इचलकरंजीत रास्ता रोको
By Admin | Updated: June 15, 2016 00:08 IST2016-06-14T23:25:55+5:302016-06-15T00:08:05+5:30
पाणी प्रश्न : नगरसेविका व त्यांच्या पतीवर गुन्हा; नळपाणी पुरवठ्यासाठी ठिय्या आंदोलन

इचलकरंजीत रास्ता रोको
इचलकरंजी : येथील जवाहरनगर परिसरात आठवडाभर नळाला पाणी आले नसल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी मंगळवारी स्टेशन रोडवरील सोनाली हॉटेलसमोर सुमारे दीड तास रास्ता रोको आंदोलन केले. बंदोबस्तासाठी आलेल्या आंदोलकांना नगरपालिकेत जाऊन चर्चा करण्याचे आवाहन पोलिसांनी केले. मात्र, आंदोलक रस्त्यावरच बसून राहिले. त्यामुळे नगरसेविका शकुंतला मुळीक व त्यांचे पती वसंत मुळीक यांच्यासह आठजणांवर शिवाजीनगर पोलिसांनी जमाव बंदी मोडल्याचा गुन्हा नोंद केला आहे.
शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा नळ योजनेला शिरढोण (ता. शिरोळ) येथे व इचलकरंजीतील जलशुद्धिकरण केंद्राजवळ लागलेली गळती दुरुस्त करण्याचे काम दोन दिवस सुरू होते. त्याचा परिणाम म्हणून शहरातील पाणीपुरवठा दोन दिवस खंडित होता. जवाहरनगर परिसरामध्ये गेल्या आठ दिवसांपासून पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे पाणीटंचाईच्या निषेधार्थ त्या परिसरातील नागरिकांनी घागरी घेऊन स्टेशन रोडवर रास्ता रोको केला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड आंदोलनस्थळी गेले. त्यांनी आंदोलकांना ठिय्या आंदोलन मागे घेऊन नगरपालिकेत जाऊन चर्चा करण्याची विनंती केली. तरीही आंदोलकांनी आपले आंदोलन पुढे चालूच ठेवले. दरम्यान, पाणीपुरवठा विभागाकडील अभियंता बाजी कांबळे घटनास्थळी आले. त्यांनी पाणीपुरवठा पूर्ववत होईल, असे आश्वासन दिले. परंतु, नळाला पाणी आल्याशिवाय आंदोलन संपुष्टात येणार नाही, असे सांगत आंदोलकांनी आपला ठिय्या कायम ठेवला.
अखेर पोलिसांनी जमावबंदीचा आदेश मोडल्याबद्दल गुन्हा नोंद करणार असल्याची माहिती दिल्यानंतर आंदोलन संपुष्टात आले.
दरम्यान, येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये नगरसेविका शकुंतला मुळीक, त्यांचे पती वसंत मुळीक, मुलगा सतीश मुळीक, विकास सांगले, मंगल पाटील, सिजाउद्दीन जैनापुरे, आदींवर जमावबंदीचा आदेश मोडून आंदोलन केल्याबद्दल गुन्हा नोंदविला आहे. (प्रतिनिधी)