीच राखीव असलेला. ‘१००’ नंबरची गाडी ही त्यांची ओळखच बनली होती. ती गाडी आली की, कार्यकर्ते लगेच जमा होत. मग काळ्याभोर केसांचा (अलीकडं कानाजवळ पांढुरके केस दिसू लागले होते.) मधोमध लफ्फेदार भांग पाडलेले भाऊ डोळ्यावरचा स्टायलीश गॉगल दूर करत समोरच्याकडं रोखून बघत. त्या भेदक नजरेवर तर अनेक कार्यकर्त्यांच्या उड्या पडायच्या.

‘स्लोगन’चा बादशहा
कार्यकर्त्यांच्या मनावर अधिराज्य करणारे मदनभाऊ डीजिटल फलकांवरचेही बादशहा होते. २००४ मध्ये सगळ्या विरोधकांनी कोंडी केल्यानंतर त्यांनी ‘मैं हंू ना’ अशी हाक देत अपक्ष म्हणून विधानसभेत धडक मारली. त्यांची हसरी छबी आणि ‘मैं हंू ना’चे फलक शहरभर लागले होते. ती निवडणूक जिंकल्यानंतर ‘दरवाजा फोडून थेट विधानसभेत’ अशी स्लोगन त्यांनीच चर्चेत आणली. कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यानंतर अख्खी सांगली अभिनंदनाच्या फलकांनी सजली होती. गल्लीबोळातल्या कार्यकर्त्यांनी आपली हौस भागवून घेतली होती. भाऊंना सांगली-मिरज परिसरातला कोपरा न् कोपरा माहीत होता, कार्यकर्त्यांची नावं आणि कामं पाठ होती, त्याचंच ते प्रतीक होतं. २०१३मध्ये महापालिका जिंकल्यानंतर ‘इस्लामपूरचं पार्सल परत’ आणि ‘बिग बााार संपला’ या स्लोगन चर्चेत आल्या होत्या.

बंडखोरीचं बीज रक्तातच
बंडाचं बीज मदनभाऊंच्या रक्तातच भिनलेलं. त्याची सुरुवात घरापासून झालेली. प्रकाशबापू आणि त्यांच्यातला संघर्ष जिल्ह्यानं पाहिला. १९९९ मध्ये ते राष्ट्रवादीत गेले खरे, पण तिथं त्यांचं मन रमलं नाही. त्यांनी राष्ट्रवादी सोडली आणि पुन्हा काँग्रेसचा हात धरला. राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयंत पाटील आणि त्यांच्यातून विस्तव जात नव्हता. विधानसभा, जिल्हा परिषद, महापालिका, जिल्हा बँक, बाजार समितीत त्यांच्यातल्या राजकीय संघर्षानं भूकंप घडवले. पण यंदा भाऊंनी जिल्हा बँक आणि बाजार समितीत थेट जयंत पाटलांशी हातमिळवणी केली. काँग्रेसचे नेते पतंगराव कदम आणि दादा घराण्यातील विशाल पाटील यांच्याविरोधात बंड पुकारलं. त्यांनी जयंतरावांशी जुळवून घेण्याचं कोडं अजूनही सुटलेलं नाही... े

- श्रीनिवास नागे.

सांगलीवर शोककळा
सांगली : काँग्रेसचे माजी मंत्री मदन पाटील यांच्या निधनाचे वृत्त समजताच सांगली शहरासह परिसरावर शोककळा पसरली. शहरातील सर्व बाजारपेठा, शाळा, महाविद्यालये बंद ठेवून आदरांजली वाहण्यात आली. आदरांजलीचे फलकही सर्वत्र लावण्यात आले होते. त्यांचे पार्थिव ‘विजय’ बंगल्यात आणल्यानंतर कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला.
सांगली, मिरज व कुपवाड महापालिकेसह विधानसभा क्षेत्रात मदन पाटील यांचा मोठा राजकीय प्रभाव होता. त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा संचही मोठा आहे. शुक्रवारी सकाळी त्यांच्या निधनाचे वृत्त वाऱ्यासारखे शहर परिसरात पसरले. सकाळपासून त्यांच्या कार्यकर्त्यांनी विष्णुअण्णा भवन व विजय बंगल्यावर गर्दी करण्यास सुरुवात केली होती. सकाळी अकरा वाजता त्यांच्या बंगल्यासमोर अलोट गर्दी झाली होती. दुपारी एकच्या सुमारास त्यांचे पार्थिव बंगल्यात आले, तेव्हा कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले होते. अनेक कार्यकर्ते रडत होते, तर काहींनी जमिनीवरच ठिय्या मारला होता. सकाळीच विजय बंगला व विष्णुअण्णा भवन येथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गर्दी आटोक्यात आणताना पोलिसांना कसरत करावी लागत होती.
निधनाची बातमी समजल्यानंतर शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. कापडपेठ, गणपतीपेठ, सराफकट्टा, हरभट रस्ता परिसरात कडकडीत बंद होता. पानपट्टी व खोकीधारकांनीही दुकाने बंद ठेवून त्यांना आदरांजली वाहिली. नागरिक, व्यापारी, उद्योजक, खोकीधारकांनी त्यांच्या बंगल्याकडे धाव घेतली होती. शहरातील शाळा, महाविद्यालयेही बंद होती. मदनभाऊंच्या नेतृत्वाखालील महापालिकेतही कामकाज बंद ठेवून त्यांना आदरांजली वाहिली. (प्रतिनिधी)े


बुधगाव, कवलापूर बंद
बुधगाव : माजी मंत्री मदनभाऊ पाटील यांच्या निधनानंतर शुक्रवारी बुधगाव, कवलापूर, बिसूर येथे सर्व व्यवहार बंद ठेवून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. सकाळी काँग्रेस कार्यक र्त्यांनी व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले होते.

Web Title: A storm subsided ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.